वाघाच्या हल्ल्यात पतीला गमाविणाऱया महिला शासकीय मदतीसाठी दीर्घ प्रतीक्षेत
पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगणा जिल्हय़ातील सुंदरबन भागात नरभक्षक वाघांची मोठी दहशत आहे. हे वाघ अनेक महिलांच्या वैधव्यास कारणीभूत ठरले आहेत. या वाघांनी आतापर्यंत 4 हजार महिलांना विधवा केले आहे. सुंदरबन आणि त्याच्या परिसरात वाघांची संख्या वाढली असून त्यांच्यासाठीचे क्षेत्र तितकेच राहिल्याने आणि त्यावर मानवी अतिक्रमण झाल्याने हा संघर्ष वाढत चालला आहे.
सुंदरवन भौगोलिकदृष्टय़ा अत्यंत जटील भाग आहे. येथील जंगलांमध्ये वाघांचे वास्तव्य आहे, तर दलदलयुक्त अन् नद्यांमध्ये मोठमोठय़ा मगरींचा वावर असतो. सुंदरवन परिसरात ग्रामीण लोक मासेमारी किंवा मध गोळा करू उदरनिर्वाह करत असतात. हा भाग बांगलादेश अन् भारताचा सीमावर्ती बेटसदृश असून येथे घनदाट जंगल देखील आहे. येथील नदीत नौकेतून प्रवास करत असताना वाघांच्या डरकाळीचा आवाज अगदी सहजपणे ऐकू येत असतो. या क्षेत्रातील लोक मासेमारी अन् मध गोळा करण्यासाठी घनदाट जंगलांमध्ये जात असतात. त्यांची हीच चूक त्यांना वाघाचे भक्ष्य ठरविते. जंगल हे वन्यप्राण्यांसाठी असले तरीही तेथे मानवी हस्तक्षेप किंवा घुसखोरी प्राण्यांना आक्रमक करत असल्याचे मानले जाते.
माणूस-प्राण्यांमधील संघर्षामुळे सुंदरवनामध्ये सुमारे 4 हजार महिलांना वैधव्य प्राप्त झाले असून त्यांना ‘टायगर विडो’ देखील म्हटले जाते. या महिलांचे पती मासे, खेकडे किंवा मध गोळा करताना वाघांचे शिकार ठरले होते. मानव-प्राण्यांच्या संघर्षाचा फटका बसलेल्या या महिलांना आतापर्यंत कुठलीच शासकीय मदत मिळाली नव्हती. परंतु आता आशेचा एक किरण या महिलांना दिसून येत आहे. फेब्रुवारी महिन्यात कलकत्ता उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली असून यात वाघाच्या हल्ल्याने पीडित लोक अन् त्यांच्या कुटुंबांना शासकीय अनुदानाचे योग्य वितरण करण्याची मागणी करण्यात आली आहे.
जीव जोखिमीत टाकणारा रोजगार
सुंदरवनात 885 चौरस किलोमीटरचा बफर एरिया (पर्यावरण संरक्षणासाठी निर्धारित क्षेत्र) आहे, तर कोअर एरिया म्हणजे नैसर्गिक क्षेत्र सुमारे 1700 चौरस किलोमीटर इतके आहे. वन विभागाने बोट लायसन्स सर्टिफिकेट (बीएलसी) परमिटसह बफर एरियात उपजीविकेच्या काही कृती म्हणजेच मासेमारी, खेकडे पकडणे, लाकूड अन् मध गोळा करण्याची अनुमती दिली होती. परंतु कोअर एरियात प्रवेश केल्यास दंडाची तरतूद आहे. तसेच वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास भरपाईची कुठलीच तरतूद नाही. हवामान बदल आणि यांत्रिक मासेमारीमुळे गरीब मच्छिमारांना कोअर एरियात जाण्याशिवाय कुठलाच पर्याय राहिलेला नाही. बफर झोनमधील नद्यांमध्ये मासे अन् खेकडय़ांचे प्रमाण कमी होत चालले आहे. येथील लोक वाघ अन् मगरींच्या सान्निध्यात जीव जोखिमीत टाकत कोअर एरियात जाण्यास हतबल असल्याचे उद्गार दक्षिणवंग मत्स्यजीवी फोरमचे उपसचिव अबदार मलिक यांनी काढले आहेत.
मृत्यूच्या कारणांचा होत नाही उल्लेख
जन श्रमजीवी मंच फोरमचे मुख्य आयोजक तपस मंडल हे बीएलसी परमिटच्या मर्यादा अधिक ठळकपणे दाखवून देतात. 5 लाखाहून अधिक लोक उपजीविकेसाठी वनक्षेत्रावर अवलंबून आहेत. परंतु सुंदरवन व्याघ्र प्रकल्पात (एसटीआर) केवळ 923 परवाने देण्यात आले असून यातील 700 सक्रिय आहेत. तर प्रत्येक परमिटवर केवळ 3-4 मच्छीमारांना अनुमती असते. परमिटचे शुल्क हे खूपच अधिक आहे. काही सक्रिय मच्छीमारांनी यामुळे स्वतःचा पिढीजात व्यवसाय सोडला आणि इतरांना हा परवाना भाडेतत्वावर प्रदान केला आहे. वाघाच्या हल्ल्यांमुळे झालेल्या मृत्यूचा कुठेच उल्लेख होत नाही. कारण गरीब मच्छीमारांना आपली सतावणूक होणार हे माहीत आहे. पोलीस देखील कधीकधी सहकार्य करण्यास नकार देत असल्याचे मंडल यांनी सांगितले.
10 वर्षांपासून प्रयत्न
मागील 10 वर्षांपासून एक महिला स्वतःला टायगर विडो सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करत आहे. या महिलेच्या पतीच्या मृत्यू प्रमाणपत्रात नैसर्गिक मृत्यू असे नमूद करण्यात आले आहे. तर ही महिला स्वतःला टायगर विडो म्हणून सिद्ध करण्यासाठी झटत आहे. मनयाबर येथील विधवा महिला एकादशीकडे एक मृत्यूप्रमाणपत्र असून यात मृत्यूचे कारण घनदाट जंगल नमूद आहे, परंतु वाघाच्या हल्ल्याचा उल्लेख नाही. एकादशी आणि इतर महिलांकडे कोणतेही कागदेपत्रे नसल्याने त्या 5 लाख रुपयांच्या शासकीय भरपाईसाठी अपात्र ठरल्या आहेत. तर मृत्यू प्रमाणपत्र अन् शवविच्छेदन अहवालात वाघांच्या हल्ल्यामुळे मृत्यू झाल्याची पुष्टी आहे, परंतु भरपाई मिळविणे त्यांच्यासाठी सोपे नाही.
मदत करणाराही ठरला शिकार
पुष्पा मंडल या महिलेचे पती अर्जुन हे टायगर विडोंना भरपाई मिळवून देण्यास मदत करायचे. 2019 मध्ये त्यांचाही वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला आणि मृतदेह देखील मिळू शकलेला नाही. पुष्पा यांनी सर्व कागदपत्रे तयार केली, कारण तिला याकरता येणाऱया अडचणी माहीत होत्या. तरीही तिला भरपाई मिळू शकलेली नाही. चक्रीवादळ अन् कोरोनामुळे तिच्यासमोर आर्थिक संकट उभे ठाकले.
उच्च न्यायालयात प्रकरण
फेब्रुवारी महिन्यात दाखल जनहित याचिकेत वाघाच्या हल्ल्याने पीडितांची योग्य संख्या शोधणे अन् त्यांना योग्य शासकीय अनुदान देण्याची मागणी करण्यात आली असल्याचे दक्षिणवंग मत्स्यजीवी फोरमशी निगडित वकील अभिषेक सिकदर यांनी सांगितले आहे. याप्रकरणी हस्तक्षेप करणे आवश्यक आहे, कारण वाघाच्या हल्ल्यात जीव गेल्यावर पूर्ण कुटुंबावर संकट ओढवत असते. विधवा महिलांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यांच्या मुलांचे शिक्षण थांबते, मुलींचा कमी वयातच विवाह होतो आणि अनेकदा त्या तस्करीला बळी पडतात, असे सामाजिक कार्यकर्ते अमल नायक यांनी म्हटले आहे.
दर दुसऱया घरात टायगर विडो
या क्षेत्रातील अनेक गावांमध्ये प्रत्येक दुसऱया घरात टायगर विडो दिसून येते. जंगलामुळे उदरनिर्वाह करणाऱया लोकांना दिवसभराच्या कष्टानंतर सुमारे 700 रुपयांची कमाई प्राप्त होते, परंतु याच्या बदल्यात त्यांचा जीव मोठय़ा जोखिमीत असतो. हे लोक अनेकदा प्रतिबंधित आणि सागरी क्षेत्रांमध्ये पोहोचून मृत्यूच्या दाढेत सामावले जातात. सरकार प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये होणाऱया मृत्युंवर भरपाई देत नाही. बिगर प्रतिबंधित वनक्षेत्रात मृत्यू झाला असेल तरच भरपाई देण्यात येत असल्याचे सुंदरवन व्याघ्र प्रकल्पाच्या प्रशासनाकडून सांगण्यात आले. तर टायगर विडो म्हणून ओळखल्या जाणाऱया महिलांनी सरकारकडून 10 लाख रुपयांची मदत मागितली आहे. तसेच पोलीस आणि वन प्रशासनाकडून कुठलाच गुन्हा नोंदविला जाऊ नये, अशी मागणी त्यांची आहे.
वाघ आक्रमक का?
वन विभागाने तज्ञांची एक समिती स्थापन केली होती. या समितीने अनेक महत्त्वाचे निष्कर्ष काढले आहेत. सुंदरवनला लागून असलेल्या बंगालच्या उपसागराची पातळी आणि खारेपणा वाढल्याने वाघांना अनेकदा त्यांच्या आवडीचे खाद्य मिळत नाही. यामुळे वाघ मानवी वस्तींच्या दिशेने धाव घेत असल्याचे समितीचे म्हणणे आहे. सुंदरवनात दरवर्षी माणसांवर वाघांकडून किमान 100 हल्ले होत असतात, यातील निम्म्या हल्ल्यांमध्ये लोकांना जीव गमवावा लागत असतो. या हल्ल्यांमध्ये मारले गेलेल्या लोकांचे मृतदेह कित्येकदा मिळत नसतात. सुंदरवनाचे नैसर्गिकदृष्टय़ा मोठे महत्त्व आहे. याचमुळे या जंगलाचे अस्तित्व कायम राखत त्यातील प्राणीसंपदा जतन करणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
– संकलन ः उमाकांत कुलकर्णी