सातारा / प्रतिनिधी :
क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात सुरु असलेले कोरोना सेंटर हे गोरगरीब रुग्णांचे आधारवड. परंतु येथेच रुग्णांची छळवणूक सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. गेल्या चार दिवसांपासून पाण्याविना येथील रुग्ण कासाविस झालेले आहेत. तहानेने तडफड सुरु आहे. रुग्ण पाण्यासाठी आशेने बाहेर असलेल्या नातेवाईंकाकडे मागणी करत आहेत. पाण्याचा ठणाणा गेल्या चार दिवसांपासून झाला आहे.
जिल्हा रुग्णालयामध्ये अनेक कोरोना बाधित रुग्ण उपचार घेत आहेत. गोरगरीब रुग्णांना उपचार देणारे हे महत्वाचे केंद्र आहे. त्याच केंद्रामध्ये तब्बल चार दिवसापासून पाण्याचा थेंबही गेला नाही. कोरोना बाधित रुग्णांना पिण्याचे पाणी चार दिवसांपासून नसल्याचे तेथे उपचार घेत असलेल्या रुग्णांनी सांगितले.
वास्तविक जिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये ज्या पद्धतीने सुविधा देणे गरजेचे होते. त्याची मात्र वाणवा होताना दिसत आहे. त्याचाच प्रत्यय आज प्रसिद्धी माध्यमांसमोर वॉर्डातील रुग्णांनी दाखवला. गेल्या चार दिवसांपासून पाणी नसल्याने नातेवाईकाकडून बाहेरुन पिण्यासाठी पाणी दिले जात आहे. पाणी नियमित देण्याची मागणी रुग्णांनी केली आहे.