प्रतिनिधी / सातारा :
रक्ताशी निगडित थॅलेसेमिया या अनुवंशिक आजाराच्या रुग्णांना जगवण्यासाठी प्रत्येक 15 ते 21 दिवसांनी रक्ताची बॅग चढवावीच लागते. वारंवारच्या रक्तसंक्रमणामुळे रक्तातील लोह शरीराच्या विविध अवयवात साठू लागते व त्यामुळे रूग्णाच्या जीवीतास धोका निर्माण होतो. म्हणूनच या रूग्णांना रोज Desirox, Defrijet, Defrisirox, kelfer अशी औषधे घ्यावी लागतात. पण गेल्या तीन महिन्यांपासून सातारा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ही औषधे संपल्यामुळे रूग्णांची गैरसोय होत आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य फाईट अगेन्स्ट थॅलेसेमिया ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष धनंजय नामजोशी यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांना निवेदन देवून थॅलेसेमिया रूग्णांसाठी तातडीने औषधे उपलब्ध करा, अशी मागणी केली.
निवेदनात म्हटले आहे की, सातारा सिव्हिल हॉस्पिटल हे थॅलेसेमिया औषध वितरणाचे केंद्र आहे. परंतु तेथील औषधे संपल्यामुळे साताऱ्याबरोबरच कराड, सांगली, पंढरपूर, सोलापूर, कोल्हापूर, बेळगाव अशा अनेक ठिकाणाहून औषधे नेण्यासाठी येणाऱ्या रूग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यातील अनेक रूग्णांना फाईट अगेन्स्ट थॅलेसेमिया ऑर्गनायझेशनच्यावतीने औषधे घरपोच पाठवण्यात येत आहेत. पण बाहेर जिल्ह्यातील रूग्णांना औषधे देऊन कोल्हापूरातील सी. पी. आर रूग्णालयातील औषधसाठाही संपत आला आहे. याच गोष्टीचा विचार करून सातारा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तातडीने थॅलेसेमिया रूग्णांची औषधे उपलब्ध करावीत, अन्यथा आरोग्यमंत्र्यांकडून तक्रार करु, असा इशारा धनंजय नामजोशी यांनी दिला आहे. दरम्यान, यावेळी डॉ. सुभाष चव्हाण संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून औषधे मागण्याबाबत सूचना दिल्या आहेत.