खासदार धैर्यशील माने यांचे आश्वासन : इतरही अनेक समस्यांबाबत केली चर्चा
प्रतिनिधी /खानापूर
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नासह सीमाभागातील मराठी भाषिकांवर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध लोकसभेत नक्कीच आवाज उठवू, असे आश्वासन कोल्हापूर जिल्हय़ातील हातकणंगले मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांनी दिले. खानापूर तालुका म. ए. समिती युवा आघाडीचे अध्यक्ष धनंजय पाटील व सहकाऱयांनी त्यांची कोल्हापूर येथे भेट घेऊन सीमाप्रश्नासह मराठी भाषिकांच्या विविध मागण्यांचे निवेदन सादर करून सविस्तर चर्चा केली.
यावेळी दिलेल्या निवेदनात बेळगाव येथील भाषिक अल्पसंख्याक खात्याचे कार्यालय चेन्नई येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. याबाबत आवाज उठवून पुन्हा कार्यालय बेळगाव येथे आणण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी तालुका म. ए. समिती युवा आघाडीच्यावतीने खासदार धैर्यशील माने यांच्याकडे करण्यात आली.
युवा समितीच्या पदाधिकाऱयांनी कोल्हापूर येथे खासदार माने यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील यांनी बेळगाव येथे भाषिक अल्पसंख्याक खात्याचे कार्यालय अनेक वर्षे होते. त्यामुळे या भागातील लोकांना समस्या मांडण्यास मदत होत होती. मात्र, काही महिन्यांपूर्वी हे कार्यालय चेन्नई येथे स्थलांतरित करण्यात आले. त्यामुळे मराठी भाषिकांना त्रास होणार असून कर्नाटक सरकारने सीमाभागात पुन्हा एकदा कन्नडसक्ती वाढविण्यास सुरुवात केली आहे. त्याबाबत लोकसभेत आवाज
उठवावा, अशी त्यांना विनंती करण्यात आली.
काही दिवसांपूर्वी लोकसभेत केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी आसाम व मिझोराम राज्यांतील सीमावादाबाबत चर्चेला उत्तर देताना आसाम व मिझोराम राज्यांप्रमाणेच महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातही अनेक वर्षांपासून सीमावाद कायम असल्याची माहिती दिली होती. त्याचप्रकारे येणाऱया दिवसात सीमावादाबाबत लोकसभेत चर्चा व्हावी यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी करण्यात आली. यावेळी खासदार माने यांनी सीमाभागात सुरू असलेल्या अन्यायाची आपल्याला कल्पना असून सर्व विषयांवर लोकसभेत आवाज उठविला जाईल, असे आश्वासन दिले. यावेळी सचिव सदानंद पाटील, किशोर हेब्बाळकर, भूपाल पाटील, संदीप मिराशी आदी उपस्थित होते.
खानापूर-रामनगर रस्त्याचे काम सुरू व्हावे
खानापूर ते रामनगर रस्त्याचे काम अनेक महिन्यांपासून रखडले आहे. त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत असल्याने या मार्गाचे काम लवकर सुरू व्हावे, यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करावी, अशी मागणीही युवा समितीतर्फे खासदार धैर्यशील माने यांना करण्यात आली. यावेळी त्यांनी लवकरच याबाबत गडकरी यांच्याशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले.