नवी दिल्ली / वृत्तसंस्था
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर केंद्रीय माध्यमिक शिक्षण विभागाने (सीबीएसई) दहावी आणि बारावीच्या उर्वरित परीक्षा रद्द केल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर आता पुढील प्रक्रिया हाताळण्याचा मार्ग सुकर झाल्याने सीबीएसई बोर्डाने 15 जुलैला निकाल जाहीर करण्याची घोषणा केली आहे. सीबीएसई बोर्डाचे परीक्षा नियंत्रक सन्यम भारद्वाज यांनी शुक्रवारी यासंबंधीची माहिती दिली. न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनुसार निकाल जाहीर केला जाणार असून बारावीचे विद्यार्थी आपल्या गुणांचे मूल्यांकन वाढवण्यासाठी परीक्षा देण्याचा पर्याय निवडू शकतात, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. प्रत्यक्ष परीक्षेला बसण्यासाठी इच्छुक असणाऱया विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेत मिळणारे गुण अंतिम समजले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दहावी विद्यार्थ्यांसाठी मात्र परीक्षेला बसण्याचा पर्याय उपलब्ध नसल्याचा निर्वाळा देत यापूर्वी घेण्यात आलेल्या परीक्षांमधील गुणांच्या आधारावरच त्यांचा निकाल जाहीर केला जाणार आहे.