खानापुरात हुतात्म्यांना अभिवादन : समितीच्या दोन्ही गटात ऐक्य साधण्याच्या प्रयत्नांना यश : कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित
प्रतिनिधी /खानापूर
एखाद्या लढय़ासाठी हुतात्म्यांनी दिलेले बलिदान वाया जात नाही, हा इतिहास आहे. सीमाप्रश्नासाठी अनेकांनी हौतात्म्य पत्करले. गेल्या 66 वर्षात सर्व प्रकारचे लढे देऊनही सीमाप्रश्न सुटला नाही. आता हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात गेला असून त्या ठिकाणी सीमाभागातील जनतेला न्याय मिळेल, यात तिळमात्र शंका नाही. पण जोपर्यंत सीमाप्रश्नाची सोडवणूक होत नाही तोपर्यंत मराठी भाषिकांनी आपले ऐक्य अबाधित राखणे हीच हुतात्म्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन माजी आमदार दिगंबर पाटील यांनी खानापूर स्टेशनरोडवरील कै. नागाप्पा होसूरकर हुतात्मा स्मारकासमोर हुतात्म्यांना अभिवादन करताना व्यक्त केले. प्रारंभी कै. नागाप्पा होसूरकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी कुप्पटगिरी ग्रामस्थांच्यावतीनेही हुतात्मा नागाप्पा होसूरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली.
शिवसेनेच्यावतीने राज्य उपाध्यक्ष के. पी. पाटील, तालुका प्रमुख दयानंद चोपडे तसेच म. ए. समिती युवा आघाडीच्यावतीने अध्यक्ष धनंजय पाटील यांनी कै. नागाप्पा होसूरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी निरंजन सरदेसाई म्हणाले, सीमाप्रश्नासाठी सर्वांना एकत्र येऊन न्यायालयीन लढाईबरोबरच रस्त्यावरच्या लढाईसाठी तयार राहावे लागणार आहे, जोपर्यंत हा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत सर्व मतभेद वेशीवर टांगून सर्वांनी समितीच्या झेंडय़ाखाली एकत्र येणे हीच हुतात्म्यांना श्रद्धांजली ठरेल. शिवसेनेचे राज्य उपाध्यक्ष के. पी. पाटील म्हणाले, जोपर्यंत प्रश्न सुटत नाही तोपर्यंत एकाही मराठी माणसाने समितीशी प्रतारणा करू नये. समितीच्या नावाखाली निवडून येऊन समितीशी द्रोह करणाऱयांना हुतात्मे कदापिही माफ करणार नाहीत, याची जाणीव संबंधितांनी ठेवावी. शिवसेनेच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन सर्वांनी एकत्रित हुतात्मा दिन साजरा केला. सीमाप्रश्नाच्या आणि समितीच्या ऐक्याच्य़ादृष्टीने हे पहिले पाऊल म्हणावे लागेल. सर्वांनी प्रयत्न करून सीमाप्रश्नाची लवकरात लवकर सोडवणूक करून घेणे हीच हुतात्म्यांना श्रद्धांजली होय.
युवा समिती अध्यक्ष धनंजय पाटील म्हणाले, सीमाप्रश्नासाठी अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. काहींना हौतात्म्य पत्करावे लागले, याची जाण मराठी भाषिकांनी ठेवून चळवळीला अधिक बळकटी येण्यासाठी समितीच्या झेंडय़ाखाली एकसंघ राहणे हीच हुतात्म्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. यशवंत बिरजे म्हणाले, मराठी भाषिकांवर कर्नाटक सरकारने अजूनही जुलूम सुरूच ठेवले आहेत. मराठी भाषिकांची आंदोलने दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. कर्नाटक सरकारने मराठी भाषिकांना कितीही दडपण्याचा प्रयत्न केला तरी मराठी जनता आपल्या निर्धारापासून हटणार नाही. उलट मराठी भाषिकांच्या सीमाप्रश्नाविषयीच्या भावना अधिकच ज्वलंत होतील, यात शंका नाही. सीमाप्रश्नाची सोडवणूक होईपर्यंत मराठी भाषिकांनी सर्व मतभेद बाजूला सारून एका झेंडय़ाखाली येऊन लढा देणे हीच हुतात्म्यांना खरी श्रद्धांजली ठरू शकेल.
जि. पं. माजी सदस्य जयराम देसाई म्हणाले, मराठी भाषिक जनता सीमाप्रश्नासाठी गेली 66 वर्षे सातत्याने लढा देत आहे. सीमाभागातील जनतेची महाराष्ट्रात जाण्याची मागणी न्यायाची आहे. सीमालढय़ात अनेकांनी हौतात्म्य पत्करले. हुतात्म्यांचे बलिदान वाया जात नाही, हा इतिहास आहे. जोपर्यंत सीमाप्रश्न सुटत नाही तोपर्यंत कशाचीही पर्वा न करता सर्व मराठी भाषिकांनी म. ए. समितीच्या झेंडय़ाखाली एकसंघ राहणे हीच हुतात्म्यांना श्रद्धांजली ठरू शकेल.
शिष्टमंडळ दिल्लीला नेण्याचा आग्रह
जि. पं. माजी सदस्य विलास बेळगावकर म्हणाले, सीमाप्रश्नाच्या शिष्टमंडळाने आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन सीमाप्रश्न सोडविण्याचा आग्रह धरला पाहिजे.नरेंद्र मोदी यांनी गेल्या सात वर्षात देशातील अनेक जटिल प्रश्न मार्गी लावले. त्यांनी सीमाप्रश्नातही लक्ष घालून मराठी भाषिकांना न्याय द्यावा, अशी विनंती केली.
समितीच्या दोन्ही गटात ऐक्य साधण्यासाठी प्रयत्न करणारे पुंडलिक पाटील, कृष्णा कुंभार यासह ता. पं. सदस्य बाळाराम शेलार, प्रकाश चव्हाण, ता. पं. माजी सदस्य चंद्रकांत देसाई, भू-विकास बँकेचे अध्यक्ष मुरलीधर पाटील, ता. पं. माजी सदस्य महादेव घाडी, डी. एम. गुरव, ता. पं. माजी सदस्या कविता कुंभार, माजी नगरसेवक अनिल पाटील, नारायण कापोलकर, ऍड. अरुण सरदेसाई, जि. पं. माजी सदस्य विशाल पाटील, माजी नगराध्यक्ष प्रताप सरदेसाई, विवेक गिरी, रुक्माण्णा झुंजवाडकर, शिवस्मारकचे अध्यक्ष एम. पी. पाटील, दयानंद चोपडे, आबासाहेब दळवी यांनीही हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
आवाहनाला प्रतिसाद
हुतात्मा दिन सर्वांनी एकत्रितपणे पाळून समितीच्या ऐक्याचा तालुक्याला संदेश द्यावा, असे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार म. ए. समिती दोन्ही गट, शिवसेना तसेच विविध संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते. हुतात्म्यांना अभिवादनप्रसंगी म. ए. समितीचे माजी आमदार कै. एल. बी. बिरजे गुरुजी, कै. निळकंठराव सरदेसाई, कै. व्ही. वाय. चव्हाण व कै. अशोक पाटील यांच्या सुपुत्रांनीही उपस्थिती दर्शविली.
समितीचे ज्येष्ठ नेते देवापण्णा गुरव यांनी कै. नागाप्पा होसूरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. माजी सभापती मारुती परमेकर म्हणाले, सीमाप्रश्नासाठी अनेकांनी हौतात्म्य पत्करले. हा प्रश्न सुटेपर्यंत लढा अधिक बळकट करणे काळाची गरज आहे. आयाराम-गयारामांमुळे समिती संपणार नाही. उलट ती अधिक बळकट होऊन सीमाप्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाही. सीमाप्रश्नाची सोडवणूक करून घेणे हीच हुतात्म्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे सांगितले.
मार्केटिंग सोसायटीचे माजी चेअरमन गोपाळ पाटील, गोपाळराव देसाई, ता. पं. माजी सदस्य पांडुरंग सावंत, पी. एच. पाटील यांनीही विचार व्यक्त केले.
हुतात्मा नागाप्पा होसूरकर यांच्या पत्नीला साडी-चोळी अर्पण
सीमालढय़ात हौतात्म्य पत्करलेल्या तालुक्यातील कुप्पटगिरी गावचे कै. नागाप्पा होसूरकर यांच्या पत्नी नर्मदा होसूरकर या निडगल येथे वास्तव्यास आहेत. हुतात्मा दिनाचे औचित्य साधून महालक्ष्मी गो-शाळा सन्नहोसूरचे अध्यक्ष भरमाणी पाटील यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना साडी-चोळीसह आर्थिक साहाय्य केले. यावेळी नर्मदा होसूरकर यांनी माझ्या पतीचे हौतात्म्य वाया जाणार नाही. सीमाप्रश्न नक्कीच सुटेल, याची मला खात्री आहे. पण तो माझ्या हयातीत सुटावा, यासाठी मी नेहमी देवाकडे प्रार्थना करत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी भरमाणी पाटील यांच्यासमवेत करंबळ ग्रा. पं. उपाध्यक्ष नारायण पाटील, सदस्य उदय भोसले, विनायक सुतार, यल्लाप्पा नलवडे यासह निडगलमधील समिती कार्यकर्ते उपस्थित होते.