शेतकरी संघटनेचा पत्रकार परिषदेत इशारा : बेळगाव-धारवाडमार्गे नव्या सर्व्हेनुसार मार्ग करण्याची मागणी : 3 जानेवारीला मोर्चा काढणार
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव-धारवाड हा होऊ घातलेला रेल्वेमार्ग देसूर ते के. के. कोप्प यादरम्यान 80 टक्के सुपिक जमिनीतून जातो. केवळ राजकीय व्यक्तींच्या फायद्यासाठी शेतकऱयांचा बळी दिला जात आहे. या रेल्वेमार्गाला प्रभूनगर, गर्लगुंजी, नागेनहट्टी, नंदीहळ्ळी, हलगीमर्डी, अंकलगी या गावच्या शेतकऱयांचा विरोध आहे. सरकारने सुपिक जमिनीमधूनच रेल्वेमार्ग काढण्याचा विचार केल्यास शेतकरी रस्त्यावर उतरतील, असा इशारा कर्नाटक रयत संघाचे राज्याध्यक्ष चुन्नाप्पा पुजारी यांनी दिला.
सोमवारी कन्नड साहित्य भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. विकासाला शेतकऱयांचा विरोध नसून दोन ते तीन पिके घेणाऱया शेतीमधून रेल्वेमार्ग काढण्यास विरोध आहे. सांबरा येथून संपगाव, बैलहोंगल, कित्तूरमार्गे धारवाड यामार्गाची गरज असताना देसूर-के. के. कोप्पमार्गे थोपविला गेला आहे. या भागात अल्पभूधारक शेतकरी असून त्यांच्या जमिनी गेल्यास ते देशोधडीला लागतील. रेल्वेमार्गात बदल करण्यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री, मुख्यमंत्री, खासदार, आमदार यांना निवेदन देण्यात आले होते.
राजहंसगडाच्या खालील बाजूने रेल्वेमार्ग करा
देसूर ते के. के. कोप्प या मार्गावर 80 टक्के सुपिक जमीन असल्याने शेतकऱयांनी नवीन मार्ग रेल्वे अधिकाऱयांना सूचविला होता. राजहंसगडाच्या बाजूने असणाऱया खडकाळ जमिनीतून हा मार्ग जातो. या मार्गावर 80 टक्के खडकाळ जमीन असल्याने भूसंपादनासाठी कोणतीही अडचण येणार नाही. हा मार्ग नैर्त्रुत्य रेल्वेनेही मान्य केला होता. तसेच यामुळे 4 किलो मीटरने अंतरही कमी होणार होते. परंतु खासदार मंगला अंगडी यांनी रेल्वे विभागाला पत्र लिहिले असून गर्लगुंजी मार्गेच रेल्वेमार्ग करण्याचे आदेश दिल्याचा आरोप शेतकऱयांनी केला.
शेतकऱयांच्या दुबार जमिनी घेऊन विकास केला जात असेल तर शेतकरी न्यायालयीन लढय़ासोबतच रस्त्यावरच्या लढाईला तयार आहे. यासंदर्भात सोमवार दि. 3 जानेवारी रोजी 5 ते 6 गावचे नागरिक व रयत संघाचे पदाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी रयत संघाचे प्रकाश नाईक, प्रसाद पाटील, राजू पाटील, मारुती लोकूर, परशराम जाधव, किरण लोंढे, रमेश राऊत यांच्यासह इतर शेतकरी उपस्थित होते.