तामिळनाडूत सेनेचे हेलिकॉप्टर कोसळले : पत्नी मधुलिका यांच्यासह 13 जणांचा अंत
कुन्नूर, नवी दिल्ली / वृत्तसंस्था
तामिळनाडूमध्ये हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या दुर्घटनेत देशाच्या तिन्ही संरक्षण दलांचे प्रमुख सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्यासह त्यांच्या पत्नी मधुलिका आणि अन्य 11 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यांमध्ये भारतीय सेनेतील उच्चपदस्थ अधिकाऱयांचाही समावेश आहे. दुपारी 12 वाजून 45 मिनिटांच्या आसपास ही दुर्घटना घडली. बिपिन रावत यांच्या मृत्यूची घोषणा बुधवारी सायंकाळी सव्वासहा वाजता भारतीय वायुदलाकडून करण्यात आली. या घटनेमुळे साऱया देशाला मोठाच धक्का बसला असून हळहळ व्यक्त होत आहे. रावत यांचे पार्थिव गुरुवारी दिल्लीत आणले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यांच्या निधनामुळे संसद अधिवेशनासह राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाचे कार्यक्रम तात्पुरते स्थगित किंवा प्रलंबित करण्यात आले आहेत.
तामिळनाडूमधील कुन्नूर येथे बुधवारी लष्कराचे एमआय-17 हेलिकॉप्टर क्रॅश झाले. सदर हेलिकॉप्टर भारतीय लष्कराचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि इतर अधिकाऱयांना घेऊन जात होते. रावत यांच्यासह एकूण 14 जण यात प्रवास करत होते. या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. त्यात हेलिकॉप्टर पूर्णपणे बेचिराख झाल्याचे दिसत आहे. हेलिकॉप्टर कोसळताच ते झाडांवर आदळल्यानंतर आगीचा भडका उडाल्याचे स्पष्ट करण्यात आले. आर्मी टेनिंग कॅम्पच्या परिसरात हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाल्यानंतर, तातडीने बचावकार्याला सुरुवात झाली. या हेलिकॉप्टर अपघाताची ‘कोर्ट ऑफ इन्क्वायरी’ करण्यात येणार आहे. एमआय-17 हॅलिकॉप्टरला दुर्घटना होण्याची गेल्या दोन महिन्यातली ही तिसरी घटना आहे.
सीडीएस बिपिन रावत हे आपल्या पत्नीसह वेलिंग्टन येथील सशस्त्र दलाच्या महाविद्यालयात एका कार्यक्रमासाठी गेले होते. या ठिकाणी रावत यांचे व्याख्यान होते. हा कार्यक्रम आटोपून ते कुन्नूरला परतत होते. तेव्हा निलगिरी पर्वत रांगामध्ये बुधवारी दुपारी 12 वाजून 40 मिनिटांनी ही घटना घडली. तामिळनाडूत गेल्या काही दिवसांपासून प्रचंड पाऊस सुरू असल्यामुळे वातावरण खराब आहे. त्यामुळेच ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे. दुर्घटना घडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना या घटनेची माहिती देण्यात आली. सीडीएस जनरल बिपिन रावत यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू असल्याची माहिती माजी संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी दुपारी संसदेमध्ये दिली. त्यानंतर काही वेळातच सभागृहाचे कामकाज गुरुवारपर्यंत स्थगित केल्याची घोषणा सभाध्यक्षांनी केली.
घनदाट जंगलात हेलिकॉप्टर कोसळले
एनएनआयच्या माहितीनुसार, हेलिकॉप्टर सुलूर हवाई तळावरून वेलिंग्टनला जात होते. त्याचवेळी तामिळनाडूतील कुन्नूरजवळ निलगिरी कट्टेरी येथे ही दुर्घटना घडली. ऊटी-कुन्नूरजवळ निलगिरी जंगल हे अतिशय घनदाट जंगल आहे. तामिळनाडू आणि कर्नाटक या दोन राज्यांची सीमा निलगिरी जंगलालगत आहे. चारही बाजूंनी झाडांनी व्यापलेल्या या परिसरात सीडीएस बिपिन रावत यांचे हेलिकॉप्टर कोसळले. हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाल्यानंतर परिसरात आगीच्या ज्वाळा भडकल्या होत्या.
डीएनए चाचणीने होणार मृतदेहांची ओळख
दरम्यान, या अपघातानंतर हेलिकॉप्टरने पेट घेतल्यामुळे हेलिकॉप्टरमधून प्रवास करणारे सर्वजण आगीच्या भक्षस्थानी पडले. त्यामुळे या मृतदेहांची ओळख पटविण्यासाठी डीएनए चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती, प्रशासनाने दिली. दुर्घटनेनंतर 11 जणांचे पूर्णपणे जळालेल्या स्थितीतील मृतदेह सापडले. तर रावत यांना अतिशय गंभीर भाजलेल्या अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तत्पूर्वी स्थानिकांच्या मदतीने त्यांना बेडशीटमध्ये गुंडाळून नेल्याचे व्हिडीओही व्हायरल झाले आहेत.
सुरक्षित हेलिकॉप्टर, तरीही…
दोन इंजिन असलेले एमआय-17व्ही5 हे हेलिकॉप्टर अतिशय सुरक्षित समजले जात असूनही ते दुर्घटनाग्रस्त झाल्याने त्याच्या सुरक्षेबाबत पुन्हा नव्याने चर्चा सुरु झाली आहे. हे हेलिकॉप्टर रशियन बनावटीचे आहे. मुख्यत्वेकरून सैन्यदल आणि व्हीआयपींसाठी हे हेलिकॉप्टर वापरले जाते. हे हेलिकॉप्टर नेमके कसे दुर्घटनाग्रस्त झाले त्याबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाल्याचे सांगण्यात येत आहे.
झाडांवर कोसळले… आग लागली…
लष्कराच्या बडय़ा अधिकाऱयांना घेऊन हवाई दलाचे एमआय-17व्ही5 हेलिकॉप्टर कर्नाटक-तामिळनाडू सीमेवरील कुन्नूरकडे जात होते. यामध्ये सीडीएस बिपिन रावत, त्यांची पत्नी, त्यांचा स्टाफसह भारतीय सैन्यदलातील उच्चपदस्थ अधिकारी होते. यादुर्घटना प्रकरणी काही प्रत्यक्षदर्शी साक्षीदारही पुढे आले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार हेलिकॉप्टर वेगाने झाडांवर कोसळले. त्यानंतर आग लागली. अन्य एका प्रत्यक्षदर्शीने आपण जळणाऱया लोकांना आकांत करताना प्रत्यक्ष पाहिल्याचेही स्पष्ट केले.
हेलिकॉप्टरमधील मृतांची नावे…
- सीडीएस बिपिन रावत
- पत्नी मधुलिका रावत
- ब्रिगेडियर एलएस लिद्दर
- ले. क. हरजिंदर सिंह
- नायक गुरसेवक सिंह
- नायक जितेंद्र कुमार
- ले. नायक विवेक कुमार
- ले. नायक बी. साई तेजा
- हवालदार सतपाल
सच्च्या देशभक्ताला अखेरचा निरोप ! सोशल मीडियासह देशभर हळहळ-श्रद्धांजली
तामिळनाडूमध्ये घडलेल्या भीषण हेलिकॉप्टर दुर्घटनेनंतर देशभर हळहळ व्यक्त करण्यात आली. तसेच सोशल मीडियावर बिपिन रावत यांच्या निधनावर दुःख आणि खेद व्यक्त केला जात आहे. सर्वसामान्यांपासून राजकीय नेत्यांनी रावत यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले आहे. जनरल बिपिन रावत आणि त्यांच्यासोबत इतर लष्करी अधिकारी आणि कर्मचाऱयांच्या निधनावर देशभरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
जनरल बिपिन रावत हे शत्रूंशी थेट भिडणारे अधिकारी म्हणून ओळखले जातात. काश्मीरमधील फुटीरतावाद्यांना त्यांनी थेट आव्हान दिले होते. तसेच घुसखोरी केल्यास जमिनीत गाडू, अशा शब्दात त्यांनी पाकिस्तानला इशारा दिला होता. सोबतच मी माझ्या सैनिकांना लढायला सांगू शकतो, मरायला नाही असे देखील त्यांनी म्हटले होते. अशा लढवय्याचा हृदयद्रावक अपघातात मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद : जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका यांच्या अकाली निधनाने मला धक्का बसला आहे. देशाने आपला शूर पुत्र गमावला आहे. मातृभूमीसाठी त्यांची चार दशके निःस्वार्थ सेवा करतानाच अपवादात्मक शौर्य आणि पराक्रम दाखविला. त्यांच्या कुटुंबाप्रती माझ्या संवेदना. सच्चा देशभक्ताला सलाम !
पंतप्रधान नरेंद्र मोदी : सीडीएस बिपिन रावत यांची सेवा भारत कधीच विसरणार नाही. रावत हे एक उत्कृष्ट सैनिक होते. एक सच्चा देशभक्त, त्याने आपल्या सशस्त्र दलांचे आणि सुरक्षा यंत्रणेचे आधुनिकीकरण करण्यात मोठे योगदान दिले. सामरिक बाबींवर त्यांची अंतर्दृष्टी आणि दृष्टीकोन अचूक असे होते. त्यांच्या निधनाने मला खूप दुःख झाले आहे. ओम शांती.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह : जनरल रावत यांचे शौर्य देश कधीच विसरणार नाही. रावत यांच्या निधनामुळे लष्कराचे मोठे नुकसान झाले आहे. या कठीण प्रसंगात देश हेलिकॉप्टर दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसमवेत आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी : जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नीच्या कुटुंबियांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. घडलेली दुर्घटना ही मोठी शोकांतिका असून या कठीण काळात आमचे विचार त्यांच्या कुटुंबासोबत आहेत. प्राण गमावलेल्या इतर सर्वांबद्दलही मनापासून शोक. या दुःखात भारत एकजुटीने उभा आहे.