कडोलीतील शेतकऱयांचे आमदार सतीश जारकीहोळी यांना निवेदन
वार्ताहर / कडोली
कडोली परिसरातील शेतकऱयांच्या सुपीक जमिनीतून जाणारा नियोजित रिंगरोड रद्द करावा, अशी मागणी असणारे निवेदन यमकनमर्डी मतदारसंघाचे आमदार सतीश जारकीहोळी यांना कडोली भागातील शेतकऱयांच्यावतीने देण्यात आले आहे.
सरकारने कडोली परिसरातील शेतजमिनीतून रिंगरोड बनविण्याचा निर्णय घेतला आहे. या जमिनी अत्यंत सुपीक असून याच जमिनीतून प्रकाश राजाई, सूर्याजी कुट्रे, सुभाष कुट्रे सारख्या शेतकऱयांनी भात उत्पादनातून सरकारी पातळीवरील पारितोषिके मिळविली आहेत. जर अशा जमिनी रिंगरोडमध्ये गेल्यास शेतकऱयांचे मोठे नुकसान होणार आहे. परिणामी शेतकऱयांचा उदरनिर्वाह चालणार कसा? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सामाजिक कार्यकर्ते शिवाजी कुट्रे यांनी यासंबंधी आमदार सतीश जारकीहोळी यांना निवेदन देऊन माहिती दिली तसेच सुपीक जमिनीतून जाणारा नियोजित रिंगरोड योजना रद्द करावी, अशी विनंती केली.
यावेळी आमदार सतीश जारकीहोळी यांनी निवेदन स्वीकारून कडोली परिसरातील जी जमीन रिंगरोडमध्ये जाणार आहे, ती सुपीक असून याची मला कल्पना आहे. हा रिंगरोड या जमिनीतून जाऊ नये यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. बेळगाव येथील काँगेसच्या कार्यालयात निवेदन देण्यात आले. याप्रसंगी कडोली ग्रा. पं. अध्यक्षा रेखा सुतार, ग्रा. पं. सदस्य राजू मायाण्णा, गौडाप्पा पाटील, राजू कुट्रे, सूर्याजी कुट्रे, प्रकाश राजाई, यल्लाप्पा जाधव, कृष्णा मस्कार, शंकर नाईक, श्री बाबली आदी शेतकरी उपस्थित होते.