सध्या दिल्लीच्या सीमेवर सुरू असणारे शेतकरी संघटनांचे आंदोलन चर्चेचा विषय आहे. काही दिवसांपूर्वी या आंदोलनाला विदेशातूनही काही प्रतिष्ठितांनी (सिलिब्रिटीज) पाठिंबा दिला. त्यांच्यात प्रामुख्याने पॉप गायिका रिहाना, पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग, अमेरिकेतील व इतर देशांमधील काही लोकप्रतिनिधी इत्यादींनी ट्विटरवर पाठिंबा दिला. थनबर्ग यांनी तर केवळ पाठिंबा दिला नाही, तर एक प्रक्षोभक ‘टुलकिट’ही त्याबरोबर शेअर केले. या टुलकिटमधून या आंदोलनाचे खलिस्तान कनेक्शन स्पष्ट होत होते. या टुलकिटमध्ये आंदोलनाची रूपरेषा व गणतंत्रदिनापासून भविष्यात भारतच्या प्रशासनाविरोधात काय काय आणि कसे करायचे याचा चिथावणीखोर कार्यक्रमही होता, असा आरोप केला जातो. आपल्या विदेश व्यवहार मंत्रालयाने या टुलकिटच्या अज्ञात निर्मात्याविरोधात गुन्हेगारी तक्रार दाखल केली असून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. नंतर थनबर्ग यांनी हे टुलकिट डिलीट केले आणि नवे शेअर केले. पण तोपर्यंत ते असंख्यांनी पाहिले होते. अर्थात, खलिस्तानवाद्यांचा भारताविरोधातील दुष्प्रचार ही नवी बाब नाही. पण यावेळी एका घटनेने परिस्थितीला वेगळे वळण मिळाले. ते म्हणजे विदेशी सिलिब्रिटीजना भारताच्या सिलिब्रिटीजनी दणकेबाज प्रत्युत्तराचा तडाखा ठेवून दिला. या सिलिब्रिटीजमध्ये सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, अक्षयकुमार, कंगना राणावत इत्यादींचा समावेश होता. ‘भारताची एकात्मता अभेद्य असून कोणीही ती तोडण्याचा प्रयत्न करू नये. शेतकरी आंदोलन हा भारताचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यात ढवळाढवळ करण्याचा इतरांना अधिकार नाही’ अशा आशयाचे हे प्रत्युत्तर होते. वास्तविक या प्रत्युत्तरात काहीही वावगे नाही. प्रत्येक सर्वसामान्य भारतीयाला सुखावणारीच ही भूमिका होती. आंदोलक शेतकरी दुखावले जातील किंवा त्यांच्या मागण्यांची अवमानना होईल असा एक शब्दही त्यात नव्हता. तथापि, या शेतकरी आंदोलनात स्वतःचा राजकीय लाभ शोधणारे काही राजकारणी आणि विद्यमान केंद्र सरकारला पाण्यात पाहणे हेच ज्यांचे जीवनकार्य आहे, असे काही तथाकथित पुरोगामी विचारवंत यांनी आपल्याच देशातील या सिलिब्रिटीज विरोधात टीकेची झोड उठविली आहे याचे हसू आल्याखेरीज रहात नाही. विदेशी सिलिब्रिटीजच्या आगाऊपणाला या आपल्या मान्यवरांनी देशभक्तीपूर्ण भावनेने दिलेले प्रत्युत्तर आणि देशाच्या सार्वभौमत्वाचे केलेले समर्थन हे जणू काही या मान्यवरांनी केलेले पापच आहे, अशा आविर्भावात ही टीका सुरू आहे आणि या सर्व प्रकारावर वृत्तवाहिन्यांवर चर्चासत्रेही रंगवली जात आहेत. टीकाकारांचा सर्वसाधारण सूर असा आहे, की आंदोलनाला पाठिंबा देणारे सिलिब्रिटीज विदेशी असले तरी त्यांना पाठिंबा देण्याचा अधिकार आहे. कारण हा विचारस्वातंत्र्य आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा प्रश्न आहे. काहींच्या मते विदेशी मान्यवरांनी व्यक्त केलेले विचार हे देशाविरोधात नसून ते सरकारच्या धोरणांच्या विरोधात आहेत त्यामुळे देशाच्या सार्वभौमत्वाशी त्याचा संबंध जोडला जाऊ नये. पण हा युक्तीवाद पोकळ आणि बाष्कळ आहे. कारण प्रश्न जर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा असेल तर हे स्वातंत्र्य केवळ विदेशी सिलिब्रिटीजनाच आहे असे मानायचे काय? तेच स्वातंत्र्य त्यांना प्रत्युत्तर देणाऱया भारतीय सिलिब्रिटीजना नाही काय? भारतीय सिलिब्रिटीजनी प्रत्युत्तर देण्याचे कारण नव्हते, असे मानणारे लोक मुळात विदेशी लोकांनी, ज्यांचा काडीमात्र संबंध नाही, अशा एका भारतीय विषयावर टिप्पणी का केली असा प्रश्न या विदेशींना का विचारत नाहीत? इतकेच नव्हे, तर ज्या थनबर्ग नामक तरूणीने खलिस्तानवादी टुलकिट शेअर केले तिलाही हे लोक जाब विचारत नाहीत. (तिने ते नंतर डिलिट केले म्हणून तिला संशयाचा फायदा देण्यात आलेला दिसतो). म्हणजे पहा, विदेशी लोकांनी तीळमात्रही संबंध नसताना केवळ खोडसाळपणाने आणि भारताची हानी करण्याच्या अंतस्थ हेतूने व्यक्त केलेले विचार, हा त्यांचा अधिकार. पण भारतीय व्यक्तींनी त्यांना दिलेले प्रत्युत्तर मात्र अयोग्य असा हा मामला दिसतो. अर्थात, एखाद्या विषयात जेव्हा राजकारण आणि सत्तास्वार्थ शिरतो तेव्हा यापेक्षा वेगळे काही घडणार नाही. विदेशी सिलिब्रिटींनी व्यक्त केलेले विचार देशाच्या सार्वभौमत्वाशी संबंधित नाहीत, तर ते केंद्र सरकारच्या धोरणाशी संबंधित आहेत. त्यामुळे प्रत्युत्तर देण्याचे कारण नव्हते, असे मानायचे तर लोकशाहीच्या मार्गाने निवडून आलेले केंद्र सरकार हा या देशाच्या सार्वभौमत्वाचाच एक महत्त्वाचा भाग नाही काय असाही उलट प्रश्न विचारता येईल. शिवाय विदेशी मान्यवरांच्या ट्विट टिप्पणींच्या निमित्ताने खलिस्तानवाद्यांचे जे कारस्थान नकळतपणे उघड झाले, ते देशाच्या सार्वभौमत्वासाठी धोकादायक नाही का असेही विचारता येईल. त्याचप्रमाणे विदेशी लोकांनी केलेल्या टिप्पण्या केवळ सरकारी धोरणाशी संबंधित आहेत असे जरी मानले तरी त्यांना उत्तर देण्याचा अधिकार आपल्या सिलिब्रिटीजना आहे की नाही? एखादा प्रश्न केवळ देशाच्या सार्वभौमत्वाशी संबंधित असेल तरच त्याला भारतीयांनी प्रत्युत्तर द्यावे, अन्यथा देऊ नये, असा नियम आहे काय असे अनेक मुद्दे मांडता येतील. आपल्या मान्यवरांनी दिलेले प्रत्युत्तर सरकारच्या सांगण्यावरून दिले असाही विनोदी आरोप केला जात आहे. सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर हे मान्यवर सरकारचे गुलाम नाहीत. त्यांना स्वतःची बुद्धी आहे. त्यांची स्वतःची इच्छा असल्याशिवाय ते प्रत्युत्तर देणार नाहीत. ती काही लहान मुले नव्हेत. त्यामुळे हा आरोपही निरर्थक आणि या मान्यवरांची अवमानना करणारा आहे. तथापि, अशा मान्यवरांनी अशी प्रत्युत्तरे कोणाच्याही दबावाखाली न येता देत रहावीत. सर्वसामान्य देशवासीय त्यांच्या पाठीशी आहेत.
Previous Articleलोकांना हवी होती ‘ममता’ पण मिळाली ‘निर्ममता’
Next Article मेयर्सच्या नाबाद द्विशतकाने विंडीजचा विजय
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.