वाढता खर्च व कोरोनाबाधीतांची वाढती संख्या दुहेरी संकटामुळे मायदेशात परतण्याची घाई
प्रतिनिधी / शिरोडा
सिंगापूर हे जगातील सुखासीन व अत्यंत प्रगत राष्ट्र. आशियातील एक प्रसिद्ध जागतिक पर्यटन केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱया या राष्ट्रात कोरोना महामारीच्या लॉकडाऊनमुळे हजारो पर्यटक अडकून पडले आहेत. आयटी, बँकिंग व शिपिंग या क्षेत्रातील गलेलठ्ठ पगाराच्या नोकरीवर अनेक गोमंतकीय व भारतीय सिंगापूरमध्ये आहेत. मात्र आता लॉकडाऊनमुळे त्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. कधीकाळी हे संक्रमण संपुष्टात येईल व मायदेशी आपल्या कुटुंबियांकडे सुखरुप पोचू याची घाई या सर्वांनाच लागली आहे.
मार्च महिन्यात हाताच्या बोटावर मोजण्याएवढे कोरोनाबाधीत सिंगापूरमध्ये सापडले होते. महिन्याभरात हा आकडा प्रचंड गतीने वाढून आज आठ हजारापर्यंत पोचला आहे. त्यामुळे सिंगापूरमध्ये अडकून पडलेल्या गोमंतकीयांची चिंता वाढली आहे. सिंगापूरमध्ये अडकून पडलेल्या विश्वेश पांडुरंग शानभाग या गोमंतकीय युवकाशी संपर्क झाल्याने तेथील परिस्थितीचा अंदाज आला.
सिंगापूरमध्ये राहणे बनले कठिण
सिंगापूरमध्ये भारतीयांना राहणे कठिण झाल्याचे तो सांगतो. विश्वेश हा सिंगापूरमधील एका आयटी कंपनीमध्ये उच्च पदावर नोकरीला आहे. त्याच्यासारखेच अनेक गोमंतकीय व भारतीय युवक आयटी, बँक व शिपिंग क्षेत्रात नोकरीला आहेत. याशिवाय भारतासह, पाकिस्तान व बांगालादेशातील बरेच मजूर बांधकाम क्षेत्रात कामाला आहेत. सिंगापूर हे जगातील श्रीमंत राष्ट्र असले तरी रोजगारासाठी तेथे वास्तव्यास असलेल्या इतर देशातील सर्वसामान्यांना बेकार राहून जास्तकाळ जगणे अत्यंत खर्चिक असल्याचे विश्वेश सांगतो.
जेवणखाण बनले खर्चिक
सिंगापूरमध्ये साध्या हॉटेलमध्ये एक रात्र थांबण्यासाठीही किमान दहा हजार रुपये मोजावे लागतात. लॉकडाऊनमुळे सध्या तेथील सर्व हॉटेल्स, उपाहारगृहे, मॉल्स बंद आहेत. सिंगापूरमध्ये जेवणखाण किंवा नाश्ता घरी बनविण्याची पद्धत नाही. बहुतेक लोक तेथील फुडकोर्टमध्ये जाऊनच जेवण नाश्ता करतात. हे सर्व फुडकोर्ट बंद असून पार्सल सर्विस तेवढी सुरु आहे. दर शंभर मिटरच्या अंतरावर असे फुडकोर्ट आढळतात. पण मजुरीसाठी गेलेल्या व छोटय़ा नोकरीवर असलेल्या भारतीयांना हे खानपान खिशाला परवडणारे नाही.
भारतीयांना नोकऱया गमवाण्याची शक्यता
सर्वच क्षेत्रात लॉकडाऊन असल्याने यापुढे सिंगापूरमध्ये नोकरीची शाश्वतीही धुसर होत चालली आहे. सिंगापूरची आर्थिक स्थिती उतरंडीला लागल्याने भविष्यात अनेक भारतीयांना आपल्या नोकऱया गमवाव्या लागण्याची शक्यता आहे. सध्या तेथील सरकारने भारतीयांसह तेथे नोकरी धंद्यानिमित्त वास्तव्यास असलेल्या इतर देशातील नागरिकांना लॉकडाऊनमुळे काही सवलती दिलेल्या आहेत. पण कोरोनाचे संक्रमण झपाटय़ाने वाढत असल्याने अनिश्चित काळापर्यंत हे लॉकडाऊन राहू शकते. शिवाय अशा आणिबाणीच्या परिस्थितीत एखाद्या परकीय देशात जास्तकाळ भारतीयांना सुरक्षित वाटत नाही.
सध्या सिंगापूरमध्ये जे सर्वाधिक कोरोनाबाधीत आहेत, ते परराष्ट्रातील मजूर आहेत. तेथील वास्तव्य महाग असल्याने छोटय़ा खोल्यांमध्ये अत्यंत दाटीवाटीने हे मजूर राहतात. त्यांच्या या डॉर्मेटरीच कोरोना संसर्गाचे प्रमुख केंद्र बनल्याने त्यांना कॉरंटाईन करण्यात आले आहे. हा संसर्ग वाढल्यास वैद्यकीय सुविधांमध्ये प्राधान्य तेथील स्थानिक नागरिक व विदेशी करदात्यांना असेल. इतरांना या सुविधांसाठी पैसे मोजावे लागणार आहेत.
त्यामुळे अनेक भारतीयांनी आपल्याला परत मायदेशी आणण्याची सोय करावी असे ऑनलाईन अर्ज भारत सरकारकडे केले आहेत. पण त्यांना अद्याप योग्य प्रतिसाद मिळत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.