केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची घोषणा : 3 मे रोजी वितरण
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
गेल्या पाच दशकांपासून चित्रपट रसिकांवर अधिराज्य गाजवणारे सुप्रसिद्ध अभिनेते रजनीकांत यांना 51 वा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत पुरस्काराची घोषणा केली. येत्या 3 मे 2021 रोजी पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. या पुरस्काराच्या घोषणेनंतर तामिळनाडूमध्ये त्यांच्या चाहत्यांकडून जल्लोष केला जात आहे. दादासाहेब फाळके पुरस्कार हा चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च मानाचा पुरस्कार मानला जातो.
‘देशातील विविध भाषांमधील सिनेसृष्टींमध्ये दिलेल्या मौलिक योगदानाबद्दल दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी ज्युरींनी रजनीकांत यांची निवड केली आहे. त्यांना हा पुरस्कार घोषित करताना मला फार आनंद होत आहे’, असे प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. भारतीय चित्रपटसृष्टीतील हा सर्वोच्च पुरस्कार समजला जातो. एखाद्या कलाकाराने संपूर्ण आयुष्यभर जे योगदान चित्रपटसृष्टीला दिले आहे, त्याचा गौरव करण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो. सिनेसृष्टीत महत्त्वाची कामगिरी करणाऱया अभिनेत्याला दरवषी दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित केले जाते. गेल्या वषीचा दादासाहेब फाळके पुरस्कार हा बॉलिवूडचे शेहेनशाह अमिताभ बच्चन यांना जाहीर झाला होता. त्यानंतर यंदाचा हा पुरस्कार रजनीकांत यांना जाहीर होताच त्यांच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
‘इलेक्शन कनेक्शन’ची चर्चा
रजनीकांत यांच्या राज्यात म्हणजेच तामिळनाडूमध्ये 6 एप्रिल रोजी विधानसभेसाठी मतदान होत आहे. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीचा प्रचार सध्या अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे या पुरस्कार घोषणेमागे ‘इलेक्शन कनेक्शन’ असल्याची चर्चा सुरू आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मात्र ही चर्चा फेटाळून लावली आहे. रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर होण्याचा तामिळनाडू विधानसभा निवडणुकीशी कोणताही संबंध नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. सुपरस्टार रजनीकांत यांनी चित्रपटसृष्टीची जवळपास 50 वर्षे सेवा केली आहे. त्यामुळे 2019 चा दादासाहेब फाळके पुरस्कार त्यांना जाहीर झाला आहे. चित्रपट आणि राजकारण यांचा परस्पर संबंध लावणे योग्य नाही, असे स्पष्टीकरण जावडेकर यांनी दिले आहे.
जगभर बहुसंख्य चाहते
सुपरस्टार रजनीकांत यांचे जगभरात लाखेंच्या संख्येने चाहते आहेत. रजनीकांत यांना तामिळनाडूमध्ये ‘देवा’चा दर्जा मिळाला आहे. आपल्या जादुई अभिनयातून चाहते निर्माण करण्याबरोबरच त्यांनी सर्वसामान्य लोकांची मदत करूनही नाव कमावले आहे. रजनीकांत यांची महाराष्ट्राशीही जवळीक असून पुणे जिल्हय़ातील पुरंदर तालुक्यात मावडी-कडेपठार हे त्यांचे मूळ गाव आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत ‘मेगास्टार’ रजनीकांत यांनी स्वतःच्या अभिनयाने जगभरात प्रचंड नाव कमावले आहे.