वार्ताहर/ किणये
गेल्या 64 वर्षांपासून सीमाप्रश्नासाठी आपण लढा देत आहात. तुमच्या त्यागाला, बलिदानाला नक्कीच यश मिळणार. सीमाप्रश्नाचा लढा न्यायप्रविष्ट असून न्यायदेवता न्याय देईल, अशी आशा आम्हा सर्वांना आहे. सीमाभागातील साहित्य संमेलनामुळे सीमालढय़ाला बळ मिळते. तुम्ही सीमावासीय मराठी भाषेचे सीमेवरचे रक्षक आहात. अन्यायाशी झगडत तुम्ही मराठीचा झेंडा डौलाने फडकवत ठेवला आहात, असे उद्गार उचगाव येथील 18 व्या मराठी साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्ष या नात्याने प्रा. मिलिंद जोशी यांनी काढले.
ते पुढे म्हणाले, महाराष्ट्रात साहित्यिक आणि विचारवंत नेहमीच सीमावासियांसोबत आहेत. कसदार साहित्यामुळे माणसाचे भावनिक आणि वैचारिक भरणपोषण होते. ज्यांच्या डोळय़ात अश्रू येऊ शकतात, तेच इतरांचे अश्रू पुसू शकतात. अशी हाडामांसाची संवेदनशील माणसे घडवायची असतील तर तंत्रज्ञानाच्या जोडीला जगण्याचे तत्वज्ञानही हवे. माणसाच्या विवेकशक्ती साहित्यमुळेच समाजाच्या नैतिक आणि भौतिक जीवनाची दरी कमी होऊ शकते.
साहित्य संमेलन ही मराठी समाजाचा वाङ्मयीन उत्सव आहे. त्यामुळे अशा संमेलनाला वडीलधारी मंडळींनी आपल्या मुलांना आवर्जुन आणले पाहिजे. लेखकाला एखादा विचार सुचला तर तो आपल्या मनाशी बोलतो आणि नंतर कागदावर लिहितो. श्रवण हे ज्ञानसंपादनाचे साधन आहे. साहित्याचे वैशिष्टय़ म्हणजे जीवन नावाचे पुस्तक आहे.
एकलेपणाच्या मानसिकतेमुळे ध्यान क्षेत्राचे आणि विचार क्षेत्राची आज अपरिमित हानी होताना दिसत आहे. समाजातील बुद्धिवंतांना न्यूनगंडाने आणि भयगंडाने पछाडले आहे. आपल्या सत्वाच्या बळावर आपण वाटचाल करू शकणार नाही याचा न्यूनगंड आणि आपण व्यवस्थेशी जुळवून घेतले नाही तर आपले काय होणार याचा भयगंड दिसून येतो.
समाजाला साहित्याभिमुख करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे. वडीलधारी माणसे आणि शिक्षक वाचताना दिसले तरच पुढची पिढी वाचणार आहे. शाळेतील स्नेहसंमेलने महत्त्वाची आहेत. पु. ल. देशपांडे यांचे पहिले भाषण शाळेच्या संमेलनातच झाले होते. त्यामुळे मुलांना स्नेहसंमेलन, साहित्य संमेलनाची आवड निर्माण करा. आई हे जगातले सर्वात मोठे विद्यापीठ आहे. मुलांना कथा, बोधकथा सांगण्याची गरज आहे. अन्यथा ती तंत्रज्ञानाच्या आहारी जातील.
आपली भाषा आणि संस्कृती टिकविण्यासाठी आपल्यातील मराठीपणाची ज्योत तेवत ठेवणे महत्त्वाचे आहे. भाषा आणि संस्कृतीची स्पंदने प्रथम मनात उमटतात. नंतर ती उच्चारातून आणि कृतीतून प्रकट होतात. आपले भाषाप्रेम आंतरिक जाणीवेतून प्रकट होत राहिले तर भाषा आणि संस्कृती कधीच मागे राहणार नाही.
लेखन ही केवळ शब्दांची आतषबाजी नाही. ती जीवनाची उपासना आहे. खेळाडू सराव करतात. गायक रियाज करतात. नट तालीम करतात. तशीच साहित्यिकांनी साधना केली पाहिजे. पोकळ शब्दांना काहीच अर्थ नसतो. शब्दांमागे लेखकाला प्रतिभेचे, अनुभवाचे आणि साधनेचे संचित उभे करावे लागते. तेव्हाच शब्दांना अर्थगांभीर्य प्राप्त होते.
धमक्यांचा तीव्र निषेध
मराठी भाषिकांना ज्या धमक्या दिल्या जात आहेत. त्याचा मी तीव्र निषेध व्यक्त करतो. आणि याच निषेधाचा ठराव हा अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये मांडला जाईल आणि सीमावासियांचा आवाज बुलंद केला जाईल. याच आश्वासनही देऊन वचनपूर्ती करणार असेही संमेलनाध्यक्ष प्रा. जोशी यांनी सांगितले.
सत्य नेहमीच अल्पमतात
पत्रकार, साहित्यिक, कलावंत, संशोधक आपल्या लेखनातून, संशोधनातून सत्याचाच शोध घेत असतात. सत्याला हिरवा, पिवळा असा कसलाही रंग नसतो. सत्य डाव्याही बाजूचे नसते अन् उजव्याही बाजूचेही नसते. कोणतीही बाजू सत्य घेत नाही. ते कधीही मध्यममार्ग स्वीकारत नाही. सत्याच्या पाठीशी बहुमत कधीच नसते. सत्य नेहमीच अल्पमतात असते. तरीही सत्याचे मोल कधीही कमी होत नाही, असेही प्रा. जोशी यांनी सांगितले.
वैशिष्टय़पूर्ण ग्रंथदिंडी ठरली लक्षवेधी
उचगाव मराठी साहित्य अकादमी आयोजित अठराव्या उचगाव मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात सकाळी गांधी चौकातील गणेश-विठ्ठल मंदिराच्या प्रांगणातून झाली. ज्ञानेश्वर माऊलीची ‘ऐसी अक्षरे रसिके मेळविन’ या उक्तीच्या संकल्पनेवर आधारित ग्रंथदिंडी वैशिष्टय़पूर्ण ठरली.
गंथदिंडीमध्ये सर्वप्रथम लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीचा नेतृत्वधारी फलकासोबत सर्व कर्मचारीवर्ग, त्यामागे शिवशाहीची आठवण करून देणारा राजेशाही पोशाखातील ध्वजधारी तसेच ठळकवाडी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा आकर्षक लेझीम मेळा, तुतारी, सनई-चौघडा, बँड-झांजपथक तसेच दिंडीमध्ये प्राथमिक मराठी शाळेच्या कलश घेऊन चालणाऱया मुली सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या. याबरोबरच महिला मंडळ, युवक मंडळ, ज्ञानेश्वर भजनी मंडळ, वारकरी सांप्रदाय, उचगाव पंचक्रोशीतील विविध गावातील भजनी मंडळे, अकादमीचे कार्यकारी सदस्य, ग्राम पंचायत सदस्य, सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांचा सहभाग लक्षणीय होता.
प्रारंभी आर. वाय. पाटील यांच्या हस्ते गणेशपूजन, अशोक कांबळे यांच्या हस्ते विठ्ठल-रखुमाई पूजन, डॉ. प्रविण देसाई यांच्या हस्ते श्रीराम पूजन, डॉ. ज्ञानेश्वर कोवाडकर यांच्या हस्ते पालखी पूजन, ग्रंथदिंडीचे उद्घाटन सुनील भोसले यांच्या हस्ते झाल्यानंतर ग्रंथदिंडी गणपत गल्ली, छत्रपती शिवाजी महाराज चौक, कोवाड रोड, मळेकरणी आमराई मार्गातून ग्रंथदिंडी संमेलनस्थळी आल्यानंतर डॉ. मोहन पावशे यांच्या हस्ते मळेकरणी देवीचे पूजन, रमेश गोरल यांच्या हस्ते पुस्तक प्रदर्शन उद्घाटन, राजेंद्र बाडीवाले यांच्या हस्ते सभामंडपाचे उद्घाटन, महादेव तरळे यांच्या हस्ते व्यासपीठाचे उद्घाटन, सरस्वती फोटोपूजन विनय कदम, ज्ञानेश्वर फोटोपूजन डॉ. धाकलू कदम, छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोचे पूजन युवराज मुतकेकर, शहीद राहुल सुळगेकर फोटो पूजन नागेश झंगरुचे यांच्या हस्ते केले. संमेलनाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत रोपटय़ाला पाणी घालून करण्यात आले.
संमेलनातील ठराव
उचगाव साहित्य संमेलनात सीमाप्रश्नी चार ठराव मांडून ते टाळय़ांच्या कडकडाटात संमत केले. विजय खांडेकर यांनी या ठरावांचे वाचन केले.
1) सीमाप्रश्न सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे. दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या या प्रश्नामुळे दोन भाषिकांमध्ये, दोन राज्यांमध्ये वैरत्वाची भावना निर्माण झाली आहे. निकोप समाज व्यवस्थेसाठी हे धोक्मयाचे ठरते. यासाठी या प्रश्नाची लवकरात लवकर सोडवणूक व्हावी. त्यासाठी महाराष्ट्र व केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा, अशी मागणी हे संमेलन करत आहे.
2) भारतीय राज्यघटनेने देशातील सर्व धर्मियांना व भाषिकांना समान न्याय देण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे. घटनेचा आदर सर्वांनी राखला पाहिजे. सीमाभागात 15 टक्क्मयांहून अधिक असणाऱया मराठी भाषिकांना त्यांच्या भाषेत सर्व सरकारी कागदपत्रे, परिपत्रके देण्याची सूचना भाषिक अल्पसंख्याक आयोगाने तसेच उच्च न्यायालयाने केली आहे. या सूचनांची व आदेशाची कार्यवाही व्हावी.
3) विविधतेतील एकता हे आपल्या देशाचे वैशिष्टय़ आहे. प्रत्येकाला आपली भाषा व संस्कृती जपण्याचा अधिकार घटनेने दिला आहे. त्यावर कोणीही आघात करू नये. देशात राष्ट्र व राष्ट्रभाषेला प्रथम प्राधान्य देऊन देशातील सर्वधर्मीय व सर्व भाषिकांमध्ये एकोपा व सामंजस्य राखण्याचा प्रयत्न करावा.
4) सीमाभागात होणारी सर्व मराठी साहित्य संमेलने मराठी भाषा, साहित्य व संस्कृती जपण्याचे कार्य करणाऱया सर्व संघ, संस्था यांना महाराष्ट्र शासनाने तातडीने अर्थसाहाय्य मंजूर करावे.
मळेकरणी हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी स्वागतगीत म्हटले.
नामवंतांन् ाा श्रद्धांजली
अभिनेते रमेश भाटकर, ज्ये÷ साहित्यिक विष्णू सूर्या वाघ, डॉ. शिवकुमार स्वामी, माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, अभिनेते डॉ. श्रीराम लागू, समितीचे ज्ये÷ नेते गणपतराव पावशे, शहीद राहुल भैरू सुळगेकर, माजी राज्यसभा सदस्य डी. पी. त्रिपाठी तसेच उचगाव पंचक्रोशीतील अनेकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
उपस्थित पत्रकारांचा गौरव
जनतेचेच प्रश्न जनतेसमोर मांडण्यासाठी रात्रीचा दिवस करून, सातत्याने अनेक कणखर समस्यांचा सामना करत पत्रकारिता करणाऱया सर्व उपस्थित पत्रकारांचा सन्मान झाला पाहिजे, या उद्देशाने उचगाव मराठी साहित्य अकादमीतर्फे उपस्थित पत्रकारांचा पत्रकार दिनाचे औचित्य साधून भेटवस्तू देऊन सन्मान केला.
स्वागताध्यक्ष लक्ष्मण होनगेकर यांनी साहित्याची ही हाती घेतलेली चळवळ गेली अठरा वर्षे पुढे नेत असल्याचे आपल्या स्वागतपर भाषणात सांगितले. यावेळी सर्व प्रमुख अतिथी व साहित्यिकांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय खांडेकर यांनी केले. तर अकादमीचे सेपेटरी एन. ओ. चौगुले यांनी आभार मानले.
याबरोबरच एस. एल. चौगुले, शेखर हंडे, बी. एस. होनगेकर, गोविंद वाळके, बाळाराम पाटील, मोहन बेळगुंदकर, बाळकृष्ण लामजी, अशोक धनवडे या मान्यवरांच्या हस्ते विविध पूजा करण्यात आल्या.
संत साहित्यच मराठी साहित्याचा पाय
ज्ञानेश्वरांनी 12 व्या शतकात मराठीचा जागर करून संत महात्म्याचे साहित्य श्रेष्ठ ठरविले. मराठी संस्कृतीच्या रथाचा आस म्हणजे संत साहित्य होय त्याची प्रतिष्ठा तोपर्यंत आहे. तोपर्यंत हा रथ वेगानेच धावत राहील. संत साहित्य हाच सर्व प्रकारच्या मराठी साहित्याचा पाया आहे, असे संगमनेर येथील हभप राजेंद्र महाराज येवले यांनी काढले. ते संमेलनाच्या तिसऱया सत्रात ‘संत साहित्य’ यावरील व्याख्यानात बोलत होते.
माणसा-माणसातील संवाद वाढला की माणसं जवळ येतात आणि माणसं विचार व मनाने जवळ झाली की माणुसकीचे नातं तयार होतं यातून एक चांगले कार्य घडत.
जगद्गुरू तुकोबा-ज्ञानोबांनी भगवान परमात्म्याचे अनुकरण केले आणि ते श्रेष्ठ झाले. त्या ज्ञानोबा तुकोबांचे अनुकरण केल्यास समाज समृद्ध होईल, असे त्यांनी सांगितले. संत साहित्य चिरंतन टिकणारे सत्य आहे. याला काळाचे बंधन नाही. आजपर्यंत संतांनी शिकविलेल्या मानवतावादी दृष्टीकोन या शतकातही लागू होतो. याबरोबर ज्ञान आणि अध्यात्म एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे विज्ञान व अध्यात्माता घेऊनच जीवनाचा उद्धार केला पाहिजे.
माणसाला माणसातला देव समजत नाही. तोपर्यंत देवळातला देव समजत नाही. त्यामुळे प्रथमता माणसाने देव समजून घ्यावा. जोपर्यंत गोठय़ातील गाय, घरातील माय, अंगणातील तुळस आहे. तोपर्यंत मराठी वाढतच जाणार असल्याचे ते म्हणाले.