खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांची म. ए. समिती शिष्टमंडळाला ग्वाही : सीमाप्रश्नाकडे केंद्र शासनाचे लक्ष वेधण्याची मागणी
प्रतिनिधी / खानापूर
खानापूर तालुका म. ए. समितीच्या शिष्टमंडळाने कोल्हापूर येथे खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांची भेट घेऊन सीमाप्रश्न राज्यसभेत मांडून केंद्र शासनाचे या प्रश्नाकडे लक्ष वेधावे, अशी मागणी केली.
यावेळी त्यांनी आपण सीमावासियांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, तसेच सीमाप्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर कसा पोहोचवता येईल, यासाठी वेगवेगळय़ा मार्गाने प्रयत्न करू. भविष्यात दिल्लीमध्ये महाराष्ट्रातील सर्व खासदारांसमवेत बैठकीचे नियोजन करू, अशी ग्वाही दिली. हा प्रश्न सुटावा यासाठी सीमाभागातील मराठी भाषिकांनी जो त्याग केला आहे, तो आम्ही कधीही विसरू शकत नाही. सीमाभागातील जनतेला लवकरात लवकर न्याय मिळण्यासाठी जे काही प्रयत्न करावे लागतील ते सर्व करू, असेही आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी समितीच्या शिष्टमंडळाने त्यांना निवेदनही सादर केले. त्यामध्ये महाराष्ट्रातील नेतेमंडळींनी काहीही करून प्रसंगी तडजोडीची भूमिका ठेऊन हा प्रश्न एकदा निकालात काढावा. अन्यथा, सीमाभागातील मराठी भाषेचे अस्तित्वच नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. यासाठी गेली 65 वर्षे दिलेला लढा वाया जाण्याचा धोकाही निर्माण झाल्याने आता कुठल्याही परिस्थितीत शक्य तेवढय़ा लवकर या प्रश्नाची सोडवणूक करून घ्यावी, अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे.
या शिष्टमंडळात म. ए. समितीचे अध्यक्ष माजी आमदार दिगंबर पाटील, कार्याध्यक्ष यशवंत बिर्जे, सचिव आबासाहेब दळवी, भू-विकास बँकेचे अध्यक्ष मुरलीधर पाटील, प्रकाश चव्हाण, शहराध्यक्ष विवेक गिरी यांचा सहभाग होता.
यानंतर शिष्टमंडळाने एन. डी. पाटील यांच्या निवासस्थानी जावून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यांच्या पत्नी सरोजा (माई) पाटील यांची भेट घेऊन त्यांनाही निवेदन सादर केले. यावेळी त्यांच्या समवेत सीमाभागातील राजकीय घडामोडींसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.
सीमाभागातील घडामोडींबद्दल आपण गांभीर्याने विचार करून सीमाभागातील नेत्यांना योग्य भूमिका घेण्याची समज द्यावी, अशी मागणी केली. यावेळी आपण सीमावासियांच्या भावनांशी सहमत असून तुमच्या पाठीशी खंभीरपणे उभे राहू, तसेच महाराष्ट्रात वरिष्ठ पातळीवर जे काही करता येणे शक्य आहे, ते आपण निश्चित करू. तसेच शरद पवार यांना आपण सीमाप्रश्नासाठी पुन्हा एकदा पुढाकार घेऊन तडजोडीच्या भूमिकेतून योग्य तोडग्याद्वारे हा प्रश्न निकालात काढण्यासाठी प्रयत्न करण्याची विनंती करू, अशी ग्वाही दिली.
त्यांनाही भेटलेल्या शिष्टमंडळात माजी आमदार दिगंबर पाटील, यशवंत बिर्जे, आबासाहेब दळवी, मुरलीधर पाटील, प्रकाश चव्हाण, विवेक गिरी यांचा समावेश होता.