भारताचा निर्णय, चीनचा विरोध झुगारण्याचा निर्धार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारत-चीन सीमेवर भारताने गेल्या चार वर्षांपासून मार्ग बांधण्याचे काम चालविले आहे. ते कोणत्याही परिस्थितीत थांबविले जाणार नाही. चीनने कितीही दबाव आणण्याचा प्रयत्न केला तरी तो यशस्वी होऊ दिला जाणार नाही, असा निर्धार भारताकडून व्यक्त करण्यात आला. सध्या लडाख येथे भारत आणि चीनचे सैनिक एकमेकांसमोर उभे ठाकले असून दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. गेले 20 दिवस अशी स्थिती आहे. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांनी सेनाध्यक्षांची बैठक बोलाविली होती.
बैठकीत भूसेना प्रमुख मनोज नरवणे यांनी संरक्षणमंत्र्यांना सीमेवरील सद्यःस्थितीची माहिती दिली. यावेळी संरक्षणमंत्र्यांनी सेनेच्या वरीष्ठ अधिकाऱयांना भारत सरकारचा निर्णय सांगितला. लडाख, सिक्किम, उत्तराखंड आणि अरूणाचल प्रदेश या चारही प्रदेशांमध्ये भारताने सीमेपर्यंत मार्ग बांधण्याचे आणि इतर सामरिक पायाभूत सुविधा उभारणीचे प्रकल्प हाती घेतले आहे. त्यांना चीनने विरोध केला आहे. त्या विरोधाला भीक न घालता प्रकल्पांचे काम पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती नंतर सरकारी सूत्रांनी दिली.
चीनकडून अतिक्रमणाचा प्रयत्न
चीन आणि भारत यांच्यातील सीमारेषा मॅकमोहन रेषा म्हणून ओळखली जाते. तथापि, या सीमारेषेला अधिकृत मान्यता नाही. जेथपर्यंत दोन्ही देशांच्या सेना प्रत्यक्ष नियंत्रण करीत आहेत, तेथपर्यंची सीमा मानली जाते. गेल्या महिन्याभरात चीनने भारताच्या भारतात अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला आहे. काही स्थानी चीनचे सैनिक 3 ते 4 किलोमीटर आतपर्यंत आले होते. तथापि, भारतीय सैनिकांनी वेळीच कृती करून त्यांना त्यांच्या भागात पिटाळले आहे.
गोळी न झाडता संघर्ष
भारत व चीन यांच्या सैनिकांचा हा संघर्ष ही आता नित्याची बाब झाली आहे. दोन्ही देशांचे सैनिक एकमेकांवर गोळीबार करत नाहीत. तसेच कोणत्याही शस्त्राचा उपयोग केला जात नाही. तथापि, एकमेकांना शारिरीक शक्तीच्या बळावर मागे ढकलण्याचा किंवा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला जातो. गेल्या तीन आठडय़ांमध्ये लडाख येथे चीनने कालापानी भागात जास्त सैनिक नियुक्त केले असून ते भारतीय सैनिकांच्या कामात आडथळा आणण्याचा प्रयत्न करीत आहेत.
भारताचेही चोख प्रत्युत्तर
चीनचे हे प्रयत्न भारताने हाणून पाडले आहेत. तसेच सीमाभागातील रस्ते बांधणी व इतर कामे सुरूच ठेवली आहेत. यातील अनेक प्रकल्प आता पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. त्यामुळेच चीन बिथरला असून त्याने भारताविरोधात कांगावा चालविलेला आहे. मात्र कोणत्याही दबावाला बळी न पडण्याचा निश्चय भारताने केला आहे. लडाख येथे 5 मे या दिवशी झालेल्या संघर्षात दोन्ही देशांचे 100 हून अधिक सैनिक जखमी झाले होते. त्यानंतर दोन दिवसांनी सिक्किम सीमारेषेवरही असाच प्रकार घडला होता, असे सांगण्यात येत आहे.
चीनने सैनिकबळ वाढविले
लडाखच्या पँगाँग त्सो सरोवर, गलवान खोरे, डेमचोक आणि ओलदी भागांमध्ये चीनने आपल्या सैनिकांची संख्या वाढविली आहे. तेथे चीनने ‘आकमक गस्त चालविली आहे. भारतानेही तेथे सैनिकसंख्या वाढविली असून अशाच प्रकारची गस्त घालण्यास प्रारंभ केला आहे. दोन्ही देशांनी एकमेकांवर एकमेकांच्या भागांमध्ये अतिक्रमण केल्याचा आरोप केला आहे.
डोकलामची पुनरावृत्ती
2017 मध्ये भूतान देशानजीकच्या डोकलाम प्रदेशात चीनने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी भारतीय सेनेने संयत पण कठोर कार्यवाही करून चीनला रोखले होते. 73 दिवस दोन्ही देशांचे सैनिक एकमेकांच्या समोर उभे होते व अनेकदा त्यांच्यात शारिरीक संघर्षही झाला होता. अखेर नंतर चीनी सैनिकांनी अतिक्रमण मागे घेतले होते. आता लडाखमध्ये याच घटनेची पुनरावृत्ती होताना दिसत आहे. स्थिती तणावाची आहे, असे तज्ञांचे मत आहे.