प्रतिनिधी / पणजी
चैत्र महिना हा हिंदू पंचांगातल्या शालिवाहन शकानुसार तसेच भारतीय सौर राष्ट्रीय पंचांगानुसार वर्षाचा पहिला महिना आहे. चैत्र महिन्यात वसंत ऋतूची सुरुवात होते. सध्या उष्णतेच्या आसमंतात चैत्रपालवी झाडावर झळाळू लागली आहे. सगळीकडे उत्तमोत्तम गोष्टींची पखरण करणारा हा वसंत मोगऱयाचा सुगंध, आंब्याची डाळ, पन्हे या साऱया थाटात आगमन केले आहे.
चैत्रारंभ सृष्टीचा सृजनोत्सव
चैत्रारंभाची किंचितशी चाहूल मन मोहरून टाकणारी असते. चैत्राचे ऊन म्हणजे फक्त झळा असे नाही त्यात चैत्राची म्हणून एक सृजनशीलता असते. झाडांना पल्लवीत करणारी आणि फळांना गोडवा आणणारी याशिवाय खास चैत्राची म्हणून ओळखली जाणारी फुले ओसंडू लागतात. चैत्राचा उदर म्हणजे साऱयांनाच नवी उमेद आणि नवा उत्साह, त्यातून फुलत जाणारे उत्सव समारंभ, फुलांची होत राहणारी बरसात आणि नवलाई ल्यालेली पालवीची झाडे, एकूणच हा सृष्टीचा सृजनोत्सव असतो.
सुगंधी मोहोर फुलवणारी चैत्रगौर
नवचैतन्याची चाहूल घेऊन येणारा हा वसंत ऋतूत आनंदमय, खूप सुंदर आयुष्य पुन्हा नव्याने जगण्याचे मोहोर फुलवत चैत्रगौर येते. त्यात आंबट गोड चवींची रेलचेल, कैरीची डाळ, पन्हे तो अत्तरांचा सुगंध नववर्षाची सुरुवात सुगंधमय सुंदर चवीने करते. मोगरा, चाफा अशा सुगंधित फुलांची सजावट, पक्वानांचे नैवेद्याने चैत्रगौरीची पूजा केली जाते. विशेष म्हणजे चैत्रगौरीसाठी मोगऱयांच्या फुलांना मागणी असते. काही ठिकाणी मोगऱयांच्या फुलांच्या गजऱयांची आरास केली जाते. याशिवाय चैत्रगौरीच्या हळदीकुंकूला तर सुवासिनींना मोगऱयांची फुले किंवा गजरे दिले जातात. सुवासिक सुगंधाच्या गर्दीत एक स्त्राr म्हणून आपले अस्तित्व समर्थपणे दाखवत आपला स्नेह, आपुलकी वृद्धिंगत करण्याचे चैत्रगौरीचे हळदीकुंकू हे एक सामर्थ्य माध्यम आहे.
उष्म्याची मरगळ घालविणारा सुगंधोत्सव
उष्म्यामुळे तनामनाला आलेली मरगळ घालविणाऱया निसर्गोत्सवात पारिजात, गुलाब, जास्वंद, सुरंगी, कृष्णकमळ रसगंधाने धुंद झालेले असतात. वातावरणात संमिश्र सुगंध पसरायला लागतो. रात्री मग मोगऱयाच्या कळा तरारतात आणि त्याचा सुगंध हवेत पसरायला लागतो. साधा मोगरा, बट मोगरा आदी फुले रसगंधाने धुंद होतात परंतु सध्या यातील काही फुलांचे प्रकार दुर्मीळ झाले असले तरी चैत्र महिना सुगंधाने आणि नाविन्याने जगण्याची नवीन ऊर्जा नक्कीच देतो. ग्रामीण भागात काही ठिकाणी मोगरीची, कृष्णकमळ दिसून येतात परंतु सुरंगीसारख्या फुलांचे प्रकार पुष्कळ प्रमाणात दुर्मीळ झाले आहेत.