प्रतिनिधी / बेळगाव
सीमाप्रश्न लोकसभेने निर्माण केलेला प्रश्न आहे. त्यामुळे त्याची सोडवणूक लोकसभेत होणे गरजेचे आहे. तसेच या प्रश्नाच्या न्यायालयीन लढाईचा निकाल लागेपर्यंत सीमाभाग केंद्रशासित होणे काळाची गरज आहे असे विचार शहर म. ए. समितीचे अध्यक्ष किरण ठाकुर यांनी व्यक्त केले. हुतात्मा दिनाच्या निमित्ताने हुतात्मा चौक येथे झालेल्या अभिवादन प्रसंगी त्यांनी आपले विचार मांडले तसेच सीमाप्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्रातील खासदारांनी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रारंभी हुतात्मा चौक येथे हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर तेथुन अभिवादन फेरी काढण्यात आली. पुढे शहरातील मुख्य मार्गावरून फिरून पुन्हा हुतात्मा चौक येथे आली. याठिकाणी मान्यवरांनी आपले विचार मांडले. हुतात्मा दिनाच्या या अभिवादनप्रसंगी मध्यवर्ती म.ए .समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, माजी महापौर मालोजी अष्टेकर, सरीता पाटील ,माजी नगरसेवक पंढरी परब, बाळासाहेब काकतकर, महिला आघाडीच्या अध्यक्षारेणू किल्लेकर यांच्यासह अनेक आजी–माजी लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते बहुसंख्येने सहभागी झाले होते.