म. ए. समितीकडून डॉ. एन. डी. पाटील यांना श्रद्धांजली
प्रतिनिधी /खानापूर
शोषितांच्या हक्कांसाठी लढा देणारे खंबीर नेतृत्व प्रा. डॉ. एन. डी. पाटील हे सीमाभागातल्या मराठी भाषिकांचे आधारस्तंभ होते. त्यांच्या जाण्याने सीमा चळवळीचे ऊर्जास्रोत हरपले आहे. त्यांनी दाखविलेल्या मार्गावर वाटचाल करून त्यांचे स्वप्न साकार करणे, हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल, असे विचार कार्याध्यक्ष मारुती परमेकर यांनी व्यक्त केले.
येथील शिवस्मारक येथे प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांना तालुका म. ए. समितीच्यावतीने शनिवार दि. 22 रोजी श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी आयोजित शोकसभेत ते बोलत होते. तालुका अध्यक्ष देवाप्पा गुरव यांनी प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या प्रतिमेस हार घालून श्रद्धांजली वाहिली. याप्रसंगी गोपाळ पाटील म्हणाले, कोणत्याही परिस्थितीत स्वतःच्या विचारधारेशी ठाम असणारे नेते एन. डी. पाटीलसाहेब चळवळीला दिशा देऊन गेले. छोटय़ा-मोठय़ा आंदोलनात भल्याभल्यांची त्रेधातिरपीट उडवून ज्यांनी कष्टकरी, शेतकरी आणि प्रामुख्याने सीमावासियांची काळजी वाहिली, त्यांच्या जाण्याने आम्ही पोरके झालो आहोत. सीमाप्रश्न सुटावा यासाठीची त्यांची तळमळ आम्हाला ऊर्जा देत राहील. युवा समिती अध्यक्ष धनंजय पाटील म्हणाले, भाई एन. डी. पाटील म्हणजे संघर्षयोद्धा. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत निस्वार्थपणे सीमा चळवळ अधिकाधिक गतिमान आणि तीव्र करण्यात त्यांनी आपले आयुष्य वेचले.
सीमाप्रश्न निर्णायक स्थितीत असताना ते अचानक आपल्यातून निघून गेल्याने प्रत्येक सीमावासियाला वेदना झाल्या. त्यांनी लढय़ाला दिलेली दिशा नक्कीच यशापर्यंत नेईल, असे मत संभाजी देसाई यांनी मांडले.
यावेळी सचिन देसाई, रामचंद्र गावकर, राजू पाटील, रणजित पाटील, पांडुरंग सावंत, रामचंद्र देसाई, पी. एच. पाटील, सूर्याजी पाटील आदींनी विचार व्यक्त केले. यावेळी युवा समितीचे कार्याध्यक्ष किरण पाटील, कृष्णा कुंभार, रवी पाटील, गोपाळ कुटे, किशोर हेब्बाळकर, विनायक सावंत, मारुती गुरव, भूपाल पाटील आदींसह समिती कार्यकर्ते उपस्थित होते.