स्मार्ट ग्राम आणि आर. आर. पाटील सुंदर गाव स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा
प्रतिनिधी / ओरोस:
सुंदर गाव स्पर्धेंतर्गत ग्रामपंचायतींना मिळालेला पुरस्कार ही चांगल्या पद्धतीने काम केल्याने मिळालेले फळ आहे. पुढील काळात सातत्याने अशा प्रकारची मेहनत घेऊन गावाचा सर्वांगीण विकास साधावा, असे आवाहन करीत जि. प. अध्यक्ष सौ. समिधा नाईक यांनी ‘सुंदर गाव’ स्पर्धा विजेत्यांना शुभेच्छा दिल्या.
पूर्वीच्या स्मार्ट ग्राम आणि त्याच योजनेचे नव्याने नामकरण झालेल्या ‘आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव’ योजनेंतर्गत 2018-19 आणि 2019-20 या वर्षात जिल्हा आणि तालुकास्तरावर प्रथम क्रमांक पटकावलेल्या ग्रामपंचायतींचा पुरस्कार वितरण सोहळा मंगळवारी सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा नियोजन समितीच्या नवीन सभागृहात जि. प. अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली झाला.
यावेळी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, जि. प. सदस्य प्रदीप नारकर, ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपाली पाटील, गटविकास अधिकारी विनायक ठाकुर, अधीक्षक मनिषा देसाई, संबंधित सरपंच, उपसरपंच, सदस्य तसेच ग्रामसेवक उपस्थित होते.
सन 2018-19 च्या स्मार्ट ग्राम योजनेंतर्गत जिल्हास्तरावरील पारितोषिक कुडाळ तालुक्यातील कसाल आणि दोडामार्ग तालुक्यातील कुंब्रल या दोन ग्रामपंचायतींना विभागून देण्यात आले होते. तर 2019-20 साली आर. आर. पाटील सुंदर गाव योजनेत जिल्हास्तरावर पणदूर ग्रामपंचायत प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली होती. या तीन ग्रामपंचायतींसह तसेच दोन्ही वर्षांत तालुकास्तरावर प्रथम क्रमांक पटकावलेल्या ग्रामपंचायतींनाही यावेळी जि. प. अध्यक्षांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. संबंधित सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक आदींनी हा पुरस्कार स्वीकारला.
सिंधुदुर्ग जिल्हय़ात शिस्त आणि स्वच्छता हा संस्कृतीचाच एक भाग बनला असल्याचे गौरवोद्गार जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर यांनी यावेळी बोलताना काढले. पुरस्कार मिळणे हा त्याचाच एक भाग आहे. देशाच्या जलद विकासासाठी शासनाचा फोकस हा ग्रामपंचायतीवर असावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
आर. आर. पाटील हे एक आगळं-वेगळं व्यक्तिमत्व होतं. त्यांच्या नावाने दिल्या गेलेल्या या पुरस्कारामुळे ग्रामपंचायतींची जबाबदारी वाढली आहे, असे प्रतिपादन प्रदीप नारकर यांनी केले. तसेच नागरिकांना चांगल्या सेवा देऊन वेगळा आदर्श निर्माण करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
दीपाली पाटील यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन प्राथमिक शिक्षक शामसुंदर सावंत यांनी केले. तर विनायक ठाकूर यांनी आभार मानले.
या पुरस्कार वितरणानंतर मनोगत व्यक्त करताना अशा प्रकारचे मोठय़ा रकमेचे पुरस्कार ग्रामपंचायतींना मिळाल्यास कुठलीही ग्रामपंचायत विकासात मागे राहणार नसल्याचा विश्वास कसालच्या ग्रामसेविका श्रीमती कोकरे यांनी व्यक्त केला. तर ग्रामस्थांच्या सहभागाशिवाय कोणताही पुरस्कार मिळणे अशक्य असल्याचे सांगत पणदूर सरपंच दादा साईल यांनी ग्रामसभेचे महत्व अधोरेखित केले.
पालकमंत्री उदय सामंत यांच्या ऑनलाईन शुभेच्छा
या कार्यक्रमाला पालकमंत्री उदय सामंत यांनी ऑनलाईन उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, आर. आर. पाटील हे विकासकामात कधीच राजकारण आणत नव्हते. पक्ष वेगळे असतानाही ते चांगलच बोलायचे. त्यांचा हा आदर्श तंतोतंत पाळणं हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, अशी भावना व्यक्त केली.