ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
पूर्व लडाखमधील सीमाभागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारत आणि चीन या दोन्ही देशांनी आपले सैन्य मागे घेण्यास सहमती दर्शवली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने याबाबतची माहिती दिली आहे.
लडाखमधील सीमावादावर शुक्रवारी दोन्ही देशांच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांमध्ये ऑनलाईन बैठक झाली. दोन्ही देशांच्या द्विपक्षीय संबंधाच्या सर्वांगीण विकासासाठी सीमाभागात शांतता आवश्यक आहे. त्यामुळे द्विपक्षीय करार आणि शिष्टाचारानुसार सीमा भागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी दोन्ही देशांनी सीमा भागातील सैन्य मागे घेण्यावर एकमत झाले.
या सीमावादावर अनेकदा बैठका झाल्या. तरी देखील चीनने या भागात सैन्य आणि शस्त्रास्त्रांची जमवाजमव केली होती. त्यामुळे दोन्ही देशातील तणाव आणखी वाढला होता. मात्र, काल झालेल्या बैठकीतील समझोत्याची प्रामाणिकपणे अंमलबजावणी व्हावी, यावरही दोन्ही देशांची सहमती झाली आहे.
दोन्ही देशांच्या बैठकीत भारतीय प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व परराष्ट्र मंत्रालयातील पूर्व आशिया विभागाच्या संयुक्त सचिवांनी केले. तर चीनचे नेतृत्व चीनच्या परराष्ट्र मंत्रालयातील सीमा आणि सागरी विभागाच्या महासंचालकांनी केले.