15 नोव्हेंबर अर्ज पाठविण्याची अखेरची मुदत
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
राष्ट्रीय क्रिकेट निवड समितीतील तीन सदस्यांची मुदत संपली असल्याने नवी निवड करण्यासाठी बीसीसीआयने अर्ज मागविले आहेत. रविवार दि. 15 नोव्हेंबर ही अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख असल्याचे बीसीसीआयने सांगितले.
उमेदवारासाठी 60 हून कमी वय आणि किमान 30 प्रथमश्रेणी क्रिकेट सामने खेळण्याचा अनुभव असणे, असे निकष ठेवण्यात आले आहेत. आंतरराष्ट्रीय सामने (7 कसोटी किंवा 10 वनडे व 20 प्रथमश्रेणी सामने) खेळण्याचा अनुभव असणाऱयांना प्राधान्य देण्यात येणार आहे. देवांग गांधी (पूर्व विभाग), सरणदीप सिंग (उत्तर विभाग), जतिन परांजपे (पश्चिम विभाग) या निवड सदस्यांची मुदत संपली आहे. अर्जांची छाननी झाल्यानंतर नव्या उमेदवारांना वैयक्तिक मुलाखतीसाठी बोलावण्यात येणार आहे.
बीसीसीआयने निवडीसाठी विभागीय धोरण राबविणे अधिकृतपणे थांबविले असले तरी मुदत संपलेले सदस्य ज्या विभागाचे असतील, त्याच विभागाचे नवे सदस्य निवडण्याची प्रथा सुरू ठेवण्यात आली आहे. त्यानुसार सुनील जोशी यांची एमएसके प्रसाद (दक्षिण विभाग) यांच्या जागी निवड करण्यात आली. त्याचप्रमाणे राजस्थानच्या गगन खोडा यांच्या जागी रेल्वेच्या हरविंदर सिंग यांची मध्य विभागाचे सदस्य म्हणून गेल्या फेब्रुवारीत निवड करण्यात आली होती. मागच्या टप्प्यात ज्यांनी (अजित आगरकर मुंबई, मनिंदर सिंग दिल्ली) अर्ज केले होते, त्यांचे अर्ज ग्राहय़ मानले जातील, अशी अपेक्षा आहे.
राष्ट्रीय निवड समिती अध्यक्षपदी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय अनुभव असणाऱया उमेदवाराची निवड केली जाणार हे निश्चित आहे. मदनलाल, आरपी सिंग व सुलक्षण नाईक यांच्या क्रिकेट सल्लागार समितीला 15 कसोटी व 69 वनडे आंतरराष्ट्रीय सामन्याहून अधिक सामने खेळण्याचा अनुभव असणारा उमेदवार न मिळाल्यास सुनील जोशी यांना अध्यक्षपदी नियुक्ती होऊ शकते. वरिष्ठ राष्ट्रीय निवड समितीकडे भारत, भारत अ, दुलीप ट्रॉफी, देवधर ट्रॉफी, चॅलेंजर ट्रॉफी संघांचे तसेच शेष भारत संघाचे प्रशिक्षक व संघ निवडण्याचे काम असते. पारदर्शकतेने सर्वोत्तम संघ निवडणे ही त्यांची मुख्य जबाबदारी असते. याशिवाय विविध संघांच्या बैठकांना उपस्थित राहणे, स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय सामने पाहणे ही कामेही त्यांना करावयाची असतात.