अचूक बातमी “तरुण भारत”ची, बुधवार, 15 सप्टेंबर 2021, सकाळी 9.00
● या पंधरवड्यात चार महिन्यातील सर्वात कमी बाधित
● 1 सप्टेंबरपासून 5,852 रूग्ण
● मृत्यूदरही घटल्याने विघ्न दूर
● आता यापुढे जबाबदारी जिल्हावासियांची
● अन्यथा संभाव्य धोका उंबरठ्यावर
● गत 24 तासात 239 रूग्ण वाढले
● 7 हजार 352 संंशयितांच्या चाचण्या
● कोरोनामुक्ती 2 लाख 34 हजार पार
सातारा / प्रतिनिधी :
विघ्नहर्त्या गणरायाचेे आगमन झाल्याने जिल्ह्यात साधेपणाच्या उत्सवातही गणेशभक्तांचा उत्साह कायम आहे. या उत्साही वातावरणातच कोरोना रूग्णवाढीच्या आकड्यावरून सुखःवार्ता कानी पडली आहे. गेल्या चार महिन्यात धडकी भरवणारे कोरोना रूग्णवाढीचे आकडे सप्टेंबर महिन्यात कमालीचे घसरले आहेत. गत पंधरा दिवसात जिल्ह्यात 5 हजार 842 रूग्ण वाढले आहेत. मृत्यूदरही घटल्याने जिल्हावासियांची चिंता कमी होत आहे. दरम्यान बुधवारी आलेल्या अहवालात गत 24 तासात जिल्ह्यात नव्या रूग्णांची भर पडली आहे.
दोन अपवाद वगळता रूग्णवाढ पाचशेच्या खाली
जिल्ह्यात मे, जून, जुलै महिन्यात रूग्णवाढीचा वेग धक्कादायक होता. दोन दिवसाला सुमारे तीन ते पाच हजारांची वाढ होत होती. या वाढीने जिल्हा राज्यातील कोरोनाचा हॉटस्पॉट बनला होता. सप्टेंबर महिन्यात फक्त 2 सप्टेंबरला 560 व 4 सप्टेंबरला 540 रूग्णवाढ वगळता इतर 13 दिवसात रूग्णवाढ पाचशेच्या खाली आली आहे. मृत्यूदरही कमी झाला आहे. मृत्यूदर कमी झाल्याने चिंता कमी झाली आहे.
यापुढे जबाबदारी जिल्हावासियांची अन् प्रशासनाची
रूग्णवाढीचे आकडे पाहिल्यास जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे, असे म्हणायला काहीसा वाव आहे. पण यावर ठोस शिक्कामोर्तब करण्यासाठी अजुनही काही दिवस वाट पहावी लागेल. कारण रूग्णवाढीचे घसरलेले आकडे आटोक्यात ठेवण्याची जबाबदारी एकट्या जिल्हा प्रशासनाची नाही तर प्रत्येक जिल्हावासियाची आहे. सध्या सणासुदीचे दिवस सुरू आहेत. या दिवसात गर्दी, छोटे-मोठे कार्यक्रम होत असतात. यावेेळी नियमांचे पालन आवश्यक आहे. अन्यथा आकड्यांची परिस्थिती बदलायला जराही वेळ लागणार नाही. प्रशासनानेही मास्क न लावणारांवर आणि नियम न पाळणारांवर कारवाईचा धडाका सुरूच ठेवला पाहिजे.
मंगळवारपर्यंत जिल्हय़ात
एकूण तपासणी 19,37,483
एकूण बाधित 2,45,238
एकूण कोरोनामुक्त 2,34,115
एकूण मृत्यू 6,019
एकूण उपचारार्थ 8,051
मंगळवारी जिल्हय़ात
बाधित 239
मुक्त 1,054
मृत्यू 00