केंद्रीय मंत्री नितीन गडकरांची माहिती : विकासात 29 टक्के वाटा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग क्षेत्राला सरकारकडून लवकरच पॅकेजची घोषणा अपेक्षित असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच दिली.
ते म्हणाले की, सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग क्षेत्राचा देशातील विकासाचा वाटा हा 29 टक्के इतका आहे तर दुसरीकडे निर्यातीचा वाटा 48 टक्के इतका आहे. मोठय़ा प्रमाणात रोजगार देणारे हे क्षेत्र आहे. पण निर्मितीत महत्त्वाचे योगदान देणारे हे क्षेत्र सध्याला कोरोनामुळे ठप्प आहे. या उद्योगातील अनेकांना नुकसानीला सामोरे जावे लागते आहे तर अनेकांवर नोकरी गमावण्याची वेळही आली आहे. येणाऱया काळात आणखी नोकर कपात होण्याची भीती आहे. या संदर्भात सरकारदरबारी विचारविनीमय करण्यात येत असून लवकरच यावर तोडगा काढला जाणार आहे. सरकारच्यावतीने या क्षेत्राला संकटातून बाहेर काढण्यासाठी आवश्यक त्या योजना हाती घेतल्या जातील, असे केंद्रीय मंत्री गडकरी यांनी सांगितले. आम्ही आमचे गुंतवणूकदार तसेच विविध विभागांशी यासंदर्भात चर्चा करतो आहोत. या क्षेत्राला चांगले पॅकेज मिळवून देण्याचा आपला प्रयत्न राहिल, असेही गडकरी यांनी सांगितले. भारतात गुंतवणूक करण्यासाठी विविध राज्य सरकारे आणि विदेशी कंपन्या यांना उद्युक्त करण्यासाठी खास संयुक्त सचिव नेमून त्यांच्यामार्फत याबाबतची कार्यवाही पार पाडली जाणार आहे. विदेशी कंपन्यांना येथे उद्योग स्थापण्यासाठी आवश्यक असणाऱया परवानग्या तीन महिन्यात देण्याची व्यवस्था केली जाणार आहे. यासाठी निश्चित समयसीमा आणि पारदर्शकता अवलंबली जाणार आहे. विविध उद्योगांना या आधी ज्या आवश्यक सवलती दिल्या जात होत्या त्याच परदेशी गुंतवणूकदारांनाही दिल्या जाणार असून देशातील परदेशी गुंतवणूक वाढवण्याच्या दृष्टीकोनातून सरकार प्रयत्नशील असणार असल्याचे शेवटी गडकरी यांनी सांगितले.