ऑनलाईन टीम / मुंबई :
आपण सुधारित नागरिकत्व कायद्याला (सीएए) समर्थन केलं नसल्याचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितलं आहे. ते म्हणाले, आपल्या वक्तव्याच्या प्रसारमाध्यमांकडून चुकीचा अर्थ लावण्यात आला. माझं सीएएला समर्थन नसून बेकायदा पाकिस्तानी, बांगलादेशी मुसलमानांना हाकला असं म्हणालो होतो. पण याचा चुकीचा अर्थ लावण्यात आला असं राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी पदाधिकाऱयांची आज, बैठक बोलावण्यात आली होती. सीएए आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीला (एनआरसी) पाठिंबा देण्यासंबंधी मनसे पदाधिकाऱयांमध्ये मतांतर असून नेमकी भूमिका स्पष्ट करण्यासाठीच ही बैठक बोलावण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
दरम्यान, मनसेच्या पहिल्या महाअधिवेशनात राज ठाकरे यांनी पाकिस्तान आणि बांगलादेशातून लाखो मुसलमानांनी भारतात घुसखोरी केली असून, त्यांना हाकलून देण्याची गरज आहे. त्यासाठी 9 फेब्रुवारी रोजी आझाद मैदानावर मोर्चा काढण्याची घोषणा करत राष्ट्रीय नागरिक नोंदणीला (एनआरसी) अप्रत्यक्षपणे पाठिंबा दर्शवला होता.