15 जूनपासून ऑनलाईन नोंदणी- रँकींग केवळ सीईटीतील गुणांच्या आधारेच
या शैक्षणिक वर्षातील बारावीची परीक्षा रद्द करण्यात आल्याने या विद्यार्थ्यांना दहावी आणि अकरावीमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे उत्तीर्ण केले जाणार आहे. दरम्यान, अभियांत्रिकी, वैद्यकीय यासह विविध कोर्सच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱया सीईटीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार 28 आणि 29 ऑगस्ट रोजी सामान्य प्रवेश परीक्षा (सीईटी) घेण्यात येणार आहे. 15 जूनपासून सीईटी देण्यास इच्छुक असणाऱयांना ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. रँकींगसाठी केवळ सीईटीतील गुणच विचारात घेण्याचा निर्णयही उच्च शिक्षण खात्याने घेतला आहे.
उपमुख्यमंत्री आणि उच्च शिक्षणमंत्री डॉ. अश्वथ नारायण यांनी मंगळवारी बेंगळूरमध्ये वरिष्ठ अधिकाऱयांशी चर्चा केल्यानंतर बैठकीतील निर्णयांची माहिती पत्रकार परिषदेत दिली. सीईटी आणि नीटसह व्यावसायिक कोर्सच्या प्रवेशासाठी बारावीचे गुण गृहीत न धरण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सर्व ऐच्छिक विषयांची सीईटी 28 आणि 29 ऑगस्ट रोजी होणार आहे. तर 30 ऑगस्ट रोजी परराज्यातील विद्यार्थ्यांसाठी कन्नड विषयाची परीक्षा होणार आहे. यापूर्वी ज्या पद्धतीने परीक्षा घेण्यात येत होती, त्यानुसारच यावेळीही परीक्षा होणार आहे. प्रत्येक विषयासाठी 60 गुण असतील. पहिल्या दिवशी म्हणजेच 28 ऑगस्ट रोजी गणित आणि जीवशास्त्र तर 29 ऑगस्ट रोजी भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र विषयांचा पेपर असणार आहे, अशी माहिती डॉ. अश्वथ नारायण यांनी दिली.
अभियांत्रिकी, पशूवैद्यकीय, कृषी विज्ञान, आर्किटेक्ट, फार्मसीच्या प्रवेशासाठी असणारी किमान गुणांची अट यावेळी रद्द करण्यात आली आहे. केवळ सीईटीमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारेच रँकींग दिले जाणार आहे.
इंजिनियरिंग कोर्ससाठी सीईटी देणाऱया सामान्य वर्गातील विद्यार्थ्यांना भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (पीसीएम) विषयांमध्ये किमान 45 टक्के आणि अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांना 40 टक्के गुणांची अट होती. आता हा नियम यंदापुरता रद्द करण्यात आला असून बारावी सायन्स उत्तीर्ण झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला सीईटी देता येणार आहे, असे स्पष्टीकरण डॉ. अश्वथ नारायण यांनी दिले आहे.
पदवी शिक्षणासाठी सीईटीचे गुण गृहीत धरण्याचा विचार
यंदा सर्व विद्यार्थी बारावी परीक्षा उत्तीर्ण होत आहेत. 6 ते 7 लाख विद्यार्थी यंदा बाहेर पडत आहेत. यापूर्वी 4 लाखापर्यंत विद्यार्थी उत्तीर्ण होत होते. त्या तुलनेत यंदा 30 टक्के अधिक विद्यार्थी उत्तीर्ण होत आहेत. त्यातील अनेकजण पदवी शिक्षणासाठी प्रवेश घेतील. या प्रवेशासाठी सीईटीचे गुण गृहीत धरण्याचा विचार सुरू आहे. मात्र, याबाबत अद्याप निर्णय घेतला नसल्याचे उपमुख्यमंत्री डॉ. अश्वथ नारायण यांनी सांगितले.