भारताचा सावध पवित्रा, सीमेवर तयारी जय्यत ठेवणार
बिजींग / वृत्तसंस्था
पूर्व लडाख येथील सीमेवर भारत आणि चीनच्या सेनांमध्ये असणारी संघर्षाची स्थिती आता हळूहळू निवळू लागली आहे. सर्व संघर्ष बिदूंवरून दोन्ही देशांच्या सेना माघारी गेल्या आहेत, असा दावा चीनने केला. भारताने मात्र सावध पवित्रा घेत सीमेवर कोणत्याही परिस्थितीसाठी सज्ज असल्याचे स्पष्ट केले.
चीनच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते वँग वेनबिन यांनी हा दावा केला. गालवन खोरे, उष्ण झऱयांचा प्रदेश आणि गोग्रा या भागांमधून सेनांची माघार पूर्ण झाली आहे का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर त्यानी, ही प्रक्रिया बव्हंशी पूर्ण झाल्याचे प्रतिपादन केले. गेल्या काही दिवसांमध्ये चीन आणि भारत यांच्या सेनाधिकाऱयांमध्ये चर्चेच्या अनेक फेऱया पूर्ण झाल्या आहेत. त्यात सीमेवर शांतता निर्माण करण्यासाठी अनेक प्रस्ताव मांडण्यात आले. दोन्ही देशांनी या प्रस्तावांना अनुसरून कृती केली आहे. परिणामी, सीमेवर शांतता प्रस्थापित करण्याच्या दिशेने दोन्ही देश प्रगती करत आहेत, असे वेनबिन म्हणाले.
भारताची देखरेख कायम
सीमाभागात भारताने ड्रोन्स आणि युद्ध विमानांच्या साहाय्याने देखरेख ठेवली आहे. कोणत्याही परिस्थितीत सीमेवरचे लक्ष हटवू नका, असा स्पष्ट सूचना आघाडीवरच्या सेना तुकडय़ांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे चीनच्या सैन्याची बारीकशी हालचालही टिपली जात आहे. आगामी आठवडय़ामध्ये चर्चेची आणखी एक फेरी होणार असून त्यात उरलेल्या स्थानावरील संघर्षबिंदूवरूनही सेनांची माघार होईल, असे चीनचे म्हणणे आहे. मात्र, भारत त्यावर जपूनच विश्वास ठेवेल असे चीनलाही सांगण्यात आले आहे. तथापि, एकंदरीत पाहता सीमेवरचा तणाव आता मावळत चालला आहे, असे दिसून येते, असे तज्ञांचे मत आहे.