दोडामार्गात हरवलेल्या संवादामुळे स्मशानशांतता : पक्षांचा मुक्त संचार : ‘लॉकडाऊन’ नियमांचे कडेकोट पालन : संकट दूर होऊन ‘लॉकडाऊन’ लवकर संपण्यासाठी होत आहे प्रार्थना
समीर ठाकुर / दोडामार्ग:
दोडामार्गात लॉकडाऊनच्या नियमांचे कडेकोट पालन होत असल्याने शहरात स्मशानशांतता दिसून येत आहे. मनसोक्त गप्पा मारल्याशिवाय व पिंपळकट्टय़ावर हजेरी लावल्याशिवाय येथील अनेकांचा दिवस सार्थकी लागत नाही. एरव्ही दिवसभराचे काम आटोपून सायंकाळी विविध नाक्यानाक्यावर एकत्र येऊन सुख-दुःखाच्या बाता करणाऱया, एकत्र चहा पिणाऱया मित्रमंडळींना असहय़ होत आहे. मात्र, जीव वाचवण्यासाठी नियमांचे पालन करणे गरजेचे असल्याचे, प्रत्येकाला माहीत आहे. त्यामुळेच नेहमीचा गजबजलेला पिंपळकट्टा, बाजारपेठ… सारे निःशब्द झाले आहे. संवादच हरवल्याने एकमेकांची विचारपूस थांबली आहे. त्यामुळे हे संकट लवकर संपून पुन्हा एकदा पूर्वीचे दिवस येऊदे व पूर्वीसारख्या गप्पा रंगू दे. अशीच प्रार्थना दोडामार्गवासियांतून होताना दिसत आहे.
गेल्या कित्येक वर्षात आम्ही अनेक ऊन-पावसाळे पाहिले. शहरात एखादी महनीय व्यक्ती निधन पावल्यानंतर किंवा एखादा ‘बंद’ जाहीर झाल्यानंतर बाजारपेठेसह शहर बंद राहायचे. साधारण: अशी परिस्थिती दोन ते तीन दिवसांपुरती राहिली होती. परंतु कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर झाल्याने संपूर्ण शहर, दुकाने, विविध आस्थापने, वाहतूक बंद होऊन सर्वत्र स्मशान शांतता झाली आहे. ती मात्र यापूर्वी आम्हाला कधीही पाहावयास मिळाली नव्हती. ‘देव करो’…. आणि हे लॉकडाऊन लवकर संपुन सर्व काही सुरळीत सुरू होवो… अशा प्रतिक्रिया दोडामार्गातील अनेक आबाल वृद्ध, महिला, नागरिक यांच्यातून व्यक्त हाते आहे.
कित्येक वर्षे अनुभवली नव्हती शांतता..
सिंधुदुर्ग जिल्हय़ाच्या शेवटच्या टोकावर वसलेले शहर म्हणजे दोडामार्ग. मूळ उगमस्थान कसई व त्यानंतर कर्नाटकातून आलेल्या कानडी भाषिक व्यापाऱयांच्या शब्दातून सर्वत्र प्रचलित झालेले हेच ते दोडामार्ग. महाराष्ट्राच्या कोकण प्रांतातील तत्कालिन रत्नागिरी जिल्हय़ामधील सावंतवाडी या मोठय़ा तालुक्यात हे कसई – दोडामार्ग छोटेसे गाव होते. स्वतंत्र तालुका निर्मितीनंतर 1999 पासून वेगळे झालेल्या या दोडामार्गने मोठी भरारी घेण्यास सुरुवात केली. अनेक मोठ-मोठी दुकाने, शोरुम्स, उंच इमारती तसेच दळणवळण व वाहतुकीच्या अनेक सोयी-सुविधा निर्माण झाल्या. या छोटय़ा गावाचे शहरात कधी रुपांतर झाले हे आम्हाला कळलेच नाही. शहरातील प्रमुख मार्गावरुन दररोज ये-जा करणारी वाहने, आजुबाजूच्या खेडेगावातून बाजारहाट, खरेदी-विक्री तसेच शासकीय अथवा वैयक्तिक कामानिमित्त ये – जा करणारे गावकरी व त्यांची गजबज, बाजारपेठेतील प्रत्येक दुकान उघडे व त्या समोरील गर्दी, दोडामार्ग बसस्थानकातून ग्रामीण भागात ये-जा करणाऱया एसटी बसेस सोबत गोव्यातून ये-जा करणाऱया खासगी मिनी बसेस, शाळा महाविद्यालयामध्ये येताना-जाताना होणारी विद्यार्थ्यांची किलबील व त्यांच्या स्कूल व्हॅन्स या सर्वांची दोडामार्गवासियांना सवय झाली होती. परंतु गेल्या काही दिवसात हे सर्व बंद झाल्याने सर्वत्र एक भयानक शांतता अनुभवण्यास मिळत आहे.
ना वाद..ना ट्राफिक जाम
बाजारपेठेतील गांधी चौकामधील पिंपळेश्वर देवस्थानच्या खालचा कट्टा हा तर सर्वांना एकत्र भेटण्याचे मुख्य ठिकाणच. परंतु तिथे सुद्धा शांतता आहे. गेल्या आठ दिवसात एकही ट्राफिक जाम नाही की त्यामध्ये होणारा एकही वाद-विवाद नाही. त्यामुळे बाजारपेठेतील मुख्य चौकात आता पाच मिनिटे सुद्धा उभे राहावेसे वाटत नाही. या लॉकडाऊनच्या काळात काही दुकाने उघडी असल्यामुळे बऱयाच दैनंदिन वस्तू मिळतात. पण, जेवण-खाण करून घरात कितीवेळ बसायचे? जो आवाज, जी गर्दी, जी वर्दळ नकोशी वाटायची, ती या लॉकडाऊनच्या काळात काही प्रमाणात हवी-हवीशी वाटू लागली आहे.
पक्षांचा किलबिलाट वाढला!
गांधी चौकातील पिंपळेश्वर वृक्षावर गेल्या अनेक वर्षांपासून पक्ष्यांचे वास्तव्य आहे. पहाटे घरटय़ातून बाहेर पडताना व सायंकाळी घरटय़ात परतताना त्यांचा किलबिलाट होत असे. सायंकाळच्या वेळेस चौक परिसरात वाहनांच्या मोठय़ा वर्दळीमुळे हा किलबिलाट ऐकावयास येत नसे. तो मात्र आता ऐकायला मिळतो. माणसांची गर्दी थांबल्यामुळे हे पक्षी आता मुक्तपणे संचार करीत आहेत.