प्रतिनिधी/पुणे
येथील धनंजय कुलकर्णी यांनी लिहिलेल्या ‘पत्ररूप भावार्थ गीत रामायण’ या पुस्तकाचे सुखदा पंतबाळेकुंद्री यांनी ब्रेल लिपीमध्ये रुपांतर केले आहे. त्याचे प्रकाशन नुकतेच महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांच्या आजवरच्या ब्रेल लिपीमधील कामाच्या योगदानाबद्दल राज्यपालांनी त्यांचा सत्कार केला व त्यांच्या योगदानाचे कौतुक केले. यासाठी लागणारी मदत देण्याची ग्वाहीही राज्यपालांनी त्यांना दिली.
मूळच्या बेळगावच्या
सुखदा संजीव पंतबाळेकुंद्री या मूळच्या बेळगावच्या पूर्वाश्रमीच्या ज्योती कुलकर्णी. त्यांचे शालेय शिक्षण रजपूत बंधू शाळा, बालिका आदर्श विद्यालय व गोगटे कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये झाले. श्रीपंतमहाराज बाळेकुंद्री यांच्या त्या नातसून आहेत. अंध व्यक्तींसाठी ब्रेल लिपीच्या माध्यमातून गेली वीस वर्षे त्या काम करत आहेत. त्यांनी मराठी भाषेतील बालसाहित्य, शिक्षण साहित्य, कादंबऱया, कथासंग्रह, आत्मचरित्र इत्यादी शेकडो पुस्तके ब्रेल लिपीमध्ये अनुवादीत करून प्रज्ञाचक्षूंसाठी उपलब्ध करून दिली आहेत. पुण्यातील रोबोटिक इंजिनियर उमेश जेरे यांनी ब्रेलसाठी सॉफ्टवेअर तयार केले आहे. उमेश जेरे आणि सुखदा पंतबाळेकुंद्री हे उभयता हा उपक्रम राबवितात.
शिक्षण प्रसारक मंडळी आणि अमृतसंचय प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर, ज्येष्ठ विचारवंत आणि संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, ग. दि. माडगूळकर यांचे चिरंजीव आनंद माडगूळकर, शिक्षण प्रसारक मंडळींचे अध्यक्ष ऍड. सदानंद फडके, नियामक मंडळाचे अध्यक्ष ऍड. एस. के. जैन, अमृतसंचय प्रतिष्ठानचे विश्वस्त डॉ. दत्तात्रय तापकीर, सचिव नरेंद्र उंब्रजकर आदी मान्यवर उपस्थित होते.