गुंजीत नागरिकांतून नाराजी : गटारी तुंबून दुर्गंधीने नागरिकांचे आरोग्य धोक्यात
वार्ताहर /गुंजी
गावच्या दक्षिणेकडील रस्त्यावरील सुस्थितीत असलेली सीडी जेसीबीच्या साहाय्याने उखडून टाकल्याने रस्ता वाहतुकीस बंद झाला. त्यामुळे नागरिकांची व शेतकऱयांची गैरसोय होत आहे. सीडी बंद झाल्याने गटारीमध्ये पाणी तुंबून दुर्गंधी पसरल्याने नागरिकांतून नाराजी पसरली आहे.
गेल्या सहा महिन्यांपूर्वी सदर सीडी जेसीबीच्या साहाय्याने उखडून टाकण्यात आली होती. मात्र, अद्याप त्या ठिकाणी कोणतीच दुरुस्ती केली नसल्याने गंभीर समस्या निर्माण झाली आहे. गावच्या दक्षिण बाजूने प्रवेश करण्याच्या रस्त्यावरील सीडी उखडून टाकली गेल्याने वाहने जाणे-येणे बंद झाले असून त्यांना वळसा घालून गावात प्रवेश करावा लागत आहे. त्याचबरोबर गटारीतील पाणी तुंबून राहिल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली असून नागरिकांचे आरोग्य धोक्मयात आले आहे.
वास्तविक ही सीडी चार वर्षांपूर्वी नव्याने बांधण्यात आली होती. मजबूत असताना ती का उखडली गेली? सदर सीडी उद्ध्वस्त करून काय साध्य केले. ती काढण्यासाठी पंचायतीने ठेकेदाराला आदेश दिले होते का? असे प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. केवळ पाण्याबरोबर माती वाहून जाऊन माती भरल्याने ती बंद झाली होती. त्यामुळे त्या ठिकाणी गटारीत पाणी तुंबले होते.
गैरसोय दूर करण्याची मागणी
येथील नागरिकांनी ग्रामपंचायतीला सदर सीडीत अडकलेली माती काढण्याची विनंती केली होती. मात्र, माती काढण्याऐवजी जेसीबीच्या साहाय्याने सीडीच उखडून टाकण्यात आली. मातीचे ढिगारे तसेच ठेवण्यात आले आहेत. ती उखडल्याने रस्ता बंद झाला, पाण्याचा निचराही न होता पाणी तुंबलेच आहे. तरी ग्रा.पं.ने लक्ष घालून त्वरित या सीडीचे बांधकाम करून नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे.