ऑनलाईन टीम / मुंबई :
नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी घरे फोडणारे आहेत. त्यामुळे नेत्यांनी देशभरातील आंदोलनकर्त्यांचा आवाज ऐकावा, त्यावर बोलावे. सीएए आणि एनआरसीविरोधात आता आवाज उठविण्याची वेळ आली आहे, असे बॉलिवूड अभिनेत्री पुजा भट्ट हिने म्हटले आहे.
कुलाबा येथे सीएए-एनआरसीविरोधी आंदोलनाच्या संकल्पनेवर आधारित एका कार्यक्रमात पूजा बोलत होती. पुजा भट्ट म्हणाली, नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीला देशभरातून कडाडून विरोध होत आहे. मी आपल्या नेत्यांना विनंती करते की या कायद्यांमुळे देशभरात होणाऱया आंदोलनांचा त्यांनी आवाज ऐकावा. त्यांचे म्हणणे समजून घ्यावे. कारण हे दोन्ही कायदे घरे फोडणारे आहेत. मी देखील या कायद्याचे समर्थन करत नाही.
सीएए-एनआरसी विरोधात सुरू असलेल्या आंदोलनांमधून आपल्याला हा संदेश मिळतो की आता आवाज उठवण्याची वेळ आली आहे. आपले मौन आपल्याला आणि सरकारलाही वाचविणारे नाही. त्यामुळे जोपर्यंत आमचा आवाज ऐकला जाणार नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही, असेही ती म्हणाली.