शिवसेनेची मागणी : महाराष्ट्राच्या राज्य मंत्र्यांकडून पाठपुराव्याचे आश्वासन
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगावमध्ये मागील 68 वर्षांपासून सीमाआंदोलन सुरू आहे. बेळगाव हा महाराष्ट्राचा अविभाज्य घटक असून या ठिकाणी असणाऱया लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र सरकारने बेळगावमध्ये सीमा समन्वय कार्यालय स्थापन करावे, अशी मागणी बेळगाव सीमाभाग शिवसेनेतर्फे महाराष्ट्राचे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर यांच्याकडे केली आहे.
सोमवारी शिवसेना पदाधिकाऱयांनी जयसिंगपूर येथे राजेंद्र यड्रावकर यांची भेट घेऊन त्यांना आपल्या समस्या समजावून सांगितल्या. ठाकरे सरकारने सत्तेवर येताच सर्वप्रथम सीमा समन्वय मंत्र्यांची नेमणूक केली. सीमासत्याग्रहासाठी तुरुंगवास भोगलेल्या एकनाथ शिंदे व छगन भुजबळ यांना सीमा समन्वय मंत्र्यांची जबाबदारी देण्यात आली. या दोन्ही नेत्यांकडून सर्वोच्च न्यायालयात असणाऱया खटल्याचा वारंवार पाठपुरावा केला जात आहे.
याच पद्धतीने सीमाभागात जर सीमा समन्वय कार्यालय झाल्यास त्याचा फायदा येथील मराठी भाषिकांना होणार आहे. विद्यार्थी, न्यायालयीन कामे, नोकरी यासाठी हे कार्यालय महत्त्वाचे ठरेल. यामुळे येथील मराठी भाषिकांना इतरत्र धावपळ करावी लागणार नाही. यड्रावकर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर हे कार्यालय सुरू करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख अरविंद नागनुरी, उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर, शहर प्रमुख दिलीप बैलूरकर, तालुका प्रमुख सचिन गोरले, प्रवीण तेजम, राजकुमार बोकडे, राजू तुडयेकर, रविंद्र जाधव, पावशे अण्णा, प्रकाश राऊत, महिपाल चिट्टाप्पाचे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.