पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंदच्या पार्श्वभूमीवर प्रतिपादन
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
जुने प्रभावहीन कायदे सुधारल्याशिवाय देशाची प्रगती अशक्य आहे. नवभारताची निर्मिती करायची असेल तर हे करावेच लागेल. 100 वर्षांपूर्वीचे कायदे आता निरुपयोगी झाले असून त्यांचे ओझे झाले आहे. त्यामुळे हे कायदे बदलण्याची नितांत आवश्यकता आहे, अशी स्पष्टोक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, आजच्या काही शेतकरी संघटनांच्या भारत बंदच्या पार्श्वभूमीवर केली आहे.
पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या संक्षिप्त वक्तव्यात देशाचा विकास आणि आर्थिक सुधारणा यांचा उहापोह केला. त्यांनी आजचा भारत बंद, नवे कृषी कायदे किंवा सध्या सुरू असणारे शेतकरी आंदोलन यांचा प्रत्यक्ष उल्लेख केला नाही. मात्र जुन्या कायद्यांमधील सुधारणांवर भर दिला. या सुधारणा केल्याखेरीज दुसरा पर्याय नाही. 21 व्या शतकातील भारताचे निर्मिती 20 व्या किंवा 19 व्या शतकांमधील कायद्यांच्या आधारे होऊ शकत नाही, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.
नव्याचा स्वीकार आवश्यक
आज कोणत्याही क्षेत्राच्या प्रगतीसाठी नवे तंत्रज्ञान, नवे व्यवस्थापन आणि नव्या गुंतवणुकीची आवश्यकता आहे .नव्या सुविधा आणि सोयीही द्याव्या लागणार आहेत. जे कायदे पूर्वीच्या काळी लाभदायक होते, ते आता तसे राहिलेले नाहीत. काळ बदलला आहे. आपल्यालाही काळाप्रमाणे चालावयास हवे, अशा अर्थाचा संदेश त्यांनी त्यांच्या सोमवारच्या वक्तव्यातून दिला आहे.
4 हजार कोटींच्या प्रकल्पांचे उद्घाटन
पंतप्रधान मोदी यांनी सोमवारी अरूणाचल प्रदेशात 4000 कोटी रूपयांच्या महत्वपूर्ण प्रकल्पांचे उद्घाटन केले आहे. या सीमारेषेवरील अनेक रस्त्यांचा समावेश आहे. राज्यातील आयजी मैदानात झालेल्या कार्यक्रमात त्यांनी पायाभूत सुविधांच्या विकासासाठी केंद्र सरकार करत असलेल्या प्रयत्नांचा आढावा घेतला. अरूणाचल प्रदेशचा भारताला अभिमान वाटतो. या राज्याच्या विकासासाठी आम्ही नेहमीच प्राधान्याने काम करू. गेल्या 55 महिन्यांमध्ये या राज्याच्या प्रगतीसाठी अनेक प्रकल्पांची निर्मिती करण्यात आली. सध्या राज्यात 13 हजार कोटींची कामे सुरू आहेत. मागच्या सरकारांनी या भागाच्या विकासाकडे अक्षम्य दुर्लक्ष केले. त्यामुळे हा भाग मागास राहिला, असा आरोपही त्यांनी केला.
पायाभूत सुविधांवर भर
ड अरूणाचलसह ईशान्य भारतात पायाभूत सुविधांवर भर देणार
ड नवभारत निर्मितीसाठी काही जुन्या बाबींचा त्याग अनिवार्य
ड विकासासाठी नवे तंत्रज्ञान, नव्या संकल्पांनची मोठी आवश्यकता