ऑनलाईन टीम / मुंबई :
राष्ट्रवादीचा जन्म काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला आहे. त्यामुळे शरद पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत, असे वक्तव्य करणारे माजी मंत्री अनंत गीते यांचा राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी खरपूस समाचार घेतला. भाजपच्या ओझ्याखाली दबलेल्या गीतेंचा स्वाभिमान गळून पडला आहे. त्यांना राजकारणात स्थान राहिले नाही. त्यामुळे वैफल्यग्रस्त भावनेतून त्यांनी हे विधान केले आहे, असे तटकरे म्हणाले.
गीते यांच्या वक्तव्यावर तटकरे म्हणाले, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. हे सरकार उत्तम काम करत असून, ते 5 वर्ष टिकेल. यात शंका नसावी. मात्र, भाजपाच्या 2014 आणि 2019 च्या निवडणुकांच्या ओझ्याखाली दबलेल्या अनंत गीतेंचा स्वाभिमान गळून पडला आहे. त्यांना राजकारणात स्थान राहिले नाही. त्यामुळे ते अशा प्रकारची वक्तव्ये करत आहे. हा सूर्यावर थुंकण्याचा प्रकार आहे.
दरम्यान, गीतेंनी सोमवारी एका कार्यक्रमात काँगेस राष्ट्रवादीचे विचार एक आहेत का? दोन काँग्रेस एक विचारांची होऊ शकत नाही तर शिवसेना ही काँग्रेस विचारांची कधीच होऊ शकणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्मच काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला आहे. त्यामुळे शरद पवार हे आमचे नेते कधीच होऊ शकत नाहीत, असे वक्तव्य केले होते.