नवी दिल्ली / वृत्तसंस्था
चिराग शेट्टी व सात्विक साईराज रणकिरेड्डी या भारतीय पुरुष दुहेरीतील जोडीने आगामी सुदिरमन चषक मिश्र चॅम्पियनशिप गटातून माघार घेतली आहे. प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणास्तव आपण खेळू शकणार नसल्याचे त्यांनी कळवले. यंदाची सुदिरमन चषक स्पर्धा दि. 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर या कालावधीत फिनलँडमध्ये खेळवली जाणार आहे. चिराग व सात्विक यांचा या स्पर्धेसाठी 12 सदस्यीय भारतीय संघात समावेश होता.
‘सुदिरमन चषकानंतर थॉमस चषकातही ते खेळतील का, याची आताच खात्री देता येणार नाही. चिराग आजारावर मात करुन पूर्ण तंदुरुस्त झाल्यानंतरच याबद्दल विचार होईल’, असे भारतीय बॅडमिंटन संघटनेतील सूत्राने नमूद केले. थॉमस व उबेर चषक स्पर्धा दि. 9 ते 17 ऑक्टोबर या कालावधीत डेन्मार्कमधील आर्हस येथे खेळवली जाणार आहे. दुहेरी ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधू हिने आगामी दोन स्पर्धांसाठी आपला विचार करु नये, अशी विनंती यापूर्वीच केली होती.
सुदिरमन चषक ही या वर्षातील पहिलीच बीडब्ल्यूएफ स्पर्धा असणार आहे. कोव्हिड-19 निर्बंधामुळे विश्व संघटनेला बहुतांशी स्पर्धा एक तरी रद्द कराव्या लागल्या किंवा लांबणीवर टाकाव्या लागल्या आहेत. चिराग व सात्विक यांच्या गैरहजेरीत ध्रुव कपिला व एमआर अर्जुन यांच्यावर भारताची भिस्त असेल, असे संकेत आहेत. सिलेक्शन ट्रायलमध्ये ही जोडी आघाडीवर होती.
भारतीय संघात किदाम्बी श्रीकांत, बी. साई प्रणित, महिला दुहेरी जोडी अश्विनी पोनप्पा व एन. सिक्की रेड्डी, नवोदित मालविका बनसोड, आदिती भट्ट, तनिषा क्रॅस्टो, ऋतुपर्णा पांडा यांचा समावेश आहे. या स्पर्धेत विद्यमान विजेते चीन, थायलंड, यजमान फिनलँड यांच्यासह भारताचा अ गटात समावेश आहे.