प्रवाशांची गैरसोय : खासगी वाहनांचा आधार, बस सुरू करण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
सीबीटी-सांबरा विमानतळ बससेवा सुरू करण्याकडे दुर्लक्ष झाल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. बससेवेअभावी प्रवाशांना भाडय़ाची वाहने घेऊन शहर गाठावे लागत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने विमान, रेल्वे आणि बस वाहतुकीला प्रवाशांची संख्या वाढली आहे. विशेषतः लांब पल्ल्याचा विमानाने प्रवास करणाऱया प्रवाशांची संख्या वाढली आहे. मात्र सीबीटी-विमानतळ बससेवा नसल्याने प्रवाशांना मुख्य रस्त्यावरील बसथांब्यापर्यंत पायी अंतर गाठावे लागत आहे.
सहा महिन्यांपूर्वी परिवहनने सीबीटी-सांबरा विमानतळ बससेवा करण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या. त्यामुळे लवकरच सीबीटी विमानतळ बससेवा सुरू होईल असे वाटत होते. मात्र अद्याप बससेवा सुरू झाली नाही. आरटीपीसीरची सक्ती मागे घेण्यात आल्याने आंतरराज्य प्रवास करणाऱया प्रवाशांची संख्या वाढली आहे. शिवाय मंदिरेदेखील दर्शनासाठी खुली झाल्याने भाविकांची संख्या वाढली आहे. याबरोबर मुंबई, बेंगळूर व इतर शहरातून विमानाचा प्रवास वाढला आहे. वाढती प्रवाशांची संख्या लक्षात घेऊत सीबीटी-सांबरा विमानतळ बससेवा सुरू करावी, अशी मागणी होत आहे.
सांबरा विमानतळावरून बेंगळूर, मुंबई आणि दिल्ली या शहरांना विमानसेवा सुरळीत सुरू झाली आहे. स्पाईस जेट, स्टार एअर, इंडिगो, ट्रू जेट, अलायन्स एअर आदी विमान कंपन्यांकडून सेवा दिली जात आहे. बसस्थानकातून सांबरा विमानतळाला बससेवा नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. दरम्यान प्रवाशांना रिक्षा, टॅक्सीचा आधार घ्यावा लागत आहे. विमानतळावर बससेवा नसल्याने प्रवाशांना चालत सांबरा बसथांब्या गाठावा लागत आहे. तेथून पुढे खासगी वाहनांच्या प्रतीक्षेत थांबावे लागत आहे. त्यामुळे बसस्थानकातून विमानतळाला बससेवा पुरवावी, अशी मागणी प्रवाशांनी केली होती.