प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनाशी सामना करता येईल. पण बेळगावच्या रस्त्यांशी सामना करणे अशक्मय प्राय आहे, अशी भावना सध्या जनमाणसांत पसरली आहे. तीन महिन्यांपासून बेळगावकर कोरोनाशी लढत आहेत. पण गेल्या वर्षभरापासून बेळगाव शहरातील रस्त्यांशी सामना करताना त्यांच्या नाकीनऊ आल्या आहेत. दुर्दैवाने शहरातील बहुसंख्य रस्त्यांची दुरवस्था झाली असताना सिव्हिल हॉस्पिटलच्या शवागाराला जाण्याच्या रस्त्याची पार चाळण झाली आहे. त्यामुळे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
स्मार्ट सिटीचे काम सुरू होऊन दीर्घकाळ लोटला. या वर्षभराच्या काळात नागरिकांना सातत्याने अचानक बंद केलेले रस्ते, खड्डे, माती, वाहतूक वळवून घालावा लागणारा मोठा हेलपाटा, सातत्याने होणारी वाहतूक कोंडी याचा सामना करावा लागला आणि दुर्दैवाने आजही तो संपलेला नाही.
शहरातील बहुसंख्य रस्त्यांची चाळण झालीच आहे. काही ठिकाणी रस्ते दुरुस्तीचे काम सुरू आहे. मात्र या सर्व कामांमध्ये नियोजन आणि सुसुत्रतेचा अभाव आहे. रस्ते तयार केले तरी आतील बाजुंना जोडणाऱया रस्त्यांमध्ये आणि मुख्य रस्त्यांमध्ये बरेचअंतर ठेवले गेल्याने सोयीचे असून सुद्धा नागरिकांना या रस्त्यांचा वापर करून आपल्या कामाच्या ठिकाणी लवकर जाता येत नाही. मुख्य रस्ता उंच आणि जोड रस्ता कमी उंचीचा असे चित्र सर्वत्र असल्याने वाहनधारकांची गैरसोय होत आहे.
त्याचबरोबर जेथे लोकांचा वावर आहे अशा ठिकाणच्या रस्त्यांची सुद्धा चाळण झाली आहे. पाऊस पडल्याने सर्वत्र चिखलाचे साम्राज्य असून सिव्हिल हॉस्पिटल रोडची तर दयनीय अवस्था आहे. बिम्स् हॉस्पिटल आणि शवागाराला जाणाऱया रस्त्याची चाळण झाली असून सध्या खड्डे आणि दगड यांचा सामना करत लोकांना या ठिकाणी जावे लागते.
अपघातात किंवा तत्संग कारणांनी मृत्यू झाल्यास सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृतदेह शवागारात पाठविला जातो. मृत व्यक्तीचे नातेवाईक यांना या ठिकाणी जाणे भाग पडते. पण प्रशासन जणू त्यांची सत्वपरीक्षा पाहते, असा येथील रस्ता झाला आहे. पावसाने निर्माण झालेल्या चिखलामुळे तर समस्येत भर पडली आहे. किमान महत्त्वाच्या ठिकाणच्या रस्त्यांची तरी प्रशासनाने आणि मनपाने त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.