साडे तीन मुहूर्तांपैकी एक असलेला दसरा सण आपल्याकडे संपूर्ण भारत वर्षात मोठय़ा प्रमाणात साजरा केला जातो. दसऱयाला शक्तीची पूजा व सीमोल्लंघन परंपरा आहे. यशासाठी शक्तीसंचय आणि तेच ते मधून बाहेर पडून सीमोल्लंघन अशी या मागची धारणा आहे. राजे-रजवाडे होते तेव्हा दसऱयाला मोहिमेवर बाहेर पडायचे एकूणच सीमोल्लंघन करायचे. सध्याच्या काळात सण-उत्सवाचे स्वरुप बदलले असले आणि कोरोना महामारीने माणसांच्या जगण्याचे, व्यवहाराचे अर्थ बदलले असले तरी माणसांच्या भावभावना त्याच आहेत. नातेसंबंध, आनंदाच्या उर्मी त्याच आहेत. म्हणून काळ बदलला असला तरी भाव बदलले नाहीत आणि पद्धत बदलली असली तरी कार्यपद्धती बदललेली नाही. ओघानेच सारेच लहान-मोठे दसऱयाचे सोने वाटताना व आगामी व्यापारी नववर्षाची पायाभरणी करताना नवी स्वप्ने, नवी दिशा, नवे निर्धार घेऊन सीमोल्लंघन करत असतात. सुदैवाने यंदा अतिवृष्टी, ढगफुटी असे काही अपवाद वगळता सर्वदूर चांगला पाऊस झाला आहे. खरिपाचे पीक चांगले आले आहे. भारतात सुमारे शंभर कोटी नागरिकांचे लसीकरण झाले आहे. कोरोनाची महामारी आटोक्यात आली आहे. भारताने कोरोना विरोधी दिलेला लढा आणि लसीकरण यांचे जगभर कौतुक होते आहे. कोरोनाचे जे तडाखे बसले, आप्त स्वकीय कोरोनामुळे बळी गेले. अर्थव्यवस्था अडचणीत आली याचे दूरगामी परिणाम माणसांच्या जगण्यावर, जीवन व्यवहारावर आणि नोकरी, शेती, व्यापार, शिक्षण, बँकिंग, लाईफ स्टाईल सर्वावर होणार आहेत, झाले आहेत. पण सुमारे 140 कोटीचा देश लोकशाही व्यवस्था, अनेक राजकीय पक्ष, जाती, धर्म, पंथ, भाषा, उपासना, धारणा यांच्यातील विविधता या सगळय़ा गोष्टी सांभाळून भारताने लसीकरणात घेतलेली आघाडी आणि कोरोनामुक्त भारत या दिशेने उचललेली पावले निश्चितच यंदाचे मोठे सीमोल्लंघन मानावे लागेल. काळजी संपलेली नाही पण निर्बंध शिथिल झाले आहेत. जगभर अर्थव्यवस्थेला तडाखे बसले आहेत. पण भारतीय अर्थव्यवस्था वेगाने दुरुस्त होते आहे. मागणी वाढते आहे. उत्पादन वाढते आहे. पुन्हा हळूहळू बेरोजगारी कमी होते आहे. विकास दर वाढतो आहे. शेअर बाजार नवनवे विक्रम करतो आहे. शेतीत प्रगती सुरु आहे.ओघानेच वेगवेगळय़ा क्षेत्रात नव्याने, निर्धाराने सीमोल्लंघन सुरु आहे. दसऱयाला आपल्याकडे राजकीय पातळीवर शक्तीप्रदर्शन आणि नवे संकल्प, नवे विचार यासाठी मेळावे भरवले जातात आणि राजकीय हालचाली होऊन नवे पवित्रे घेतले जातात. गेल्या दसऱयाला शिवसेनेचा दसरा मेळावा झाला. माजी मंत्री पंकजा मुंढे यांनी भगवानगडाच्या पायथ्याशी शक्तीप्रदर्शन केले. रा.स्व.संघाने प्रथेप्रमाणे नागपूरला दसरा उत्सव आणि सरसंघचालकांचे बौद्धिक असा सोहळा साजरा केला. मरगळ आलेल्या काँग्रेसने पक्षाचा अध्यक्ष व पदाधिकारी निवडीचे संकेत दिले. काँग्रेसची पुनर्बांधणी करणार असे सोनिया म्हणाल्या, शरद पवार आणि पवार कुटुंबीय छापे आणि चौकशी या चक्रात सापडले आहे. मागे शरद पवार पावसात भिजले आणि स्वतः ईडी कार्यालयात पोहोचले. भाजपा-सेना युती मोडून सत्तास्थापन करण्यात यशस्वी झाले. त्यांना या सर्व गोष्टीत आक्रमकपणा फायदेशीर ठरला. आता तोच आक्रमकपणा ते नव्याने पडत असलेल्या छाप्यासंदर्भात दाखवत आहेत पण सुमारे पन्नासभर सहकारी साखर कारखाने, जिल्हा बँका आणि राज्य बँक या जोडीला राज्य मंत्रिमंडळातील काही मंत्री चौकशीच्या रडारवर आल्याने आता आक्रमकपणा उपयुक्त ठरतो का हे बघावे लागेल. शिवसेनेचा दसरा मेळावाही भाजपावर शरसंधान करणारा होता. शिवसेना पुन्हा हिंदुत्वाचे निशाण उंचावते आहे. जोडीला छाप्यावरुन भाजपाला काटय़ावर धरु पाहते आहे. शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस यांचे संयुक्त महाआघाडी सरकार दोन वर्षे पूर्ण करायच्या बेतात आहे. आगामी काळात मुंबई महापालिका,पुणे वगैरे अन्य महापालिका व पाच राज्यातील विधानसभेच्या निवडणुका आहेत. भाजपाला केंद्रातून सत्तेवरून खाली खेचण्यासाठी सारे आजी-माजी पहेलवान सरसावलेले आहेत. पण मोदी-शहा जोडी डावाला प्रतिडाव करते आहे. पंकजा मुंढे या भाजपासोबत आहेत पण समाधानी वाटत नाहीत. त्यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करत घेतलेला दसरा मेळावा विराट होता. मेळाव्याचे सोने लुटून त्या दिल्लीला पोहचल्या आहेत. भाजपा महाराष्ट्रात आणि देशातही ओबीसी कार्ड खेळताना दिसते आहे. काँग्रेस सर्व पातळीवर शांत होती व राज्यातील सत्तेत वाटा उचलत होती. आता काँग्रेसमध्येही जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. राहुल गांधी युवा फळी घेऊन काँग्रेससाठी पुन्हा अध्यक्षपद सांभाळणार असे चित्र आहे. एकूणच दसरा उत्सवाच्या निमित्ताने राजकीय हालचाली व हिशोब जोडीला डाव-प्रतिडाव, आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. दिवाळीचे फटाके आवाज करु लागले आहेत. खरे तर दसऱयाला विचारांचे सोने वाटायचे, संकल्पाचे निश्चय करायचे आणि दिवाळीचा नवा प्रकाश अंगीकारुन देश, धर्म व मानव कल्याण साधायचे. त्यासाठी सीमोल्लंघन करायचे. अनिष्ट, अरिष्ट, दृष्ट शक्तीचा, विचाराचा पराभव करून विजयाची पताका उंचवायची पण जे सुरु आहे ते स्वार्थाचे, मतलबाचे आणि डावपेचाचे. हे सारे मागे टाकणे आणि कोरोना व कोरोनाचे फटके यावर मात करणारे सीमोल्लंघन महत्त्वाचे. जग ग्लोबल होत असताना जगात मोठे बदल होत असताना आपणही वैयक्तिक व राष्ट्र म्हणून स्वतःत चांगले बदल केले पाहिजेत. अनेक पातळीवर सीमोल्लंघन केले पाहिजे. दसऱयाचे नवे संदर्भ स्वीकारावे लागतील. पर्यावरण, अर्थकारण, नातेसंबंध, जागतिकीकरण, सीमांचे रक्षण, शेतीची प्रगती, आरोग्य यासर्व पातळीवर नव्याने विचार करुन सीमोल्लंघन व्हायला हवे. तोच दसऱयाचा खरा अर्थ आहे.
Previous Articleदंगलखोरांच्या 6 पिढय़ांकडून करू भरपाई
Next Article साधुलक्षणे-हरिभक्तीला प्राण विकणे
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.