ऑनलाईन टीम / मुंबई :
राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यपालांनी केलेल्या अभिभाषणावरील चर्चा करताना विरोधकांनी केलेल्या आरोपांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज खरपूस समाचार घेतला.
भाषणाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांनी सुधीर मुनगंटीवार यांना कोपरखळी मारली.
ते म्हणाले, सुधीर मुनगंटीवारांचे भाषण पाहताना ‘नटसम्राट’ पाहात असल्याचा भास झाला, असे म्हणत त्यांनी मुनगंटीवारांना देखील कोपरखळी मारली. पुढे ते म्हणाले, कलाकारांना राजकारणात वाव मिळत नाही. बाकी तुमचेही माझ्यासारखेच झाले आहे. मी फोटोग्राफर, मी गड किल्ल्यांचे फोटो काढतो. पण सध्या ते करता येत नाही. माणसातील कलाकार हा लपून राहत नाही. तुम्ही ही तुमच्यातील कलाकार मारू नका, असा चिमटा देखील काढला.
- आम्ही 5 रुपयात शिवभोजन थाळी देतो
आम्ही 5 रुपयात पोटभर शिवभोजन थाळी देतो. पण ती भरलेली थाळी दिली. रिकामी थाळी वाजवायला देत नाही. आमच्यात काम करण्याची धमक आहे.
इंधन दरवाढीवरून केंद्राला टोला पेट्रोल डिझेल दर वाढीवरुन केंद्र सरकारला टोला लगावला.
- औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करणारच
सरदार पटेल स्टेडियमचे नाव का बदलले? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. स्टेडियमचे नाव बदलले म्हणून भारत मॅच हरणार नाही. औरंगाबादचे नामकरण नक्कीच संभाजीनगर करणार.
- मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन… असे म्हणत कोरोना पुन्हा आला
विरोधकांनी कोरोना परिस्थितीवरून सरकारच्या कामावर उपस्थित केलेल्या प्रश्नांना ठाकरे यांनी उत्तर दिले. यावेळी ‘पुन्हा येईन… पुन्हा येईन’वरुन ठाकरे यांनी फडणवीसांना टोला लगावला.ते म्हणाले, कोरोना म्हणतो, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन.
- कोरोनावर मात करण्यासाठी त्रिसूत्री पाळणे आवश्यक
पुढे ते म्हणाले, कोरोना हा विषाणू आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा एकही रुग्ण लपवलेला नाही. खोटेपणा करणे आमच्या रक्तात नाही. बंद दाराआड कधी खोटेपणा केला नाही, असा टोला देखील भाजपला लगावला. पुढे ते म्हणाले, कोरोना काळात स्थलांतरिच्या प्रश्नांचे निवारण केले. कोरोना काळात महाराष्ट्रात राज्य सरकारने खूप काम केले.पाठ थोपटून घ्यायला देखील काम करणारी छाती लागते असा टोला देखील भाजपला लगावला.
पुढे ते म्हणाले, कोरोना विषाणू भेदभाव करत नाही, त्यामुळे त्याची थट्टा करू नका. कोरोना काळात योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे. कोरोनावर मात करण्यासाठी त्रिसूत्री पाळायलाच हवी. मास्क घालणे, हात धुणे आणि सामाजिक अंतर पाळणे हे कोरोना टाळण्यासाठी आवश्यक आहे.
- विदर्भ वेगळा होणार नाही
विदर्भ वेगळा होणार नाही, आणि होऊ देणार नाही. माझे आजोळ माझ्यापासून तोडू नका. हा विचार मनातून काढून टाका. विदर्भाला सोबत घेऊन आम्ही विकास करु, असेही त्यांनी यावेळी सांगितले.