महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱयांना दिले आश्वासन
प्रतिनिधी / सांगली
सीमाबांधवांच्या पाठीशी महाराष्ट्र खंबीरपणे उभा आहे. हा प्रश्न तात्काळ सोडविण्यासाठी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्याशी महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदाराचे शिष्टमंडळ घेवून त्यांना या प्रश्नात लक्ष घालण्याची विनंती करणार असल्याची ग्वाही खासदार संजयकाका पाटील यांनी दिली.
खासदार संजयकाका पाटील यांना महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी समक्ष भेटून हा प्रश्न सुटेपर्यंत हा सीमाभाग केंद्रशासित करण्याची मागणी करणारे निवेदन दिले. त्यावेळी खासदार संजयकाका पाटील यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱयांना हे आश्वासन दिले. खासदार संजयकाका पाटील यांना महाराष्ट्र एकीकरण समितीचे माजी आमदार दिगंबर पाटील, महाराष्ट्र एकीकरण समिती बेळगाव शहरचे सरचिटणीस किरण गावडे, तालुका सरचिटणीस मनोज पावसे, माजी नगरसेवक बाळासाहेब काकतकर, माजी विरोधी पक्षनेते नेताजी जाधव, भूविकास बँकेचे चेअरमन मुरलीधर पाटील, प्रकाशराव चव्हाण, खानापूर तालुक्याचे कार्याध्यक्ष यशवंत बिर्जे, शहराध्यक्ष विवेक गिरी, चिटणीस महादेव घाडी यांनी हे निवेदन दिले.
महाराष्ट्र एकीकरण समितीचे माजी आमदार दिगंबर पाटील यांनी सीमाबांधवांची बाजू मांडताना सांगितले की, गेल्या 65 वर्षात कर्नाटकातील सरकारकडून मराठी भाषिकांच्यावर कोणकोणत्या आणि कशाप्रकारे अन्याय होत आहे. तसेच कर्नाटकातील आजपर्यंत आलेले कोणतेही सरकार बेळगाव आणि सीमाभागातून मराठी माणूस, मराठी संस्कार आणि मराठी संस्कृती कशी संपेल यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी आताच महाराष्ट्रातील सर्व खासदारांनी एकत्रित येवून आवाज उठविला पाहिजे त्यासाठी हा संपूर्ण सीमा भाग केंद्रशासित करावा अशी आमची आग्रहाची मागणी आहे. किरण गावडे म्हणाले, महराष्ट्र सरकारने हा प्रश्न सोडविण्यासाठी 2004 मध्ये सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. पण ही याचिका बोर्डावरच येवू नये यासाठी कर्नाटक सरकार प्रयत्न करत आहे.