विर्डी पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे गोवा मुख्यमंत्र्यांना निवेदन
वार्ताहर / दोडामार्ग:
कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गोवा हद्द शासनाकडून सील करण्यात आली. महाराष्ट्रातील गोवा सीमावर्ती गावातील लोकांना गोव्यात ये-जा करण्यास मुभा मिळावी, अशी विर्डी, तळेखोल, आयी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
गोव्याच्या सीमेलगत राहणाऱया महाराष्ट्र राज्यातील विर्डी, तळेखोल, आयी व दोडामार्ग तालुक्यातील इतर गावातील नागरिक हे कामधंदा, नोकरी, शिक्षण, बाजार वैद्यकीय सेवा आदींसाठी पूर्णपणे गोव्यावर अवलंबून आहेत. परंतु, लॉकडाऊनमुळे गोवा व सिंधुदुर्ग जिल्हा यांनी सर्व सीमा सील केल्याने गेल्या चाळीस दिवसांपासून या लोकांचा गोवा राज्यातील संपर्क तुटला आहे. गेले चाळीस दिवस हे लोक अत्यंत कठीण परिस्थितीत असून अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तू, भाजीपाला यासाठी गोव्यावर अवलंबून आहेत, असे निवेदनात म्हटले आहे.
गंभीर जखमी किंवा आजारी व्यक्ती यासाठीही उपचारासाठीही गोव्यावर अवलंबून असून आताच्या परिस्थितीत गोव्यात औषध उपचारास नेण्यास सुद्धा मज्जाव केला जात आहे. यामुळे लोकांचे हाल होत आहेत. त्यामुळे निदान काम धंदा नोकरी व्यवसाय तसेच शिक्षण व आपत्कालीन प्रसंगी गोव्यात ये जा करण्यास परवानगी द्यावी. आवश्यक असल्यास ओळखपत्र तपासून तसेच वैद्यकीय चाचणी घेऊन प्रवेश देण्याबाबत गोवा सरकारने सहानुभूतीपूर्वक विचार करावा, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.