आयसीसी महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेतील फायनलच्या पार्श्वभूमीवर वेदा कृष्णमूर्तीचे प्रतिपादन
मेलबर्न / वृत्तसंस्था
आयसीसी महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुदैव आपल्या बाजूने असेल आणि आम्ही आपली मोहोर उमटवू, अशी आशा भारताची अनुभवी फलंदाज वेदा कृष्णमूर्ती हिने व्यक्त केली. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात उद्या (रविवार दि. 8) येथे जेतेपदासाठी निर्णायक अंतिम लढत रंगणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत वेदा बोलत होती. भारतीय प्रमाणवेळेनुसार, या लढतीला दुपारी 12.30 वाजता सुरुवात होणार आहे.
भारतीय महिला संघाने यंदा या स्पर्धेच्या सलामी लढतीतच ऑस्ट्रेलियाला 17 धावांनी चीत केले होते. त्यामुळे, भारतीय संघाचे मनोबल निश्चितच उंचावलेले असणार आहे.
‘माझा सुदैवावर बराच विश्वास आहे आणि अंतिम लढतीत दैवाचा कल आमच्या बाजूने असेल, असा विश्वास वाटतो’, असे वेदा येथे म्हणाली. यापूर्वी, 2017 महिला वनडे विश्वचषक स्पर्धेत भारताला उपजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यावेळी विजयश्रीने हुलकावणी दिली, त्यात वेदाचा त्या संघात समावेश होता. त्यामुळ, यशाने हुलकावणी दिल्यानंतर काय होते, याची तिला पुरेपूर कल्पना आहे. त्या पार्श्वभूमीवर, जेतेपद खेचून आणण्यासाठी पूर्ण अनुभव पणाला लावावा लागेल, याचीही तिला जाणीव आहे.
यापूर्वी, गुरुवारी स्पर्धेच्या उपांत्य लढतीत भारतासमोर इंग्लंडचे आव्हान होते. मात्र, पावसाचा व्यत्यय आल्याने ती लढत होऊ शकली नाही आणि साखळी फेरीअखेर अ गटातून अव्वल असल्याने भारताचे अंतिम फेरीतील स्थान आपसूकच निश्चित झाले.
‘आम्ही अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले, ही साखळी फेरीत उत्तम खेळल्याची पोचपावती आहे. हवामान आपल्या हातात नसते. अशा परिस्थितीत चारही सामने जिंकत अव्वलस्थानी विराजमान होणे ही लक्षवेधी बाब ठरली. अंतिम फेरीत पोहोचणे हे आमचे पहिले लक्ष्य असेल आणि त्यानंतर आम्ही पुढील विचार करु, असे यापूर्वीच स्पष्ट केले होते. त्यानुसार, आमची रणनीती निश्चित आहे. आता अंतिम फेरीत पूर्ण ताकदीनिशी आम्ही प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व गाजवण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहोत’, असे वेदा पुढे म्हणाली.
भारत-ऑस्ट्रेलिया महिला संघात अलीकडे बरेच सामने चुरशीचे झाले असून तिरंगी मालिकेत भारतीय महिलांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध 173 धावांचा पाठलाग करत जेतेपदावर आपली मोहोर उमटवली होती व त्यानंतर या स्पर्धेच्या सलामी लढतीत ऑस्ट्रेलियाचाच धोबीपछाड केला होता. स्वतः वेदा कृष्णमूर्ती उत्तम फिनिशर म्हणून ओळखली जाते आणि भारताने बांगलादेशविरुद्ध विजय खेचून आणला, त्यावेळी तिच्या 11 चेंडूतील जलद 20 धावांचा वाटा सिंहाचा राहिला होता.
मूळ कर्नाटकाची असलेल्या वेदाला आतापर्यंत खेळलेल्या 4 सामन्यात फक्त 35 धावा जमवता आल्या आहेत. पण, येथे निर्णायक अंतिम फेरीत सूर सापडला तर भारतीय संघ आणखी मजबूत होईल, हे निश्चित आहे. विंडीजमधील विश्वचषक स्पर्धेत जेतेपद मिळवून देता आले नव्हते, त्याची कसर येथे भरुन काढण्याचे लक्ष्य तिच्यासमोर असणार आहे.
मेगन स्कट म्हणते, पुन्हा शेफाली, स्मृतीला गोलंदाजी करण्याची इच्छा नाही!
अलीकडेच शेफाली वर्मा व स्मृती मानधनाच्या फटकेबाजीला सामोरे जावे लागलेल्या ऑस्ट्रेलियन मध्यमगती गोलंदाज मेगन स्कटने या दोघींसमोर किमान पॉवर प्लेमध्ये तरी सामोरे जाण्याची आपली इच्छा नसल्याचे नमूद केले.
ऑस्ट्रेलियाने या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रतिस्पर्धी दक्षिण आफ्रिकेचा 5 धावांनी निसटता पराभव केला, त्यावेळी त्या लढतीत स्कटने 17 धावात 2 बळी घेत मोलाचा वाटा उचलला होता. पण, तरीही या स्पर्धेच्या सलामीच्या लढतीत विशेषतः शेफाली वर्माने जो समाचार घेतला होता, तो स्कट अजूनही विसरलेली नाही.
शेफालीने त्यावेळी स्कटच्या पहिल्या षटकातच 4 चौकार वसूल केले आणि या पार्श्वभूमीवर स्कटने मी भारताविरुद्ध खेळण्याचा तिरस्कार करते, असे नमूद केले. ‘तिरंगी मालिकेत शेफालीने माझ्या गोलंदाजीवर जो षटकार खेचला, तितका उत्तूंग फटका मला कोणीच मारलेला नाही. माझी गोलंदाजी भारतीय महिला फलंदाज सहजपणे खेळतात, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे, अंतिम फेरीत खूपच जागरुक रहावे लागेल’, असे स्कट याप्रसंगी पुढे म्हणाली.
न्यूझीलंडच्या किम कॉटन, पाकिस्तानच्या अहसान रझा अंतिम फेरीतील पंच
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात उद्या खेळवल्या जाणाऱया अंतिम लढतीत न्यूझीलंडच्या किम कॉटन व पाकिस्तानच्या अहसान रझा या मैदानी पंच असतील. 42 वर्षीय कॉटन यांनी यापूर्वी ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका यांच्यातील उपांत्य लढतीत देखील पंच म्हणून काम पाहिले होते. मैदानी पंच म्हणून त्या उद्या या स्पर्धेत पाचव्यांदा जबाबदारी पार पाडतील. याशिवाय, विंडीजचे ग्रेगरी ब्रेथवेट टीव्ही पंच, झिम्बाब्वेचे लँग्टन रुझेरे चौथे पंच असतील तर इंग्लंडचे ख्रिस ब्रॉड सामनाधिकारी असणार आहेत.
पाकिस्तानच्या अहसान रझा भारत-इंग्लंड यांच्यातील उपांत्य लढतीसाठी पंचगिरी करणे अपेक्षित होते. पण, पावसामुळे ती लढत झाली नाही आणि भारतीय महिला संघ साखळी फेरीअखेर गटात अव्वल असल्याने अंतिम फेरीत पोहोचले होते.