बिजींग / वृत्तसंस्था
लडाख सीमारेषेवर आता परिस्थिती स्थिर आहे, असा दावा चीनने केला आहे. आज बुधवारी दोन्ही देशांमध्ये कमांडर पातळीवरची चर्चा आयोजित करण्यात आली आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता वांग वेनबिन यांनी या चर्चेविषयी माहिती दिली. दोन्ही देश राजनैतिक आणि सैनिकी पातळीवर चर्चा करत असून सीमेवरील तणाव दूर करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
बुधवारची चर्चा ही दोन्ही देशांच्या सैनिकी आधिकाऱयांमधील 14 चर्चा असेल. सध्या लडाख सीमेवर तीन स्थानी दोन्ही देशांचे सैनिक एकमेकांच्या डोळय़ाला डोळा भिडवून उभे आहेत. ही स्थिती नाहीशी होऊन दोन्ही देशांचे सैनिक त्यांच्या तणावपूर्व स्थितीत परत जातील अशी अपेक्षा आहे. दोन्ही देशांनी एकाच वेळी मागे सरकण्यास प्रारंभ करावा, अशी भारताची अपेक्षा आहे.
भारताला अपेक्षा सकारात्मकतेची
बुधवारी होणारी बैठक सकारात्मक आणि काही काहीतरी ठोस निर्णयाप्रत पोहचणारी ठरेल, अशी अपेक्षा भारताला आहे. आतापर्यंत चर्चेच्या अनेक फेऱया निष्फळ ठरल्या असून दोन्ही देशांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले. चीनच्या आडमुठेपणाने चर्चा अयशस्वी होत असल्याचा आरोप भारताने केला होता.
बुधवारची चर्चा लडाखच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या पलिकडे, अर्थात चीनच्या ताब्यातील भागात होईल. हा भाग चुशुल मोल्डो म्हणून ओळखला जातो. येथे दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे या चर्चेला महत्व आहे.