अध्याय तेविसावा
मोक्षप्राप्तीसाठी परमशांती बाळगणे अत्यंत आवश्यक आहे. संन्याशाने परमशांती कशी प्राप्त करून घेतली ते भगवंत उद्धवाला सांगत होते. ते म्हणाले, लोकांनी कितीही त्रास दिला तरी शांतपणे भोगणे हेच हितावह असते. संन्याशाला त्याच्याच गावच्या लोकांनी जाणूनबुजून कितीही त्रास दिला तरी तो संन्यासी बिलकुल रागावला नाही कारण हे सर्व आपल्या पूर्वकर्मांचे फळ असल्याने आपल्याला हे अवश्य भोगले पाहिजे असे तो मानत असे. तो म्हणे, तीन प्रकारच्या प्रारब्धाने सर्व लोक बद्ध झाले आहेत, त्यामुळे ते अवश्य भोगावे लागते. राजा व रंक कुणीही ह्यातून सुटत नाही. ते भोगण्याला जो त्रास मानतो तो केवळ मूर्ख व मंदबुद्धि होय. प्रारब्धाने जे भोग आपल्या वाटय़ाला येतील, ते हरिहराला वश करून घेतले असतानाही भोगण्याला चुकत नाहीत. श्रीकृष्ण पांडवांना साहय़ करीत होता तरी त्यांनी नष्टचर्य भोगलेच. विष्णु व शंकर ह्यांना जरी प्रसन्न करून घेतले, तरी प्रारब्ध कोणालाच टळत नाही. त्यामुळे तिरस्कार करून दुर्जन लोक जरी त्याला धर्मापासून दूर करण्याचा प्रयत्न करत होते, तरीसुद्धा तो सात्त्विक ध्येयाने आपल्या धर्माशी एकनि÷ राहीला. त्यामागे त्या संन्याशाने जी कारणमीमांसा सांगितली, ती मी तुला सांगतो. तो उपदेश मनांत धरलास तर मनाला द्वंद्वातील समता दिसू लागते, आत्मशांती सहज प्रगट होते, आणि सायुज्यमुक्ति घरात येते. त्या संन्याशाने सांगितले की, माझ्या सुखदुःखाला कारणीभूत ही माणसे नाहीत, देवता नाहीत, शरीर नाही, ग्रह नाहीत, कर्म नाही की काल नाही, केवळ मनच त्याला खरे कारणीभूत आहे, असे श्रुती सांगतात कारण तेच जीवाला या संसारचक्रात फिरवीत असते.
सज्जन, दुर्जन आणि साधारण असे जे तीन प्रकारचे लोक असतात, ते सुखाला किंवा दुःखाला मुळीच कारण होत नाहीत कारण लोक म्हणून जितके आहेत, तितके सर्व पंचमहाभूतांपासून झालेले आहेत. माझाही देह तसाच आहे. तेव्हा लोक आणि मी अशा दोहोंचे ऐक्मय आहे. सुखदुःख केवळ मनापाशी उत्पन्न होते.
देवता ह्याच अवश्य सुखदुःख देणाऱया आहेत असे म्हणावे, तर देवतांचे समुदाय हे मनाने कल्पिलेले आहेत. तेव्हा त्यांचे सुखदुःखही मला लागावयाचे नाही.
देवतारूपाने आपले मन आहे आणि त्या मनानेच सर्व देवता कल्पिलेल्या आहेत. अर्थात् देवता जेव्हा सुखदुःख देतात असे मानले तर, त्याला मुख्य कारण मनच झाले. जेथे जसा मनाचा सद्भाव असेल, तेथे त्याप्रमाणेच त्या स्वरूपात देवी किंवा देव भासमान होतो. अहो! असे पहा की, जेथे मनाची अश्रद्धा असते, तेथे असलेला देवही दिसत नाही. म्हणून ज्या सर्व देवता आहेत, त्या सर्व मनाच्या कल्पना होत. तेव्हा त्यांच्यापासून सुखदुःखाची व्यथा झाल्यास ती मनामुळेच आहे हे निश्चित. बरे, आत्मा हाच सुखदुःखांचे कारण आहे असे म्हणावे, तर हे बोलणे मुळी खोटे आहे. आत्म्याच्या ठिकाणी द्वैतभावना मुळीच असत नाही. मी एक सुखदुःख देणारा आहे आणि हा एक सुखदुःखांचा भोक्ता आहे ही गोष्ट वास्तविक आत्म्याच्या ठायी मुळीच असत नाही. जन्मकाळचे क्रूर ग्रह सुखदुःखांस कारण असतात असे म्हणावे, तर आपले मन हेच स्वतः ग्रहांचाही ग्रह आहे. ते जन्ममरण भोगायला लावते. ग्रहांची ग्रहदशा देह पडेपर्यंत असते पण मनाची ग्रहदशा त्याहून अधिक आहे. ते नानातऱहेने दुःख भोगविते आणि जन्मजन्मांतरीही सोडीत नाही. दुष्ट ग्रह थोडाच काळ पीडा देतो, पण मनाची पीडा कोटय़वधि जन्म असते. दुष्टग्रह असतो तो आपली भोगदशा भोगली की सोडून देतो, परंतु मन कल्पांतीही सोडत नाही. मन जर देहाभिमान धरणार नाही, तर ग्रहांची पीडा कोण मानतो? म्हणून सुखदुःखाला कारण होणारा मन हाच एक महाग्रह आहे. आता येथे आपले कर्मच दुःखदायक आहे असेही म्हणता येत नाही. कारण, कर्म हे कर्मबंधांतून सोडविणारे आहे. तेव्हा तेच दुःखदायक कसे होईल ?
क्रमशः