खानापूर युवा समितीने उपमुख्यमंत्री अजित पवारांची घेतली भेट : विविध मागण्यांचे निवेदन सादर
प्रतिनिधी / बेळगाव
खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या पदाधिकाऱयांनी सोमवारी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कोल्हापूर येथे भेट घेतली. यावेळी त्यांना 12 मागण्यांचे निवेदन सादर करून महाराष्ट्र सरकारने सीमा खटल्याची गती वाढवावी व बेळगावमध्ये सीमाकक्षाची स्थापना करण्याची मागणी करण्यात आली.
कोल्हापूर जिल्हय़ातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार व आरोग्यमंत्री राजेश टोपे कोल्हापूर येथे आले होते. यावेळी खानापूर युवा समितीच्या पदाधिकाऱयांनी त्यांची भेट घेतली. महाविकास आघाडी सरकारकडे सीमावासीय अपेक्षेने पाहत आहेत. त्यामुळे सीमावासियांना न्याय देण्याची मागणी अजित पवार यांच्याकडे केली. तेव्हा त्यांनी मुख्यमंत्र्यांशी याबाबत चर्चा करू, असे आश्वासन पदाधिकाऱयांना दिले.
महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांसह पंतप्रधानांची भेट घ्यावी, तोडगा निघत नाही तोवर बेळगावमध्ये जैसे थे परिस्थिती ठेवावी, सीमा समन्वय मंत्र्यांनी बेळगावला भेट द्यावी, एमपीएससी व इतर परीक्षा अर्जात बेळगाव सीमाभागाचा उल्लेख व्हावा, दीपक पवार लिखित महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद संघर्ष व संकल्प पुस्तकाचे पुनर्लेखन करावे, शिनोळी येथे शिक्षण केंद्राचे काम लवकर पूर्ण करावे, मराठी शाळांसाठी निधी मंजूर करावा, सीमाभागातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, महाराष्ट्र सरकारच्या सर्व योजना बेळगावसाठी लागू कराव्यात, सीमाभागातील मराठी वृत्तपत्रांना दरमहा दर्शनी जाहिरातींचा प्रस्ताव मंजूर करणे, शिनोळी येथे एफएम मनोरा उभारून सीमाभागात माहितीचे प्रसारण करावे आदी मागण्या करण्यात आल्या. यावेळी उपमुख्यमंत्र्यांसोबत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रिफ, पालकमंत्री सतेज पाटील, आमदार राजेश पाटील उपस्थित होते. खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील, सचिव सदानंद पाटील, उपाध्यक्ष परशराम नावलकर, किशोर हेब्बाळकर, राहुल पाटील आदी उपस्थित होते.