कंग्राळी खुर्द येथे तालुका म. ए. समितीच्यावतीने हुतात्म्यांना अभिवादन : केतूबाई पाटील यांचा साडीचोळी देऊन सन्मान : सीमाभाग कर्नाटकात डांबल्याने मराठी बहुभाषिकांवर मोठा अन्याय
वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
1956 साली मराठी बहुभाषिक असलेला सीमाभाग म्हैसूर राज्यात डांबण्यात आला आणि मराठी बहुभाषिकांवर मोठा अन्याय झाला. बेळगाव, कारवार निपाणीसह सीमाभागातील मराठी बांधव पेटून उठले. या अन्यायाला प्रत्युत्तर देण्यासाठी झालेल्या सत्याग्रहाला रोखण्यासाठी बेळगाव येथे झालेल्या गोळीबारात पै मारुती बेन्नाळकर, मधू बांदेकर, लक्ष्मण गावडे, महादेव बारागडी तर निपाणी येथे कमलाबाई मोहिते या हुतात्मा झाल्या. यामध्ये सत्याग्रही नागाप्पा होसूरकर, बाळू निलजकर, गोपाळ चौगुले यांची तुरुंगामध्ये प्राणज्योत मालवली. या सीमासत्याग्रहींचे बलिदान वाया न जाण्यासाठी सीमाप्रश्न सुटणे ही काळाची गरज असून त्यांना हीच खरी श्रद्धांजली ठरणार असल्याचे विचार तालुका म. ए. समितीच्यावतीने कंग्राळी खुर्द येथे सोमवारी हुतात्म्यांना अभिवादन करताना व्यक्त करण्यात आले.
सामाजिक अंतराने अभिवादन कार्यक्रम
तालुका म. ए. समितीचे सरचिटणीस ऍड. एम. जी. पाटील अभिवादनप्रसंगी प्रास्ताविकात म्हणाले, देशावर उद्भवलेली कोरोना महामारी आटोक्मयात आणण्यासाठी शासनाने घातलेल्या नियमांचे पालन करत हुतात्म्यांना अभिवादनचा कार्यक्रम पार पाडत असल्याचे सांगून 16 जानेवारी 1956 रोजी तात्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी बेळगाव, कारवार, निपाणीसह बहुभाषिक मराठी भाग म्हैसूर राज्यात विलीन केल्याची घोषणा केली. आणि हा दिवस सीमावासियांना काळा दिवस ठरला. 17 जानेवारी 1956 पासून महाराष्ट्रात जाण्यासाठी आम्ही सीमाबांधव अनेक आंदोलने करत आहोत. हुतात्म्यांना खरे अभिवादन हे आमचा मराठी बहुभाषिक भाग महाराष्ट्रामध्ये समाविष्ट झाल्यावरच ठरणार असल्याचे मनोगत व्यक्त केले.
तालुका म. ए. समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर म्हणाले, 1956 मध्ये मराठी बहुभाषिक सीमाभाग अन्यायाने कर्नाटक राज्यात डांबण्यात आला. हा सीमाभाग महाराष्ट्रात विलीन करावा म्हणून 17 जानेवारी 1956 रोजी बेळगाव येथे झालेल्या सत्याग्रहावेळी कर्नाटक सरकारने केलेल्या गोळीबारात वरील हुतात्म्यांनी आपल्या संसाराची पर्वा न करता हुतात्म्य पत्करले. 1956 सालापासून आम्ही सीमाबांधव कर्नाटक सरकारशी लोकशाहीमार्गाने झगडत आहोत. परंतु या निर्दयी सरकारला दया येत नाही. आम्ही हा लढा असा सुरूच ठेवणार. तसेच सीमाभाग महाराष्ट्रात विलीन झाल्यावरच या हुतात्म्यांना खरे अभिवादन ठरणार असल्याचे मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी कंग्राळी खुर्द गावचे सत्याग्रही हुतात्मा बाळू निलजकर यांच्या घराजवळील समाधीला कंग्राळी खुर्द ग्रा. पं. अध्यक्ष यल्लाप्पा पाटील, कंग्राळी खुर्द ग्राम सुधारणा अध्यक्ष आर. आय. पाटील, बी. डी. मोहनगेकर, अनंत निलजकर, आदींच्या हस्ते पूजन करून अभिवादन करण्यात आले.
गावच्या वेशीमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाचे पूजन माजी महापौर शिवाजी सुंठकर यांच्या हस्ते करण्यात आले. हुतात्मा पै मारुती बेन्नाळकर यांच्या फलकाचे पूजन माजी जि. पं. सदस्या सरस्वती पाटील व पौर्णिमा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान नामफलकाचे पूजन माजी ता. पं. सदस्य सुरेश राजूकर यांच्या हस्ते करण्यात आले.
ग्राम पंचायत कार्यालयासमोरील चौकामध्ये आयोजित केलेल्या अभिवादन कार्यक्रमामध्ये माजी आमदार मनोहर किणेकर यांच्या हस्ते हुतात्मा मारुती बेन्नाळकर यांच्या प्रतीमेला हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी तालुक्मयातील अनेक सीमावासियांनी हुतात्मा मारुती बेन्नाळकर यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून अभिवादन केले.
हुतात्मा बेन्नाळकरच्या मुलीचा सन्मान
या कार्यक्रमाचे औचित्य साधून ऐन तारुण्यात सीमावासियांवर झालेल्या अन्यायी सत्याग्रहामध्ये भाग घेऊन गोळीबारामध्ये हुतात्म्य पत्करलेले पै मारुती बेन्नाळकर यांची मुलगी केतूबाई पाटील हिचा पौर्णिमा पाटील यांच्या हस्ते साडी चोळीचा मान देऊन ओटी भरून सन्मान करण्यात आला.
शाहीर बाबुराव पाटील यांनी यावेळी हुतात्मा पै मारुती बेन्नाळकर यांच्या जीवनावरील पोवाडा, आपल्या मनोगतातून व्यक्त करून 17 जानेवारी 1956 सालच्या कर्नाटक सरकारच्या अन्यायाच्या आठवणी ताज्या केल्या.
शहर शिवसेनेच्यावतीने अभिवादन
कंग्राळी खुर्द येथील हुतात्मा चौकामध्ये बेळगाव जिल्हा शिवसेनेच्यावतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी बेळगाव जिल्हा शिवसेना उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर यांच्या हस्ते हुतात्मा पै मारुती बेन्नाळकर यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी शिवसेना तालुका प्रमुख सचिन गोरले, बेळगाव शहर उपप्रमुख प्रवीण तेजम, राजू तुडयेकर, प्रकाश राऊत, राजकुमार बोकडे आदींच्या हस्तेही अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रकाश हेब्बाजी, विनायक कोवाडकर, यल्लाप्पा मुसळे, मनोहर पाटील उपस्थित होते.
अभिवादनप्रसंगी कंग्राळी खुर्द ग्रा. पं. अध्यक्ष यल्लाप्पा पाटील, माजी ता. पं. सदस्य एस. एल. चौगुले, रावजी पाटील, मनोज पावशे, एपीएमसी सदस्य आर. के. पाटील, ता. पं. माजी सदस्य तानाजी पाटील, बी. एस. पाटील, यल्लाप्पा रेमाण्णाचे, एपीएमसी माजी अध्यक्ष आप्पा जाधव, मार्कंडेय साखर कारखाना संचालिका नीलिमा पावशे, माजी जि. पं. सदस्या प्रेमा पाटील, ता. पं. माजी सदस्य सुनिल अष्टेकर, ऍड. सुधीर चव्हाण, तम्माण्णा पाटील, तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती, युवा आघाडी अध्यक्ष संतोष मंडलिक, मारुती पाटील, बाळू पाटील, देसूरकर, ईश्वर गुरव, रामचंद्र मोदगेकर, एपीएमसी माजी अध्यक्ष मनोहर होसूरकर, नारायण पाटील, मनोहर पाटील, भैय्या पाटील, मनोहर हुंदरे, ग्रा. पं. सदस्य प्रशांत पाटील, जोतिबा पाटील, परशराम पाटील, राकेश धामणेकर, वैजनाथ बेन्नाळकर, यशोधन तुळसकर, सदस्या भाग्यश्री गौंडाडकर, सुनिता जाधव, ग्रा. पं. माजी अध्यक्ष भाऊ पाटील, अनिल सूर्यवंशी, रुक्मिणी निलजकर, ता. पं. माजी अध्यक्षा अर्चना अलगोंडी, योगेश पाटील, सदानंद चव्हाण, मल्लाप्पा पाटील, शिवाजी कुटे यांच्यासह बेळगाव तालुक्मयातील सीमाबांधव उपस्थित होते.