दैनंदिन हजारोंची गर्दी : नॉन कोव्हिड ओपीडी सुरु : लसीकरणासाठी प्रचंड गर्दी : तपासणीसाठीही गर्दी :
प्रतिनिधी / सातारा
जिल्हा कोरोना संसर्गाच्या भयानक संकटातून वाटचाल करु लागला आहे. नाही म्हणता, म्हणता दुसऱया लाटेने कहर सुरु ठेवला असून दररोज हजारोंच्या संख्येने वाढणारे बाधित आणि दुसरीकडे उच्चांकी होत असलेला मृत्यूदर याने समाज भयभीत झालाय. त्यातच सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात दररोज होत असलेली हजारोंची गर्दी कोरोना संसर्ग वाढीसाठी कारणीभूत ठरत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील गर्दी नियंत्रण करुन तिथे उपाय योजना राबवण्याची गरज निर्माण झाली असून जिल्हा रुग्णालय परिसर कोरोना स्प्रेडसाठी ठरु लागला आहे.
गतवर्षी मार्च 22 पासून सुरु झालेली लढाई नवीन वर्षातील जानेवारी आता कोरोना संपणारच असे वाटू लागले असताना पुन्हा गतवर्षी पेक्षा मोठया प्रमाणात संसर्गाचा विस्फोट जिल्हा अनुभवत आहे. गतवर्षी जिल्हा रुग्णालयातील इतर आजारांचे सर्व रुग्णांवरील उपचार बंद करुन फक्त कोव्हिड रुग्णांसाठी उपचार करण्यावर यंत्रणा राबत होती. प्रचंड भिती मनात घेवून रुग्णालय यंत्रणेसह सर्वजण काम करत होते. अनेकांना या रुग्णालयाने कोरोनामुक्त देखील केले आहे.
सप्टेंबर व ऑक्टोबरनंतर कोरोनाचा कहर कमी होवू लागल्याने सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात पुन्हा सर्व ओपीडी खुल्या केल्या गेल्या. त्यामुळे रुग्णालयात इतर आजार असणारांची वर्दळ वाढली. आपदकालीन कक्ष तर नेहमीप्रमाणे सुरच असतो. त्यात अपघात, मारामारीतील जखमी, विषप्राशन केलेले रुग्ण, भाजलेले रुग्ण तसेच प्रसुती वॉर्डातही रुग्णांसह नातेवाईकांची गर्दी होवू लागली. त्याचा परिणाम जिल्हा रुग्णालयात कोरोना वॉर्डाबरोबर इतर रुग्णांचा वावर वाढल्याने वेगळा होत असल्याचे समोर येत आहे.
गतवर्षी सिव्हिलची होती दहशत
गेल्या वर्षी रुग्ण संख्या वाढली नव्हती. मात्र, कडक लॉकडाऊन काळात सिव्हिलमध्ये कोरोनावर उपचार करण्यासाठी स्वतंत्र वॉर्ड करण्यात आले होते. तिथे कोरोना रुग्णांवर उपचार सुरु असल्याने इतर आजारांचे रुग्ण फिरकत देखील नव्हते. तर सिव्हिल समोरुन जाताना देखील नागरिकांच्या अंगावर काटा उभा राहत होता. एवढी सिव्हिलची दहशत कोरोनाच्या भीतीमुळे वाढलेली होती. फक्त कोरोना रुग्ण आणि त्यांच्यावर उपचार करणाऱया डॉक्टर्स व स्टापची वर्दळ असायची.
आताची स्थिती पार्किंगलाही जागा नाही
गेल्या काही महिन्यांपासून जिल्हा रुग्णालयात कोरोनावरील उपचारांबरोबर इतर आजारांवर उपचार सुरु करण्यात आल्याने रुग्णांसह नातेवाईकांची गर्दी तिथे नेहमीच असते. तर आपतकालीन कक्षात येणाऱया रुग्णांसह नातेवाईकांचीही गर्दी नित्यनेमाने होतच असते. इतर सर्टिफिकेटची कामे, अपंगत्वाचे दाखले या कामांसाठी जिल्हाभरातून नागरिक येतच असतात. त्यामुळे पार्किंगलाही जागा मिळत अशी स्थिती निर्माण झालेली आहे.
लसीकरण, तपासण्यांमुळे गर्दीत वाढ
कोरोनावरील उपचारांबरोबरच आता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये लसीकरणही सुरु करण्यात आलेले आहे. त्यामुळे एकीकडे कोरोनाचा विस्फोट झालेला असताना आणि प्रशासन गर्दी टाळा असे म्हणत असताना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये लसीकरणासाठी रांगाच रांगा लागलेल्या असतात. तर आरटीपीसीआर, अँटीजन टेस्ट व्यापारी, व्यावसायिकांना कंपलसरी केल्याने तपासणीसाठी मोठया रांगा लागत आहेत. यामुळे जी गर्दी होत आहे यामध्येच सिव्हिलची यंत्रणा काम करत असून तेथूनच कोरोनाचा आणखी स्प्रेड होत असल्याची चर्चा जोर धरु लागलीय.
ज्येष्ठांना मोठा धोका ठरतोय
लसीकरणासाठी प्रथम ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य देण्यात आल्याने गेल्या काही दिवसांपासून सिव्हिलमध्ये लस घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिक येत आहेत. या ज्येष्ठ नागरिकांबरोबर मोठी गाडी, रिक्षा तसेच एक दोन नातेवाईकही येत असतात. तर 45 वर्षांवरील लसीकरण सुरु केल्यानंतर तिथे वाढलेली गर्दी प्रचंड आहे. त्यातच ज्येष्ठ नागरिकही असतात. हा सर्वच प्रकार कोरोना संसर्गामध्ये धोकादायक ठरु लागलाय. सध्या वाढू लागलेले ज्येष्ठांच्या मृत्यूचे 30 टक्के एवढे प्रमाण कदाचित त्यामुळे तर नसावे ना ? असाही प्रश्न उपस्थित होवू लागला आहे.
गर्दीचे नियंत्रणासाठी उपाय योजना आवश्यक
सिव्हिल हॉस्पिटल हे रुग्णांसाठी वरदान ठरत असले तरी या परिसरात होणारी गर्दी कोरोना स्प्रेडसाठी पोषक ठरतेय. या मोठया परिसरात दररोज चार हजारांपर्यंतची गर्दी येवून जातेय. त्यांच्या पार्किंगचा प्रश्न होतोय. तो हाताळण्यासाठी तिथे वाहतूक पोलीस नेमण्याची गरज आहे. तर कोणतेही सोशल डिस्टन्स न ठेवता ज्या पध्दतीने खुद्द सिव्हिल हॉस्पिटलमध्ये लसीकरण, कोरोना उपचार, आपतकालीन उपचार सुरु आहेत याबाबत प्रशासनाने ठोस निर्णय घेण्याची वेळ आलीय.
1 मे नंतर गर्दी रोखणार कशी ?
सध्या सातारा शहरात सिव्हिल, कस्तुरबा रुग्णालय व काही खासगी ठिकाणी शुल्कासह लस देण्यात येत आहे. मात्र, आताच रांगाच रांगा लागत असून आता 1 मे नंतर 18 वर्षांवरील सर्वांना लसीकरण सुरु करण्यात येणार आहे. मग 1 मे नंतर तर लस घेण्यासाठी जी गर्दी होईल त्यात युवावर्गासह ज्येष्ठांचाही समावेश असणार आहे. लस घेण्यासाठी ज्या रांगा लागतील त्यातून कोरोनाचा स्प्रेड होणार नाही का? एकीकडे गर्दी टाळा म्हणायचे आणि दुसरीकडे लसीकरणासाठी होणाऱया गर्दीच नियोजन प्रशासनाकडे आहे काय ?
साताऱयात लसीकरण केंद्रे वाढवा
सध्या आभाळच फाटलंय अशी स्थिती आहे. सिव्हिलमध्ये होणारी गर्दी तर भयानकच आहे. प्रशासनाने या गर्दी कमी करण्यासाठी नियोजन करण्याची गरज आहे. आर्यांग्ल हॉस्पिटलमध्ये 100 बेड आहेत. तिथे लसीकरण सुरु करता येईल तर सिव्हिलमध्ये जी गर्दी होत आहे ती कमी करण्यासाठी शहरातील उपनगरांमध्ये लसीकरण केंद्रे सुरु करुन तिथे लसीकरण सुरु केल्यास एकाच ठिकाणी होणारी गर्दीची समस्या सोडवता येईल. प्रशासनाकडे मनुष्यबळ कमी आहे तर त्यांनी सामाजिक संस्था, खासगी डॉक्टर्स यांचीही मदत घेतली पाहिजे. मनुष्यबळ वाढवले पाहिजे. सर्व नागरिकांना मोफत लस दिली पाहिजे. त्यासाठी जर केंद्राने अडीच हजार कोटींचे पॅकेज आहे. पण नियोजनशुन्य कारभार करु नका. दिल्लीत 150 रुपयांना लस दिली जात आहे. महाराष्ट्रात जास्त किंमत कशासाठी? तर सिव्हिल रुग्णालयातील अनियंत्रित गर्दी रोखण्यासाठी प्रशासनाने तातडीने नियोजन केले पाहिजे कारण हीच गर्दी कोरोना संसर्ग वाढवू शकत नाही का ?
राजेंद्र चोरगे, सामाजिक कार्यकर्ते, सातारा