अधिकारी पातळीवरील द्विपक्षीय बैठकीत एकमत : लवकरच कमांडर पातळीवर चर्चा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
लडाख सीमा वादावर भारत आणि चीनच्या अधिकाऱयांमध्ये गुरुवारी पुन्हा एकदा चर्चा झाली. या बैठकीत विशेष काही घडले नसले तरी दोन्ही बाजूंनी सीमेवर कोणतीही अनुचित घटना टाळण्यासाठी आणि शांतता राखण्यावर सहमती दर्शवली. द्विपक्षीय करार आणि प्रोटोकॉलचे पूर्ण पालन करून पूर्व लडाखमधील एलएसीवरील उर्वरित समस्यांचे लवकरात लवकर निराकरण करण्याचे दोन्ही बाजूंनी मान्य केले. गेल्या दीड वर्षांपासून सुरू असलेल्या तणावाबाबत दोन्ही देशांच्या सीमावादासंबंधीची ही 23 वी बैठक होती.
भारत-चीनने त्यांच्या सीमावर्ती भागात सैन्य आणि शस्त्रास्त्रांची तैनाती वाढवली आहे. यासोबतच दोन्ही देश सीमावर्ती भागातील पायाभूत सुविधांमध्ये झपाटय़ाने वाढ करत आहेत. एकीकडे सैन्यसुविधा वाढविण्यावर भर दिला जात असतानाच अधिकारी आणि लष्करी पातळीवर चर्चेच्या फेऱया सुरूच आहेत. त्यानुसार गुरुवारी झालेल्या अधिकारी पातळीवरील चर्चेत आतापर्यंतच्या बैठकांमधील घडामोडींचा आढावा घेण्यात आला. भारत-चीन सीमावर्ती भागातील पश्चिम सेक्टरमधील एलएसीवरील परिस्थितीवर दोन्ही बाजूंनी स्पष्ट आणि सखोल चर्चा केली. दोन्ही देशांनी वरिष्ठ कमांडर्सच्या बैठकीची पुढील (14 वी) फेरी लवकरात लवकर घेण्यावर सहमती दर्शवली.
गेल्या महिन्यात भारत आणि चीनच्या लष्करी कमांडर्समधील चर्चेची 13 वी फेरी कोणत्याही ठोस तोडग्याविना संपुष्टात आली होती. गेल्या महिन्यात 10 ऑक्टोबर रोजी दोन्ही पक्षांमध्ये कमांडर स्तरावर चर्चा झाली होती. दोन्ही देशांमधील सीमेवरून माघार घेण्याच्या मुद्यावर एकमत झालेले नसल्यामुळे गेल्या वषी सीमेवर पहारा देण्यासाठी पाठवलेले हजारो सैनिक सद्यस्थितीत तरी माघारी परतण्याची चिन्हे दिसत नाहीत.