पंढरपूर / प्रतिनिधी
बेळगाव सीमा प्रश्नाबाबत राज्य सरकारचे म्हणणे ऐकले जाईल का ? हा एक मोठा प्रश्न आहे. कारण कर्नाटक राज्यात व केंद्रात भाजपचे सरकार आहे. असे असले तरी कर्नाटकातील नेत्यांनी सीमा प्रश्नाचे राजकारण करू नये. संवादातून तोडगा काढावा. असे मत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी पंढरपुरात बोलताना व्यक्त केले.
आमदार रोहित पवार हे पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरामध्ये दर्शनासाठी आले होते. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. प्रसंगी आमदार संजयमामा शिंदे , मंदिर समिती सदस्य ह भ प ज्ञानेश्वर महाराज जळगावकर , महेश कोठे , अभिजीत पाटील आदी उपस्थित होते.
प्रसंगी पुढे बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले, बेळगावचा सीमाप्रश्नाबाबत कर्नाटकातील आमदार खासदार आणि इतर नेते आम्ही सोलापूर घेऊ. बेळगाव देणार नाही. अशी वक्तव्य करतात. मात्र तेथील नेत्यांची वक्तव्ये ही केवळ दिशाभूल करणारी व राजकारण करणारी आहेत. सीमा प्रश्नांचे राजकारण होऊ नये. महाराष्ट्राने कधीही बेळगावप्रश्नी राजकारण केले नाही. त्यामुळे कर्नाटकातील नेत्यांनी याचे भान राखले पाहिजे.
तसेच मराठी भाषिकांवर कायम दडपशाही होते. मात्र बेळगाव निपाणी भालकी येथील सर्व मराठी भाषिकांच्या पाठीशी महाराष्ट्र हा कायम उभा आहे.असे ते याप्रसंगी म्हणाले. सीमाप्रश्नाबाबतच्या तोडगा आमदार रोहित पवार यांनी पूर्णपणे कर्नाटकातील भाजपा सरकार आणि केंद्रातील भाजप सरकारच्या कोर्टत ढकलून दिला आहे.