मतभेद विसरून सर्वांना एकत्र येण्याचे आवाहन : कंग्राळी खुर्द येथे म. ए. समितीतर्फे सीमा चळवळीतील हुतात्म्यांना अभिवादन
वार्ताहर / कंग्राळी खुर्द
20 लाख मराठी भाषिक असलेल्या महाराष्ट्राचा भाग अन्यायाने त्यावेळच्या म्हैसूर राज्यात डांबण्यात आला. या विरोधात 17 जानेवारी 1956 रोजी सीमाभागात गोंधळ उडाला. सकाळपासून सीमावासीय रस्त्यावर उतरले. सीमा आंदोलनातील पहिला लढा दडपून टाकण्यासाठी म्हैसूर पोलीस आक्रमक झाले. त्यांनी गोळीबार केला. यावेळी मारुती बेन्नाळकर, महादेव बारागडी, लक्ष्मण गावडे, मधु बांदेकर, कमळाबाई मोहिते यांनी या लढय़ासाठी पहिले बलिदान दिले. शिवाय नागाप्पा होसुरकर, बाळू निलजकर यांचा कारागृहात मृत्यू झाला. त्यानंतर 1986 च्या कन्नड सक्ती आंदोलनात अनेक जण हुतात्मे झाले. 1969 साली शिवसेनेने उग्र आंदोलन केले. यामध्ये 69 जण हुतात्मे झाले. हा सीमाप्रश्नाचा इतिहास आहे. याला स्मरून सर्वांनी आपापसातील मतभेद विसरून सीमाप्रश्नासाठी एकत्र येऊ या, असे आवाहन मनोज पावशे यांनी कंग्राळी खुर्द येथे हुतात्म्यांना अभिवादन करताना काढले.
17 जानेवारी हुतात्मा दिनानिमित्त हुतात्म्यांना अभिवादन कार्यक्रम कंग्राळी खुर्द येथे झाला. या अभिवादन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कै. माजी आमदार बी. आय. पाटील यांच्या पत्नी प्राध्यापिका पौर्णिमा पाटील होत्या. व्यासपीठावर मनोज पावशे, अशोक पाटील, यल्लाप्पा बेळगावकर, लक्ष्मीबाई बेन्नाळकर, ग्रा. पं. माजी अध्यक्ष अर्चना आलगोंडी, माजी नगरसेविका नीलिमा पावशे उपस्थित होत्या.
यावेळी कंग्राळी खुर्द गावचे शाहीर बाबुराव पाटील यांनी मारुती बेन्नाळकर यांच्यावरील पोवाडा गायिला. त्यानंतर हुतात्मा मारुती बेन्नाळकर यांच्या पत्नी लक्ष्मीबाई बेन्नाळकर यांना साडी-चोळीचा आहेर देण्यात आला.
यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना पौर्णिमा पाटील म्हणाल्या, सीमाप्रश्नासाठी अनेक जणांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आणि हुतात्मे झाले. त्यांच्या प्राणाचे बलिदान वाया जाता कामा नये. सीमाप्रश्न सुटावा, अशी अनेकांची तळमळ आहे. ती लवकरात लवकर पूर्ण व्हावी यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. यावेळी तालुक्यामधील सीमावासियांनी हुतात्मा मारुती बेन्नाळकर आणि बाळू निलजकर यांच्या प्रतिमेला मालार्पण आणि पुष्पचक्रे वाहून आदरांजली वाहिली.
यावेळी सतिश बांदिवडेकर, अशोक पाटील, नीलिमा पावशे यांची आदरांजलीपर भाषणे झाली. यावेळी ग्रा. पं. सदस्य यल्लाप्पा पाटील, प्रशांत पाटील, केंपय्या सनदी, महेश धामणेकर, राकेश पाटील, यशोधन तुळसकर, विनायक कम्मार, वैजनाथ बेन्नाळकर, मधुमती पाटील, मीना मुतगेकर, भाग्यश्री गौंडवाडकर ज्योती पाटील, सुनिता जाधव, रेखा पावशे यांच्यासहीत सुरेश डुकरे, पिराजी मुचंडीकर, राजू पाटील, सुरेश पाटील, अनिल सूर्यवंशी, किसन पाटील, नारायण पाटील, बी. एन. पुजारी, भाऊ पाटील, पी. जी. जाधव, योगेश पाटील, अशोक बाळेकुंद्री, अनिल बाळेकुंद्री, जोतिबा पाटील, के. एम. जाधव, परशराम मेंडके, प्रल्हाद पाटील, मनोहर पाटील, सुधीर पाटील आणि ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते. गजानन पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
शिवसेनेतर्फे हुतात्म्यांना आदरांजली
सीमाभागातील शिवसेनेतर्फे प्रकाश शिरोळकर यांनी हुतात्म्यांना पुष्पचक्र वाहून त्यांना आदरांजली वाहिली. यावेळी प्रवीण तेजस, दिलीप बैलूरकर, कुलदीप कांबळे, राजवकुमार बोकडे, परशराम काकतकर, निरंजन अप्टेकर, अरविंद जाधव, राजू कचेरी यांच्यासहीत शिवसैनिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.