टिपिकल साऊथ इंडियन पिक्चर! साउथला नायकाच्या देखणेपणावर जोर कमीच असतो तसाच हा काळासावळा बॉय नेक्स्ट डोअर वाटावा असा ‘तो’ आणि अस्सल भारतीय सौंदर्य असलेली ‘ती’! हे सगळं पाहणाऱयाला उगाच चंद्रलोकातलं न वाटता आपल्यातीलच एक वाटेल अशी सिच्युएशन लावलेली. आणि एकाएकी जोरदारपणे बरसून भिजवून टाकणाऱया खट पावसासारखी बासरीच्या स्वरांची जोरदार सर येऊन मन भिजवून टाकते. तो आनंद आपल्याला गुदमरून टाकत असतानाच सुरेल वाद्यमेळ अक्षरशः असह्य म्हणावा असा आनंद आपल्यावर ओतायला सुरुवात करतो. आणि या आनंदावर कळस चढवतात ते रेशीमलडींसारखे सळसळते सूर! सुगंधी फुलाच्या कोमल पाकळीवर तितक्मयाच नाजूक फुलपाखराने अलगद पावलं टेकावीत तितका मुलायम पोत असणारा हा आवाज आहे सुप्रसिद्ध गायक हरिहरन यांचा. ज्या आवाजाला अटकाव म्हणून कसा तो माहितच नाही की काय असा प्रश्न पडतो आणि जगातलं सर्वोत्कृष्ट रेशीमही फिकं पडेल असं वाटायला लागतं. आणि
सुन री सखी मेरी प्यारी सखी
ये दिल कहीं खोया है मेरा
जाने कहां उसे भूल गया,
नहीं कुछ भी है मुझको पता
इतकं कमाल म्युझिक आहे की कॉलेजचं ते उमलतं वय, त्या वयातलं ते पहिलवाहिलं प्रेम, आकर्षणाचं जोरदार वादळ आणि हवंहवंसं वाटेल असं ते गुदमरलेपण या सगळय़ाचा इफेक्ट अगदी डोळे झाकून गाणं ऐकलं तरीही जाणवल्याशिवाय राहणार नाही. कोवळय़ा वयातील त्या प्रेमात एक नशा असते. एक तरंगलेपण असतं. आणि तेच तरंग त्या बासरी, व्हायोलिनच्या मोहक स्वरवलयातून, बेलच्या किणकिणाटातून वाहत येतात. या संगीताचा थाट खास दाक्षिणात्य टच असलेला आहे. गीतकाराला गीतातून, संगीतकाराला त्याने दिलेल्या संगीतातून आणि गायकाला त्याच्या गाण्यातून काहीतरी विशेष सांगायचं असतं. ते जेव्हा नेमकं जमून येतं आणि अचूक पद्धतीने पोहोचतं तेव्हा अशी गाणी मोठय़ा यशाची धनी होतात. मूळ तामीळ सिनेमा ‘कादलन’ मधली सर्वच गाणी अतिशय लोकप्रिय आहेत. रोजा, बॉम्बे किंवा कादलन सारख्या चित्रपटांचं संगीत हा त्यांच्या यशस्वितेचा भक्कम पाया आहे. आणि हे संगीत देणारे ग्रेट संगीतकार आहेत ए आर रहमान! या सर्व पिक्चर्समधलं एकेक गाणं हा ऐकून आणि त्यावर विचार करूनही न संपणारा विषय आहे. यांना गाणं जसं ‘दिसतं’ त्याचं खूप अप्रूप वाटतं. जगातली सर्वात सुंदर आणि अतिशय ऊर्जायुक्त गोष्ट म्हणजे प्रेम. पहिल्या प्रेमात विरघळून गेलेल्या नवतरुणाचं जगच वेगळं होऊन जातं. ओठांवर गाणं येतं. मनात स्वप्न येतं. जीव नुसता पिसासारखा हलका होतो. हे सगळं सगळं त्या सुरांनी स्पष्ट दाखवणं म्हणजे त्या माध्यमावरची केवढी पकड! सगळय़ात आधी नाद होतो तो पावलांनी ठेका धरणाऱया तिच्या पायातल्या साखळय़ांचा. कडेकोट शांततेत आलेल्या या आवाजाने त्याच्या मनावर जीवघेणे गोड आघात होतात त्यांचा प्रतिध्वनी म्हणजे द्रुतलयीतल्या बासरीच्या स्वरांनी केलेली सुरुवात! 1994 साली घडलेल्या त्या गाण्यात त्या काळाच्या हिशेबाने म्हणायचे तर फार सुंदर आणि चमत्कृतीपूर्ण इफेक्ट पडद्यावरच्या दृश्यांतही केले आहेत. आपण ज्याचा विचार रात्रंदिवस करतो ते आपलं लाडकं माणूस समोर दिसल्यावर अपार आनंदाची कारंजी मनातून उसळून वर येतात. हे अनावरपण त्या बासरीच्या सुरातून येतं. त्याचबरोबर त्याचं मन तिला मनानेच आपल्याबरोबर घेऊन जातं हे दृश्य आजही सुंदर वाटतं. आणि ते जाणं नुसतंच उडणं नसतं तर ते असतं तरंगणं! पावलं जमिनीला टेकत नाहीत. आकाशात मुक्त विहार करणाऱया वायुलहरिंचं प्रतीक म्हणून इतर कोणतंही वाद्य वापरण्यापेक्षा बासरीलाच प्राधान्य दिलं असावं. पण या गाण्यात ए आर रहमानजींनी व्हायोलिन, बास गिटार, पियानोपासून ते मृदंगमपर्यंत सगळय़ा वाद्यांचा मेळ असा काही बसवलाय की आपण त्या प्रतिभेपुढे फक्त विनम्र व्हायचं.
या गाण्याने फिल्मी प्रेमगीतांच्या विश्वात एक नवा मानदंड प्रस्थापित केलाय. अप्रतिम साउंड इफेक्ट, अफलातून फ्यूजन, पाश्चिमात्य धाटणीचा अतीव कलात्मकतेने केलेला उपयोग आणि ठेवणीतल्या भारतीय उच्च संगीताचा गाभा असलेलं हे गीत आहे मात्र ज्ञानेश्वर माऊलीच्या शब्दातच म्हणायचं तर अगदी अळुमाळु असलेल्या दरवळासारखं किंवा शारदियेच्या चंद्रकळेतले अमृतकण कोवळे वगैरे असलेलं. सुरुवातीचा कोरसही श्रोत्यांना अलगद हात धरून गाण्याकडे घेऊन येतो. हरिहरनजींच्या रेशमी आवाजासाठी घातलेल्या मखमली पायघडय़ाच आहेत जणु! त्यांच्या आवाजाचा अतिसुंदर शास्त्रीय संगीताचा पोत आणि त्याचवेळी रहमानजींच्या काळाच्या पुढे नेणाऱया संगीताची धून आणि सूर तंतोतंत पोहचविणारे पी के मिश्रा या गीतकारांचे अचूक शब्द या त्रिवेणीसंगमाला म्हणतात ‘सुन री सखी’! या गाण्यात वापरलेल्या सुरांच्या वैविध्याने अक्षरशः भांबावून जायला होतं. हरिहरन यांच्या अतितलम आवाजाचंच गारुड एवढं आहे की खर्जातून मध्यात आणि तारसप्तकात ते ज्या चापल्याने विहरत असतात ते लक्षातही येत नाही. सोबतीला अगदी मोजकं पार्श्वसंगीत ठेवून हा परिणाम कायम राखण्यात संगीतकारही यशस्वी झाले आहेत. म्युझिक पीसेसमध्ये व्हायोलिन हे नायक आहे आणि त्याची पार्श्वभूमी आहे ती म्हणजे अगदी अलगदपणे छेडलं जाणारं बास गिटार. मध्येच केलेलं कोरसचं शिंपण म्हणजे सोने पे सुहागा. आणि क्षणभरच सौंदर्यवतीची झलक मिळावी अगदी तसाच केलेला पियानोच्या स्वरांचा वापर! चुटपुट लागून रहाते आणि पियानो तुम्हाला अतृप्तच ठेवतो. व्हायोलीन आणि बासरी या दोन्हीवर असणाऱया साथीदारांचा हात इतक्मया प्रचंड तयारीनिशी चाललाय की कुशल चित्रकाराने अतिवेगाने कुंचल्याने सरसर वलयं रेखाटून आकृती उभी करावी तसं ते अक्षरशः दिसतं. स्वर डोळय़ासमोर जिवंत चित्र उभं करतात. आपल्या प्रेयसीकडे आपल्या मनातलं कसं बोलावं, तिच्यासाठी काय काय करावं आणि किती करावं या सगळय़ा गोष्टींचा विचार करून संभ्रमात पडलेल्या तरुणाचं हे स्वरांतलं वर्णन खरंच कमाल आहे!
गायक आणि संगीतकार यांनी इतिहास रचलाय हे जितकं खरं आहे तितकंच श्रेय या गाण्याच्या गीतकाराचंही आहे. समर्पक शब्दयोजना, तीही मूळ तामिळ गीताने निर्माण केलेल्या आकृतीला जराही धक्का न लावता. शिवाय शब्द हे नुसते ठेक्मयात आले म्हणजे झालं असं होत नसतं तर आधीच दिल्या गेलेल्या संगीताने जे काही मांडलंय त्याच्याशी विसंगत रचना कुठेही येता कामा नये. ये स्वर्ग है या नर्क है मुझको होश नहीं
मेरी जिंदगी और मौत है अब हाथ में तेरे ही
या ओळीतली आवेग दाखवणारी विरोधाभासी शब्दरचना केवळ अप्रतिम आहे. किंवा त्याच अंतऱयातलं
तेरे बिना अब लगती है इक युग सी एक घडी
सब नजरें जो देख रही मेरे दिल में दहशत सी
हे दोनच ओळींतलं वर्णन त्या प्रियकराच्या जिवाची घालमेल अगदी नेमकी दाखवतं. आधीच दुसऱया भाषेत पूर्णपणे करून प्रसिद्ध झालेल्या आणि अमाप यश मिळवलेल्या गाण्याचं लेखन दुसऱया भाषेत जसेच्या तसे करणे हे अतिशय अवघड आणि आव्हानात्मक काम आहे. कारण हे नुसते शब्द नव्हे तर संपूर्ण गाणं त्यातल्या बारीकसारीक खाचाखोचांसहित पोहोचवणं असतं. त्यातल्या भावनांचे तपशील, बारकावे सुटून चालत नाहीत. प्रेम या विषयावर केलेल्या असंख्य गाण्यांपैकी ए आर रहमानचं हे गाणं म्हणजे अशा अनेक गोष्टींसाठी मापदंड बनून राहिलं आहे. ते कितीही वेळा ऐकलं तरी समाधान होत नाही. आणि मन नकळत गुणगुणू लागतं.
सुन री सखी मेरी प्यारी सखी, ये दिल कहीं खोया है मेरा. फक्त यावेळी नायकाबरोबरच ऐकणाराही आकाशात तरंगत असतो. वाहत्या सुरांबरोबरच!
– अपर्णा परांजपे-प्रभू